Wednesday, October 6, 2010

भारतातल्या दोन आनंददायी घटना

गेल्या काही दिवसात भारतात दोन आनंददायी घटना घडल्या. देशातली सध्याची परिस्थिती पाहून त्याचे काही खरे नाही असे वाटण्यासारखी वेळ आली होती खरी; सदर घटना मात्र मनाला आनंद देणा-या नि चला 'होत असलेले सगळेच काही निराशाजनक नाही' असा दिलासा देणा-या ठरल्या!

पहिली घटना म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला निकाल दिल्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त केलेली संयत प्रतिक्रिया नि करोडो भारतीयांनी त्यांना दिलेली साथ. हा निकाल देण्याआधी सरकारने मोठमोठ्या जाहिराती देऊन नि नागरिकांना भावनिक आवाहने करून असे काही वातावरण तयार केले होते की वाटावे त्या दिवशी जणु जगबुडीच होणार आहे! मला तर असे वाटत होते की क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला की आनंद साजरा करण्यासाठी आतूर झालेले नागरिक जसे घराबाहेर पळतात नि फटाके फोडतात अगदी तसेच न्यायालयात न्यायाधीशांनी निकाल वाचताक्षणीच लोक बाहेर पडतील नि गोळीबार सुरू करतील. पण सुदैवाने असे काही घडले नाही! १९९२ सालच्या नि आजच्या भारतात पडलेला मोठा फरक हे असे होण्यामागचे महत्वाचे कारण. धर्माच्या छत्रीखाली भारतीय तरूणांना गोळा करणे सोपे नाही हे सा-याच चतुर राजकरण्यांना नि धार्मिक नेत्यांना आता कळून चुकलेले आहे. लोक आता ह्दयाऐवजी डोक्याने विचार करू लागले आहेत हे त्यांना समजले आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे नि अशा घटनांमधे आपली उर्जा वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही हे भारतीयांना (विशेषतः तरूणांना) पटते आहे. आमचा तिरस्कार नि द्वेषापेक्षा प्रेम नि बंधुभावावर अधिक विश्वास आहे हे भारतीय तरूणांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे नि मला वाटते याबद्दल आपण त्यांचे कौतुक करायला हवे.


दुसरी घटना म्हणजे नवी दिल्ली येथे झालेले 'राष्ट्रकुल स्पर्धांचे' दिमाखदार उद्घाटन. ही स्पर्धा भारताकडे यजमानपद आल्यापासून फक्त नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत राहिलेली होती. स्पर्धेसाठीची स्टेडीयम्स वेळेत तयार होतील की नाही हा प्रश्न, त्यांच्या दर्जाबाबतचा प्रश्न, खेळाडू राहणार आहेत त्या इमारतींच्या दर्जाचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न असे सारे प्रश्न पुन्हापुन्हा विचारले जात होते. त्यातच या स्पर्धेतून काही नामवंत खेळाडूंनी माघार घेणे, स्पर्धेसाठीचा पादचारी पूल पडणे, खेळाडूनिवासात साप सापडणे अशा घटना घडल्या नि स्पर्धेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परदेशी माध्यमे तर या स्पर्धा रद्दच होणार आहेत (किंवा व्हाव्यात) असेच चित्र जगासमोर मांडत होती, पण तसे काही घडले नाही. डोळ्यांचे पारणे फेडील अशा दिलखेचक नि चित्ताकर्षक सोहळ्याने या स्पर्धेचे उद्घाटन झाले नि 'ज्याचा शेवट गोड ते सारे गोड' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. या सोहळ्यात मला व्यक्तिश: आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे बॉलीवूडचा कमीत कमी सहभाग नि कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा झालेला प्रयत्न. अर्थात हा सोहळा यशस्वी झाला म्हणून आपले सारे गुन्हे माफ या भ्रमात कलमाडी व कंपनी यांनी राहू नये. त्यांच्या वागण्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल नि जर तो मिळाला नाही तर जनतेने तो त्यांच्याकडून मागून घ्यायला हवा.

ता.क. : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेकडे वळून पाहताना एका माजी कारसेवकाच्या मनात आलेले विचार येथे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms] वाचता येतील.

2 comments:

  1. मायावती व नितीशकुमार यानी मुस्लीमांची एकगठ्ठा मते विरुद्ध गेली तरी राज्य करणे शक्य आहे हे दाखवून दिल्यावर मुसलमानांची संयत प्रतिक्रिया अपेक्षित होतीच.

    ReplyDelete