Wednesday, February 29, 2012

किनारा तुला पामराला!

२७ फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्यांचा हा जन्मदिवस. तेव्हा या सोनेरी दिवसानिमित्त चला आज तात्यांच्याच एका काव्याचे रसग्रहण करूयात - त्यांच्या "कोलंबसाचे गर्वगीत" या कवितेचे.

"कोलंबसाचे गर्वगीत"ही कविता एका खलाशाचे मनोगत आहे. हे मनोगत खलाशाचे असले तरी ते सगळ्या मानवजातीचेच मनोगत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. निसर्ग नि मानव यांमधला संघर्ष जुना आहे, अगदी माणूस जन्मला त्या दिवसापासूनचा. "तू मला थांबवू शकत नाहीस" असे निसर्गाला सांगणारा माणूस तर "तू माझ्यासमोर कस्पटासमान आहेस, या पृथ्वीवर सत्ता आहे ती फक्त माझीच" असे म्हणणारा निसर्ग यांमधला हा संघर्ष पुर्वी होता, आजही आहे आणि अजून लाखो वर्षांनीही असेलच. सागर अर्थात समुद्र ह्या निसर्गाच्या अशाच एका रौद्र रुपाला उद्देशून गायलेले हे मानवकाव्य माणसाची कधीही हार न मानणारी वृत्ती दाखवून देणारे आहे.

या काव्याचा प्रसंग आहे एका जहाजावरचा. हे जहाज भर समुद्रात एका वादळात सापडलेले आहे. वादळ आहे म्हटल्यावर पाऊस हवाच, आणि तो आहेही. पाऊस केवढा, तर माथ्यावरती नभ फुटले आहेत की काय असे वाटावे एवढा. या सगळ्या गोष्टींची परिणीती मोठाल्या लाटा तयार होण्यात झालेली आहे, लाटा केवढ्या तर पाण्याचे पर्वत वाटतील अशा.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळु दे तारे!
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे
ढळु दे दिशाकोन सारे!

एकूणच सारी परिस्थिती अशी आहे की वाटावे कुणी सैतान वेताळांचा मेळा जमवून या दर्यावरती तांडवनृत्य करत आहे. पण असे असले तरी आपला हा शूर खलाशी अजिबात हिंमत हारलेला नाही. सागराला उद्देशून तो म्हणतो, "अशा, याहून कितीही भयंकर गोष्टी घडल्या तरी आम्ही घाबरणार नाही, अरे नाविकांना कसली भिती?" मृत्युचे हे थैमान पाहून बावरलेल्या आपल्या सहका-यांना तो म्हणतो, "सहका-यांनो खंत का करता? आपला जन्मच झगडण्यासाठी झाला आहे. पळ काढणे हा आपला बाणा आहे का? तसे जगायचे असेल तर मग त्यापरीस जलसमाधी घेतलेलीच चांगली नाही का?"

आपल्या सहका-यांना खडे बोल सुनावताना तो पुढे म्हणतो, "या जगात कोट्यावधी जिवाणू रोज जन्माला येतात नि मरतात. जर आपण असे लाजिरवाणे जिणे जगलो, तर त्यांच्यात नि आपल्यात फरक काय?"

पुढे समुद्राला तो म्हणतो, "पैसा किंवा घराची उब आम्हाला थांबवू शकत नाही, मानवतेचे निशाण महासागरात मिरवणे आणि नवनवीन खंड जिंकून घेणे हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करूच."

पण कवितेत सगळ्यात लक्षवेधे आहे ते तिचे शेवटचे कडवे.

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला"

"मित्रांनो, ती शिडे गर्वाने वरती उभारा आणि या खुळ्या सागराला सांगा - अरे आमची ध्येयासक्ती अनंत आहे, आमची आशा अनंत आहे, तिला थांग नाही अन मोजमाप नाही. किनारा असेल तर तो तुला खुळ्यालाच!"

हे पक्के माहीत असल्यामुळेच की काय, मानव पाणी अडवून मोठाली धरणे बांधतो आहे, डोंगर पोखरून त्यांच्या पार जातो आहे, हवेत उड्डाण करून आकाशाला गवसणी घालतो आहे आणि मोठमोठी जहाजे समुद्रात हाकारून तो आपल्या कवेत करून घेतो आहे. मानवाची ही दुर्दम्य इच्छाशक्ती थक्क करणारी आहे आणि ती कवितारुपात अजरामर करणा-या कुसुमाग्रजांची प्रतिभाही!