Friday, May 13, 2011

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!

एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दाखवायला ह्या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे
पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर
रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू *पैसे देऊन* विकत घेणारे लोक ह्या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन
पिळगावकर साहेबांना कधी कळणार?

इतरांना सतत उपदेश करणारे बालाजी तांबे स्वतःच स्वत:चे आयुर्वेदिक उपचार
वापरून बारीक का होत नाहीत?

आपण हिरो म्हणून कधीच यशस्वी होणार नाही हे अभिषेक बच्चनला कधी समजणार?

स्कार्फ लावण्यात एवढा वेळ घालवणा-या दुचाकीस्वार मुली थेट हेल्मेटच का
वापरत नाहीत?

दरसाली 'यावर्षी पाऊस सरासरीइतकाच होण्याचा अंदाज' आणि 'उत्पादनात घट
झाल्याने हापूस आंब्याचे भाव चढे राहण्याची शक्यता' या बातम्या छापल्या
नाहीत तर वृत्तपत्रांचा परवाना रद्द करतात का?

आपले आर आर आबा नेहमी 'वाळूतस्करांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही','दहशतवादाचा धैर्याने सामना केला जाईल', 'काळाबाजारवाल्यांची गय केली
जाणार नाही' अशी भविष्यकाळातली वाक्येच का टाकतात? शाळेत  भूतकाळ
शिकवताना ते गैरहजर होते का?

लग्न जमवायच्या संकेतस्थळांवर मराठी मुली आपल्या जोडीदाराकडून 'फ्ल्युएंट
इंग्लिश' बोलता येण्याची अपेक्षा ठेवतात हे एकवेळ समजू शकतो, पण ती
अपेक्षा तरी अचूक इंग्लिशमधे व्यक्त करायला नको का?

अण्णा हजारे आपल्या 'मराठी' हिंदीत रोज वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत,
त्या रोज ऐकत असल्यामुळेच केंद्राने झटपट त्यांच्या सगळ्या अटी मान्य
केल्या ही अफवा खरी का?

पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही
वर्षांनी 'आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू' असं
एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?

आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा
करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?

4 comments: