Thursday, May 6, 2010

अजमल कसाबला फाशी, पण पुढे काय?

अखेर ’अजमल कसाब’ विरुद्ध ’भारत सरकार’ या खटल्याचा निकाल लागला नि कसाबला फाशीची शिक्षा झाली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी आठ अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला, त्यांपैकी कसाब या एकमेव अतिरेक्यास जिवंत पकडण्यात आले नि त्याविरुद्ध हा खटला चालविण्यात आला. खटल्याचा निकाल आज लागला असला तरी या खटल्याला दीड वर्षे लागावी याची ठसठस मनात आहेच, अर्थात भारतीय न्यायव्यवस्थेच्या गजचालीचा वेग पाहता हा वेळ कमीच म्हणायला हवा! या महत्वाच्या खटल्यातही आपल्या गचाळ नि भोंगळ कारभाराचे दर्शन सरकारने केले, कसाबचे वकील पुन्हापुन्हा बदलले जाणे नि या हल्ल्यात मरण पावलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी करकरे यांचे बुलेटप्रुफ जाकेट गहाळ होणे ही याची दोन प्रातिनिधिक उदाहरणे!

कसाबला फाशीची शिक्षा झाली असली तरी या हल्ल्यात मरण पावलेल्या १७३ भारतीयांचे प्राण काही परत येणार नाहीत हे नक्की. तुकाराम ओंबाळेंच्या कुटुंबाला ते पुन्हा कधीच दिसणार नाहीत, संदीप उन्नीकृष्ननच्या आईवडिलांच्या डोळ्यांमधला तारा हरवला तो कायमचा, करकरे, साळस्कर, कामटे यांच्या अकस्मात जाण्याने महाराष्ट्राची झालेली हानी भरून येणार नाही, हल्ल्यात मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या नातलगांचे भावविश्व उध्वस्त झाले ते कायमचे नि महासत्ता म्हणवून घेणा-या भारताला दोन दिवस मुठभर अतिरेक्यांनी वेठीस धरले ही सामान्यांच्या मनातली बोचणीही कायमचीच.

कसाबला पकडले गेले, त्याला फाशी झाली हे खरे, पण महत्वाचा मुद्दा तो नाही, महत्वाचा मुद्दा आहे पुढे काय? भारतात अनेक शहरांमधून अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत, होत आहेत नि नंतरही होतील, ते थांबतील याची खात्री सरकार देऊ शकते काय? मुंबईवरचा हा हल्ला तिच्यावरचा शेवटचा हल्ला होता असे कोणी छातीठोकपणे सांगू शकते का? ’रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीनुसार भारतात कुठेतरी बॉम्बस्फोट होतात, गृहमंत्री तातडीने त्या ठिकाणाला भेट देतात, मृत व्यक्तींना, जखमींना मदत जाहीर करतात नि ’ह्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो’ असे आपले नेहमीचे वाक्य टाकतात. तिकडे केंद्रातले गृहमंत्री पाकिस्तानला कडक शब्दांत ईशारा देवून आपले कर्तव्य पार पाडतात. किडामुंगीसारखी माणसे मारली जात आहेत याचे कुणालाच काहीच वाटत नाही? ह्या खटल्यात कसाबला फाशीची शिक्षा झाली असली तरी पाकिस्तानात असे अनेक कसाब भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार आहेत, त्यांचे काय? भारतात होणा-या जवळपास प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे माहीत असूनही आपले सरकार मात्र हातावर हात ठेवून बसून आहे याचे कारण काय? दहशतवादी हल्ले होतच राहतील, नागरिकांनी त्याची सवय करून घ्यावी असे तर सरकारचे म्हणणे नाही ना?

कसाबच्या खटल्याचा निकाल लागला, पण त्यातून या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापेक्षा असे अनेक नविन प्रश्न तयार झाले आहेत. पण सरकारकडेच मुळी त्यांची उत्तरे नाहीत तर ती जनतेला देणार कशी!

1 comment:

  1. Kharey.... tyanchyakadech nahiyet hi uttare..tar aaplyala kuthun milnaar...???

    ReplyDelete