Sunday, April 11, 2010

सकाळ नि रीडर्स डायजेस्ट

जगभरात सध्या छपाईमाध्यमांची वेगाने पीछेहाट होत असली तरी भारतात मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. इथे वर्तमानपत्रे/मासिके वाचणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हा भारतीयांच्या वाढत्या क्रयशक्तीचा परिणाम आहे की त्यांच्या वाढत्या साक्षरतेचा हे स्पष्ट नसले तरी ही बातमी सुखावणारी आहे हे नक्की. रेडिओ, त्यानंतर दूरचित्रवाणी नि सध्या महाजाल अशी अनेक आक्रमणे या माध्यमांनी झेलली, पण ती अजूनही तग धरून आहेत. छपाई माध्यमांची विश्वासार्हता इतर कुठल्याही माध्यमामधे नाही, छापून आले म्हणजे ते खरेच असणार असे माननारा एक मोठा वर्ग आजही आपल्याकडे आहे. इतर माध्यमे दिवसेंदिवस उथळ, बटबटीत नि थिल्लर होत असली तरी वृत्तपत्रांनी त्यांचा दर्जा टिकवून ठेवलेला आहे असे वाचकांचे मत आहे. अर्थात, सर्वसाधारण मत असे असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अगदी वेगळी आहे असे मला वाटते. दूरचित्रवाणी माध्यमांइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरी सवंगपणा, थिल्लरपणा, व्यापारी वृत्ती, बेजबाबदारपणा या गोष्टींचा छपाईमाध्यमांमधेही शिरकाव झालेला आहे हे नक्की. सकाळ नि रीडर्स डायजेस्ट या दोन अशाच प्रकाशनांविषयी आज आपण बोलणार आहोत.

'सकाळ'ची माझी सगळ्यात जुनी आठवण म्हणजे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली त्याच्या दुसर्‍या दिवसाची. सासवडच्या हडको कॉलनीत आम्ही, आमचे शेजारी सगळे आमच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जमलो आहोत नि हातात सकाळ घेऊन राजीव गांधीच्या हत्येविषयी चर्चा करतो आहोत असे दृष्य मला आजही आठवते. टीव्ही तेव्हा एवढे पसरले नव्हते नि सकाळी रेडिओ लावण्याची आमच्या घरी पद्धत नव्हती. आजकाल जशा बातम्या चारीबाजुंनी येऊन तुमच्यावर आदळतात तसा प्रकार त्यावेळी नव्हता. सकाळशी आमचे जे नाते जुळले ते तेव्हापासून. सकाळमधल्या नि:पक्ष बातम्या, साधी सोपी (किंचीत पुणेरी) भाषा, सुटीचे पान, वाचकांचा पत्रव्यवहार सारखी सदरे यांची नंतर अगदी सवय झाल्यासारखी झाली. नंतर पुण्यात आल्यावर तर काय, सकाळशिवाय दिवसाची सुरुवात झाली असे वाटतच नसे. परिस्थिती अशी की एखाद्या दुसर्‍या गावी गेल्यावर किंवा वर्तमानपत्रांना सुटी असल्यावर चुकल्याचुकल्यासारखे वाटे. सकाळ मधला चिंटू तर दोस्तच झाल्यासारखा झाला. इतकी वर्षे आमच्या घरी सकाळ सोडून दुसरे कुठलेही वर्तमानपत्र आल्याचे मलातरी आठवत नाही. पण 'सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंत एका दिवशी होतोच' अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. सकाळच्या बाबतीतही तेच झाले.

इतर वर्तमानपत्रांपेक्षा वेगळा असणारा सकाळ हळूहळू त्यांच्याच वाटेने जायला लागला. प्रतापराव पवार हे सकाळचे मालक झाल्यावर ह्या प्रक्रियेला वेग आला असे माझे स्पष्ट मत आहे. सकाळ हे पुर्वी एक वृत्तपत्र होते, नंतर ते पैसा मिळवायचे साधन झाले. बातम्यांचा दर्जा खालावला, त्यांमधल्या भाषेचा दर्जा खालावला. पुर्वी उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून जाहिराती छापणारा सकाळ आता जाहिरातींबरोबर काही मजकूर हवा म्हणून नाईलाजाने बातम्या छापायला लागला! ज्या पुण्यात जगातील सगळ्यात शुद्ध मराठी बोलली व लिहिली जाते असे काही लोक (पुणेकरच!) कौतुकाने म्हणत, तिथल्या अस्सल पुणेरी सकाळमधे पहिल्या पानावरचे मथळेही इंग्रजीत यायला लागले. पहिल्या पानाची ही कथा, तर आतल्या पानांचे काय? तिथे तर वाक्यात इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी परिस्थिती दिसू लागली. सगळ्यात दु:खदायक बदल म्हणजे सकाळने आपली नि:पक्षपाती भुमिका सोडली. पुर्वी कुठल्याही पक्षाची भलावण न करणारा सकाळ आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र झाला की काय अशी शंका लोकांना यायला लागली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या लोकांचे फोटो, त्यांच्या बातम्या पुन्हा पुन्हा दिसायला लागल्या. त्यांच्याविषयीच्या नकारात्मक बातम्या मात्र गाढवाच्या शिंगासारख्या गायब झाल्या. आपण सुरू केलेल्या सकाळचे हे स्वरूप पाहून स्वर्गात नानासाहेब परूळेकरांचा आत्मा अगदी तळतळत असेल यात काडीमात्र शंका नाही. सकाळचा हा आजचा अवतार पाहून आपल्यापश्चात हे वृत्तपत्र बंद पडले असते तर बरे झाले असते असे त्यांना न वाटले तर नवलच!

मात्र एवढे सगळे असूनही लोक सकाळ वाचतच आहेत (मी देखील!), याचे कारण काय असावे? मला वाटते याचे मुख्य कारण म्हणजे पर्यायाचा अभाव. आज लोकांकडे सकाळला पर्याय आहे कुठे? लोकसत्ता, लोकमत, मटा ही काय वृत्तपत्रे आहेत? ती इतकी गचाळ, ओंगळवाणी नि घाणेरडी आहेत की बंबात ती टाकली तर त्यांवर पाणीही नीट तापू नये. त्यांमुळे 'दगडापेक्षा वीट मऊ' या नात्याने लोक अजूनही सकाळच घेत आहेत. त्यांच्या या नाविलाजावर काहीतरी उपाय निघो नि त्यांना सकाळसाठी एक उत्तम पर्याय लवकरात लवकर उपलब्ध होवो अशी प्रार्थना करणे एवढेच तूर्त आपल्या हाती आहे!

सकाळसारखीच गत आज इंग्रजी भाषेत सर्वाधिक विकल्या नि वाचल्या जाणार्‍या रीडर्स डायजेस्ट या मासिकाचीही झाली आहे, पण त्याबाबत नंतर कधीतरी!

ता.क. सकाळचा दर्जा आताशा खालावला आहे असे आम्ही म्हणत असलो तरी आमचे साहेब श्री. आचार्य अत्रे यांचे मत सकाळविषयी कधीच चांगले नव्हते. सकाळसारख्या वृत्तपत्रांना नि तिथल्या पत्रकारांना झोडपून काढताना साहेब म्हणतात, 'पुण्याचे दैनिक सकाळ किंवा मुंबईचा दैनिक लोकसत्ता ही काही पत्रे नव्हेत. गिर्‍हाईकाच्या पदरात वाटेल तो सडका किडका माल अव्वाच्या सव्वा किंमतीने टाकण्यासाठी पोटभरू काळा बाजारवाल्यांनी उघडलेली ती किराणा मालाची दुकाने होत. जुलमाशी नि अन्यायाशी झुंजण्यासाठी एक पाय तुरुंगात टाकून लेखणी धरणार्‍या विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा शूर वारसा आम्ही मराठी पत्रकारांना मिळालेला आहे. तो वारसा गेल्या पाऊणशे वर्षात ज्यांनी चालविलेला आहे त्यांनाच मराठी पत्रकार असे संबोधता येईल. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वबांधवांशी द्रोह करून आमच्या लेखणीचा गुजराती, मारवाडी नि मद्रासी भांडवलदारांना वेश्याविक्रय करणारे आमचे मुंबईमधले जे काही मराठी पत्रकार आहेत, त्यांना पत्रकार या पदवीन संबोधणे म्हणजे त्या थोर पदवीची विटंबना करण्यासारखे आहे.' साहेबांची ही टिप्पणी म्हणजे त्यांच्या दुरदृष्टीपणाचे एक उत्तम उदाहरण आहे, नाही का?

3 comments:

  1. It's not only SakaL is sold out to a cunning politician family of Pawars, but all others are bowing to some or the other party or strong man in power. Hindu from Chennai has exposed the recent racket of paid journalisn in case of present CM's election. But where are others in Pune/Mumbai? I think that Prabhat in Pune and NavakaaL in Mumbai are supposed to be independent ones. What is their status? This is a never ending topic of deterioration of reading culture in India.In case of periodicals, Sadhana is the only weekly and Antarnaad is the only monthly which you may love to read. I wish to know your opinion. Regards.
    Mangesh Nabar

    ReplyDelete
  2. वृत्तपत्र वाचकांची संख्या वाढणे हि एका बाजूनी चांगली गोष्ट आहे पण एका बाजूनी अति वाईट ! आपण कागद वापरतो वृत्तपत्रांसाठी आणि तो बनवतो झाडांपासून ! असे हि नाही कि आपल्या इथे आर्तिफ़िशिअल कागद वापरला जातो !

    ReplyDelete
  3. छान लिहिलं आहेस.... सध्या सकाळ वाचताना होणारी चिडचिड परिणामकारकरीत्या मांडली आहेस...

    ReplyDelete