Monday, September 27, 2010

'दबंग' आणि आपण

सलमान खानचा 'दबंग' काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला तर चाललाच पण त्याने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जास्तीत गल्ला जमवण्याचा 'थ्री इडियटस' या चित्रपटाचा विक्रमही मोडला. काहींना तर हा चित्रपट एवढा आवडला की त्यांनी तो दोनदा-तीनदा पाहिला. कुणी काहीही म्हणो, पण हे यश सलमान खानचेच आहे हे नक्की, आणि माझ्या मते हीच चिंतेची गोष्ट आहे. सलमान खानविषयी अधिक माहिती देण्याची गरज नसावी. 'मैने प्यार किया'तला निरागस नायक ते ख-या जगातला खलनायक हा सलमान खानचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. चिंकारा जातीच्या हरणांची शिकार करणे आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका मनुष्यास यमसदनी पाठवणे असे गुन्हे करूनही सलमान आज मोकळाच आहे. आपल्या न्यायव्यवस्थेची आजपर्यंतची कामगिरी पहाता ती भविष्यातही सलमानचे काही वाकडे करू शकेल असे दिसत नाही. पण न्यायव्यवस्थेचे सोडा, ती गाढव आहे, मला आश्चर्य वाटते ते लोकांचे. सलमान खानला डोक्यावर घेऊन नाचताना तो एक गुन्हेगार आहे हे लोक कसे विसरतात? पडद्यावर त्याला नायक म्हणून पाहताना नि त्याच्या करामतींना शिट्ट्या मारताना तो वास्तवात एक खलनायक आहे हे लोक दृष्टीआड कसे करू शकतात? आपण एवढे संवेदनाहीन झालो आहोत काय? कुणा उपटसुंभ्याने काहीतरी लिहिले म्हणून जाळपोळ करणारे आपण एका माणसाचा जीव घेणा-या सलमानला मात्र वेगळा न्याय का लावतो? तेव्हा कुठे जाते आपली संवेदनशीलता, तेव्हा कुठे जातात आपल्या भावना?

अपघातात मृत पावलेली व्यक्ती जर आपली जवळची नातेवाईक असती तर ते याच निर्विकारपणे हा चित्रपट पहायला गेले असते का या प्रश्नाचे उत्तर सलमानच्या या चाहत्यांनी द्यायला हवे. अर्थात 'आम्ही सलमानचे चाहते आहोत, आम्हाला इतर गोष्टींशी घेणेदेणे नाही' असा बचाव हे लोक करू शकतात, पण तो लंगडा आहे. हाच न्याय जर लोकप्रतिनिधिंना लावला तर तेही 'आमची गुंडगिरी नजरेआड करा, जनतेची सेवा करता यावी म्हणून आम्हालाच पुन्हा निवडून द्या' असा युक्तिवाद करू शकतातच की! सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यामुळे त्याचे खटले वेगात चालणार नाहीत हे मान्य, पण आपण काहीही गैरकाम केले तरी जनतेचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे असा या गुन्हेगारांचा समज होण्यापासून तरी आपण त्यांना रोखू शकतो. असा बहिष्कार टाकून बळी पडलेल्यांना सहानूभुती दाखवण्याचा आणि न्यायव्यवस्थेच्या हळू चालीबद्दल आपण असमाधानी आहोत हे सरकारला दाखवण्याचा मुद्दाही महत्वाचा आहेच.

सलमान खान म्हटले की मला आठवतो तो त्याच्या गाडीखाली आलेल्या माणसाच्या नातेवाईकांचा तो आक्रोश. ते छायाचित्र माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे. कुठे असतील ते लोक आज? आजही ते असेच कुठेतरी जनावरासारखे जगत असतील आणि एवढे होऊनही कदाचित एखाद्या फुटपाथवरच झोपत असतील. काही दिवसांनी असाच एखादा सलमान खान त्यापैकी कुणालातरी उडवेल, माध्यमे चवीने बातम्या देतील, पोलिस कारवाईचे देखावे करतील नि न्यायालये निर्णय नि त्यांना स्थगिती हा खेळ खेळत राहतील. थोडक्यात, 'मेरा भारत महान' हे वाक्य पुन्हा एकदा खोटे ठरेल आणि कितीही अमान्य केले तरी त्यासाठी आपणच जबाबदार असू!

3 comments:

  1. अप्रतिम लेख. अतिशय आवडला !! हेच सारं संजय दत्तलाही लागू होतं.. पण त्यालाही आपण संजूबाबा म्हणत म्हणत डोक्यावर घेऊन नाचत राहतो !! :(

    ReplyDelete
  2. Aapali athwan kashi asate tyachach he udaharan.

    ReplyDelete