Wednesday, December 29, 2010

पुणे - नाईलाजाने राहण्याचे शहर

'पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर' या आपल्या लेखात पुण्याविषयी बोलताना पुलं म्हणतात की कुठल्याही संभाषणात ख-या पुणेकराच्या तोंडी 'आमच्यावेळी असं नव्हतं बुवा' हे विधान कमीत कमी दहावेळा यायलाच हवे! एवढंच काय, पुण्यात हे वाक्य म्हणण्यासाठी वयाचं बंधन नसतं अशी पुस्तीही पुलं पुढे जोडतात. पुलंचे निरीक्षण नेहमीप्रमाणे अचूक असलं तरी आज मात्र हे वाक्य खरं ठरण्यासारखी परिस्थिती पुण्यावर आली आहे हे केवढे दुर्दैव!

मी पुण्यात आलो साधारण ९५ साली आणि मला हे शहर प्रथमदर्शनीच आवडले. आवडले म्हणजे अगदी मनापासून. इथे यायचे आणि या शहराला, इथल्या लोकांना नावे ठेवत इथलेच होऊन जायचे असा कद्रूपणा मी कधी केला नाही. मला वाटते, प्रत्येक शहराचाही एक स्वभाव असतो. पुण्याचा स्वभाव माझ्यासारखाच आहे, स्पष्ट बोलण्याचा. हे बोलणे वेळप्रसंगी कटू असते, पण असते अगदी मनापासून. पोटात एक नि ओठांवर एक असा खोटेपणा त्यात नसतो. मला या शहराने, इथल्या लोकांनी अगदी सहज सामावून घेतले. मला अजून आठवतो बसमधे लोअर इंदिरानगर स्टॉपची आठवण करून देणारा तो माणूस आणि माझ्या सायकलची किल्ली हरवल्यावर आपल्या दुकानातील सगळ्या किल्ल्या लावून तिचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करणारे ते काका. पुणे त्यावेळी खरोखरच एक टुमदार शहर होतं. त्याकाळी रस्त्यांवर तुरळक गर्दी असे, आजच्या सारखा माणसांचा गजबजाट त्यावेळी पुण्यात नव्हता. मला आठवतंय दुपारी कधीतरी रस्त्याने जायचा प्रसंग येई तेव्हा ते ओस पडलेले दिसत, एखाद्या गावातले रस्ते दुपारी ओस पडतात तसे. आणि शनिवारी सकाळी शाळा लवकर सुटत असल्यामुळे मी दहा वाजता घरी जाणारी बस पकडे तेव्हा तीही बहुतांश मोकळीच असे. पण साधारण २००० सालापासून पुण्यात आयटी उदयोगाला सुरूवात झाली आणि या शहराचा चेहरामोहराच बदलला. पुर्वी कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरूड आणि विश्रांतवाडी इथपर्यंत असलेले पुणे नंतर आंबेगाव, पौड रोड, धानोरी असे पसरत गेले. काही वर्षांपुर्वी ज्या भागात फुकट रहायलाही लोक तयार झाले नसते तो भाग आज शहराच्या मध्यवस्तीत आला आहे. दुपारीच काय, रात्री अकरा वाजताही पुण्यातले रस्ते आता वाहत असतात आणि बसेस? त्या तर अशा भरलेल्या असतात जणू वाटावं जणू आत्ताच निर्वासितांचे लोंढे पुण्यात येऊन थडकले आहेत. पुण्यातल्या याच रस्त्यांवर मी तीन वर्षे सायकल चालवली आहे, यावर आता माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. आजकालची कुठल्याही वेळी पुण्यातल्या रस्त्यांवर दिसणारी वाहनांची प्रचंड गर्दी पाहिली की असे वाटते या शहरात माणसांपेक्षा वाहनेच जास्त असावीत. बरोबर आहे, रस्ते वाढलेत थोडेसे, पण वाहने वाढलीत किती तरी पटीने, दुसरे काय होणार?

एकेकाळी सुखद हवामान आणि गारव्यासाठी प्रसिद्ध असलेले पुणे आता उन्हाळ्यात चाळीस अंशांपर्यंत तापते आहे. प्रदूषणाच्या बाबतीत तर काय बोलावे? त्याबाबतीत तर पुणे नवनविन विक्रम करते आहे. माणसांचे पीक उदंड झाल्याने की काय, त्यांमधला संवाद हरवला आहे. पुण्यातल्या वातावरणात असलेली शांतता, संथपणा, निवांतपणा हरवून त्याची जागा घाई, कलकलाट आणि धकाधकीने घेतली आहे. एकूणच पेन्शनरांचे पुणे हळूहळू एक महानगर बनते आहे; एक असे महानगर ज्यात माणसे नव्हे तर यंत्रमानव राहतात, भावना नसलेले, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे!

कुसुमाग्रज त्यांचे आवडते शहर - नाशिकबाबत बोलताना एकदा म्हणाले होते की 'नाशिकची वाढ होते आहे हे खरे, पण ती आता कुठेतरी थांबायला हवी. कारण वाढ एका मर्यादाबाहेर गेली की ती वाढ न राहता सूज वाटू लागते.' मला वाटते पुण्याची वाढ आता सूज न राहता गाठ बनू लागली आहे. ही गाठ थांबवायला हवी प्रखर राजकीय इच्छाशक्ती. आपल्या संधीसाधू, स्वार्थी नि आपमतलबी राजकारण्यांकडे ती आहे का? अनेक गंभीर समस्या समोर दिसत असूनही त्यांकडे कानाडोळा करणारे हे राजकारणी या संवेदनशील विषयावर काही ठळक भूमिका घेतील अशी अपेक्षाही करणे चूक आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार 'पुण्याची वाढ आता हाताबाहेर जात असल्याने पुण्यात येणा-या लोंढ्यांना मी विरोध करत आहे' असे म्हणत आहेत हे चित्र अजमल कसाब 'जय हिंद' म्हणतो आहे किंवा ए राजा 'आता मी कधीच भ्रष्टाचार करणार नाही' असे म्हणत आहेत या चित्रासारखेच अकल्पनीय आणि अचिंतनीय आहे. सबब, ते प्रत्यक्षात उतरणे कधीच शक्य नाही!

तात्पर्य काय, तर शांत, प्रदूषणविरहीत असलेले बिनगर्दीचे पुणे पुर्वी आवडीने राहण्याचे शहर होते, आता ते नाईलाजाने राहण्याचे शहर झाले आहे! आणि तूर्तास तरी पुण्याची दिवसेंदिवस होत असलेली दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहणे आणि 'आमच्या वेळी असे नव्हते बरे' असे सुस्कारे टाकणे एवढेच आपणा पुणेकरांच्या हाती आहे!

Sunday, December 19, 2010

आमची अंदमान सहल - भाग २

या तक्त्यात प्रत्येक बर्थवर आमच्या नावाबरोबरच दुस-या एका व्यक्तीचेही नाव दिलेले होते! आमची तिकिटे नक्की झालेली असूनही असे का झाले असावे? मी तक्ता पुन्हा एकदा बारकाईने पाहिला नि मला क्षणात या घोटाळ्याचा उलगडा झाला. एका बर्थवर दोन आरक्षणे होती. दादर ते पुणे आणि पुणे ते चेन्नै. पुण्याला उतरणारे प्रवासी निघून गेले होते, म्हणजे त्या जागा आता चेन्नैपर्यंत फक्त आमच्याच होत्या. मी स्वत:शीच हसलो आणि गाडीत शिरलो.

रेल्वेच्या प्रवासात विशेष काहीच घडले नाही. खिडकीतून बाहर पहाणे, स्टेशन आले की उतरणे, गाडी चालू झाली की धावत्या गाडीत शिरणे आणि कंटाळा आला की वरच्या बर्थवर झोपणे हे सारे प्रकार आळीपाळीने करून झाले. आमच्या शेजारी असलेले पुण्याचे एक कुटुंब अंदमानलाच निघाले होते, त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. असाच वेळ काढता काढता सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली आणि शेवटी एकदाचे ७:४५ झाल्यावर १९तास ३५ मिनिटांचा प्रवास संपवून आम्ही चेन्नैच्या एथंबुरू (Egmore) स्थानकावर उतरलो.

आम्ही रेल्वेस्थानकावर उतरलो खरे, पण आमच्यापुढे आता एक मोठी अडचण होती. आमचे विमान होते दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता. आणि विमानाची वेळ अशी अडचणीची होती की रात्रीपुरते एखाद्या हॉटेलात राहून दुस-या दिवशी सकाळी विमानतळावर जावे म्हटले तर तेही जमण्यासारखे नव्हते. तेव्हा रात्र अशीच ताटकळत काढण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हते. रेल्वे स्थानकावरची जत्रा पाहता रात्र तिथल्यापेक्षा विमानतळावर काढणे उत्तम असे वाटल्याने आम्ही तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. सामान उचलले आणि रात्री ११:१५ वाजताची तांबरमला जाणारी लोकल पकडली. साधारण अर्ध्या तासात विमानतळाशेजारीच असलेल्या तिरुसुलम स्थानकावर आम्ही उतरलो. इथून विमानतळ अगदी जवळच आहे; जवळ म्हणजे किती, तर अगदी हाकेच्या अंतरावर.

आम्ही विमानतळावर पोचलो असलो तरी अजून सहा तास कसे काढायचे हा प्रश्न होताच. तिथे अचानक मला आपण आज सकाळी आंघोळ केली नसल्याची आठवण झाली आणि अस्मादिकांनी तिथल्या बाथरूमात चक्क रात्री बारा वाजता शाही स्नान केले. आयुष्यात मी हजारो वेळा आंघोळ केली असेल, पण चेन्नै विमानतळावर भर रात्री गार पाण्याने केलेली ती आंघोळ मी आयुष्यभर विसरणार नाही!

शेवटी घड्याळाचे काटे सहावर पोचले आणि आमचे विमान ’उडानके लिये तैयार’ असल्याची घोषणा झाली. चेन्नै विमानतळावरून आमचे विमान पोर्टब्लेअरसाठी आकाशात झेपावले तेव्हा घड्याळात साडेसहा होत होते. इकीकडे दिवसाला सुरूवात होत होती तर दुसरीकडे आमच्या रोमहर्षक अंदमान सहलीलाही!

Friday, December 17, 2010

कलावंतीण किल्ल्यावर कब्जा

हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी एकही गडसहल न झाल्याने मी बेचैन झालो होतो. हे सगळे वर्षच तसे सुनेसुने गेले होते. आमच्या मित्रमंडळींची कहाणी काय सांगावी? आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशी त्यांची स्थिती. यावेळी हा यायला तयार तर दुस-याला काहीतरी काम, पुढच्या आठवड्यात तो यायला तयार तर पहिल्याचा नकार! माझ्या सात आकडी पगार मिळवणा-या एका मित्राचे बहाणे ऐकून तर मनमोहनसिंग साहेबांसोबत एखाद्यावेळी किल्ल्यावर जाणे होईल पण याच्याबरोबर नाही असे मला पक्के वाटू लागले होते. तेव्हा मित्रांचा नाद सोडला आणि मामेभावाला पकडले. १२ डिसेंबरची तारीख नक्की केली आणि किल्लाही - पनवेलजवळचा देखणा 'कलावंतीण'.

पहाटे सहा वाजता घराबाहेर पडायचे असे आम्ही ठरवले होते खरे, पण एवढी कडाक्याची थंडी असल्यावर ते जमणार कसे? पाण्याची बाटली, कॅमेरा, जॅम आणि ब्रेड मोठ्या सॅकमधे टाकून आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा घड्याळात बरोबर ०६:४० होत होते. डोक्याला हेल्मेट, अंगात स्वेटर, जाड जीन्स, हातमोजे आणि पायात बूट असा जामानिमा असूनही थंडी सुयांसारखी शरीराला अगदी टोचत होती. त्यातच सकाळी रस्ता मोकळा असल्यामुळे आम्ही गाडी भरधाव सोडलेली. तळेगाव, लोणावळा, खोपोली गावं पटापटा मागे पडली. गाडी शंभरने मारल्यामुळे पनवेल टोलनाक्यापुढच्या शेदुंग फाट्याला (अंतर ११५ कि.मी.) आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला घरातून निघून फक्त एक तास पंचेचाळीस मिनिटं झाली होती. बहुतेक वाहने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करत असल्याने जुन्या पुणे मुंबई रस्त्याला आता फारशी गर्दी नसते. त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंद अगदी वारेमाप घेता येतो. अर्थात रस्त्याची स्थिती फारशी चांगली नाही हे मात्र खरे.

शेदुंग फाट्यावरून आम्ही आत शिरलो आणि एका छोट्या डांबरी रस्त्याने आत जात ठाकूरवाडीला पोचलो. सदरचा रस्ता खाजगी आहे अशी माहिती एक फलक देत असला तरी आत जाताना आम्हाला कुणीच अडवले नाही. साधारण ५ कि.मी आत गेल्यावर आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली गाडी लावली. आता प्रश्न आला हेल्मेटचा! हे एवढे जड शिरस्त्राण आख्ख्या गडचढाईत हातात बाळगायला काहीच अर्थ नव्हता; तेव्हा आजूबाजूला कोणी नाही हे पाहून आम्ही ते शेजारील गवतात दडवले आणि गडाच्या दिशेने कूच केले. [पहा, आयटीत काम केले की अशा कल्पना सुचतात - उगाच नाही लोक आम्हाला हुशार समजत!] गड सोपा दिसत असला तरी तो तसा नाही हे चढायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आम्हाला कळले. किंबहुना हे सोपे दिसणारे गडच प्रत्यक्षात जास्त त्रास देतात!

नऊला आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि साधारण दीड तासात वरच्या ठाकूरवाडीला पोचलो. २०/२५ घरांचे हे एक लहानसे गाव आहे. इथल्याच एका घरात जेवणाची सोय आहे. जाताना इथे जेवण बनवायला सांगून जावे आणि किल्ला पाहून खाली आलो की त्याचा आस्वाद घ्यावा अशी चांगली सोय गडप्रेमींसाठी आहे. पण आमचे जेवण बरोबर असल्याने आम्ही काही इथे जेवणार नव्हतो. ठाकूरवाडीतील काही लोकांना कलावंतीणचा रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो आणि साधारण अर्ध्या तासात गडाच्या पाय-या जिथे सुरू होतात तिथे येऊन पोचलो.

कलावंतीण किल्ल्याच्या या पाय-यांचे फोटो मी आंतरजालावर आधीच पाहिले होते, प्रत्यक्षात मात्र त्या अधिकच भितीदायक दिसत होत्या. काही तर चक्क दोन फुट उंचीच्या होत्या. पण ज्या कुणी या पाय-या बनवल्या त्यांचे धन्यवाद द्यायला हवेत; त्यांच्याशिवाय या सरळसोट गडावर चढणे अशक्य बनले असते. थांबत चालत आम्ही या पाय-या पार केल्या नि एकदाचे वर पोचलो. एवढा अवघड किल्ला चढून वर आलो तेव्हा काहीतरी सुंदर पहायला मिळेल असे आम्हाला वाटत होते खास, पण इथे आल्यावर आमची निराशा झाली. किल्यावर पहायला काहीच नाही, अगदी पडके टाके किंवा मोडकळीस आलेली तटबंदीदेखील. किल्ल्याचा विस्तार तसा फार छोटा आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक भलामोठा दगडी सुळका आहे. थोडी कसरत करून आम्ही इथे चढलो, तेव्हा मात्र एवढ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

कडेचा प्रबळगड सोडला तर आजूबाजूची सगळी शिखरे आमच्यापेक्षा उंचीने कमी होती; त्यामुळे अगदी लांबलांबपर्यंतचा परिसर वरून स्पष्ट दिसत होता. गडावर फारसे बांधकाम का नाही या प्रश्नाचे उत्तर आत्ता आम्हाला मिळाले; फक्त टेहेळणीच्या कामासाठीच या किल्ल्याचा वापर होत असावा. वर असाच थोडा वेळ घालवल्यावर आम्ही काही फोटो काढले. (माउंट एवरेस्टवर गेलेले गिर्यारोहक जसे आपल्या दाव्याच्या पुष्टतेसाठी काढतात तसे. काय करणार? आमच्या मित्रमंडळींमधे काही खवट लोक आहेत हो...) वर पहायला काही नव्हते आणि जेवणासाठी सावलीही. तेव्हा आम्ही ठाकूरवाडीतच जेवण करायचा निर्णय घेतला आणि खाली उतरायला सुरूवात केली. ठाकूरवाडीत एका घराच्या पडवीत आम्ही ब्रेड-जॅम फस्त केला आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुन्हा रपेट सुरू केली. उतरणे एकदम सोपे होते, पाऊण तासात आम्ही खाली पोचलोही. नशिबाने आमचे शिरस्त्राण आम्ही सोडले तिथेच होते. घरी परतताना गाड्यांची प्रचंड गर्दी हा आमचा नेहमीचा अनुभव, पण यावेळी आम्ही अडीचलाच परतीचा रस्ता धरल्याने ती अडचण नव्हती. थकून भागून आम्ही घरी पोचलो तेव्हा घड्याळात फक्त सव्वाचार होत होते!

गड सर करून घरी पोचल्यावर सोफ्यावर बसून आल्याचा गरमागरम चहा घेण्याचा आनंद काय वर्णावा? चहाचे घुटके घेताना यावेळी तर दुहेरी समाधान आमच्या मनात होते; खूप दिवस हुलकावण्या देणारा कलावंतीण पाहिल्याचे एक आणि हा रविवार वांझ गेला नाही हे दुसरे!

Tuesday, November 30, 2010

बॅचलर पार्टी - एक चावट चित्रपट

बॅचलर पार्टी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या (नि आणखी ब-याच) गोष्टी ’बॅचलर पार्टी’ चित्रपटात ठासून भरलेल्या आहेत. टॉम हॅन्क्सचा हा चित्रपट मी पुर्वी अर्धामुर्धा पाहिला होता, नुकताच तो संपूर्ण पाहिला आणि पुन्हा एकदा हसून हसून अक्षरश: लोळायची पाळी आली.

ही कथा आहे ’रिक’ची. हा आहे एका शाळेचा बसड्रायव्हर. सरळ मनाचा, आपल्या मैत्रिणीवर मनापासून प्रेम करणारा, आपल्या मस्तीखोर मित्रांमधे रमणारा. थोडक्यात आयुष्य मजेत जगणारा एक स्वच्छंदी जीव. एके दिवशी रिक डेबीशी लग्न करण्याचा आपला निर्णय मित्रांना जाहीर करतो आणि त्यांना मोठाच धक्का बसतो. मित्र रिकच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करतात पण त्याचे अभिनंदनही करतात. आता रिक एवढा आवडता मित्र म्हटल्यावर त्याच्या लग्नाआधी एक झक्कास बॅचलर पार्टी नको? (रिकला लग्नाआधी मजा करायची शेवटची संधी म्हणून) लगेच एका बॅचलर पार्टीचे आयोजन होते. डेबी रिकला पार्टीसाठी परवानगी देते खरी, पण त्याच्याकडून तिच्याशी प्रामणिक राहण्याचे वचन घेऊनच. आता पार्टी सुरळीत पार पडायला काही अडचण नाही, पण इथे एक गोची आहे. ’कोल’ - डेबीच्या वडिलांनी तिच्यासाठी पाहून ठेवलेला मुलगा (जो डेबीला अजिबात आवडत नाही) रिक डेबीच्या नजरेतून उतरावा ह्या हेतूने ह्या पार्टीचे खरे रूप उघड करू पाहतो आहे.

चित्रपटात यानंतर जे काही होते त्या सगळ्यासाठी एकच शब्द आहे - ’अशक्य’. पुढचे एक तास रिक नि त्याचे मित्र चित्रपटात अक्षरश: गोंधळ घातलात, पण या सर्वांवर कडी करतो चित्रपटाचा शेवट. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या शेवटाला मी एवढा हसलो नव्हतो.(’ईट्स अ मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड’ चा अपवाद वगळता.) पण त्याबाबत लिहून मी वाचकांचा ’मजा’ किरकिरा करणार नाही, तो स्वत: पाहण्यातच मजा आहे.

काही चित्रपट खत्रूड नशीब घेऊन जन्माला येतात हेच खरे. तसे नसते तर ते बघताना ’अरे, हा चित्रपट एवढा सुंदर असूनही लोकांना का बरं आवडला नसेल?’ असे राहूनराहून वाटले नसते. ’बॅचलर पार्टी’ देखील असाच आहे. ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी तो विशेष चालला नाही. त्यातला विनोद इतर चित्रपटांशी तुलना करता हटकून हशा वसूल करणारा आहे आणि त्याला अश्लील म्हणावे तर त्यापेक्षा अधिक अश्लील (आणि क्वचित बीभत्सदेखील) चित्रपटांनी भरपूर गल्ला जमवलेला आहे. पण जग हे असेच चालत असते, विशेषत: चित्रपटांचे जग. त्याचे स्वत:चे काही खास नियम असतात. ते आपण सोडा, ब्रह्मदेवालाही उमगणे कठीण!

पण ते असो, आपण त्याची चिंता का करा? शेकडो चित्रपट पाहिल्यानंतर, एखादा चित्रपट किती चालला हा निकष तो चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी फारसा उपयोगी पडत नाही असे माझे स्पष्ट मत बनले आहे. तेव्हा माझे तरी तुम्हाला हेच सांगणे आहे - तुम्ही ब्रह्मचारी असाल किंवा नसाल, ही ’बॅचलर पार्टी’ अजिबात चुकवू नका!

चित्रपटाचा विकिपिडीया दुवा इथे आहे.

Sunday, November 28, 2010

आमची अंदमान सहल - भाग १

प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, माझीही आहेत. ’होंडा अ‍ॅकॉर्ड’ गाडी विकत घेणे, ऑस्ट्रेलियात जाऊन ’सिडने’ ते ’पर्थ’ असा मोटारप्रवास करणे आणि ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहणे ही त्यापैकी काही निवडक स्वप्ने. त्यापैकी ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले, त्याच स्वप्नप्रवासाची ही कथा आहे.

या प्रवासाची तयारी सुरू झाली ती जून/जुलै मधेच. मे मधे ’बदामी’ नि ’हंपी’ अशी सहल केल्यावर ’आता पुढची सहल कुठे’ अशी चर्चा झाली नि अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव नक्की झाले. पुणे ते चेन्नै असा प्रवास रेल्वेने नि चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास बोटीनेही करता येतो असे आम्हाला कुणीसे सांगितले खरे, पण सावरकरांना ज्या बोटीने नेले तीच बोट आजही वापरली जाते आणि चैन्नैला बसलेल्या लोकांपैकी अंदाजे निम्मेच लोक पोर्ट ब्लेअरला पोचतात असे कळल्यावर तो बेत रद्द झाला. एअर इंडियाच्या सेवेविषयी (नि हवाई सुंद-यांविषयी) फारसे चांगले ऐकले नसले तरी हा अनुभव बोटीपेक्षा नक्कीच सुखकारक असेल असे वाटल्याने शेवटी एयर इंडियाच्या महाराजालाच संधी देण्याचे ठरले.

विमानाची तिकीटे नक्की झाली, तेव्हा मी रेल्वे तिकिटांच्या मागे लागलो. पूर्वी रेल्वेच्या प्रवासात रेल्वेची तिकीटे काढणे नि प्रत्यक्ष रेल्वे प्रवास अशी दोन साहसे असत, रेल्वेने इंटरनेटवरही तिकिटे काढण्याची सोय केल्यापासून मात्र रेल्वेप्रवासाचे एकच साहस ते काय आता बाकी राहिले आहे. मी माझ्या वातानुकुलित कार्यालयात आरामदायी खुर्चीवर बसून रेल्वेची तिकिटे काढू शकेन असे मला काही वर्षांपुर्वी कुणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यातच काढले असते, सध्या मात्र महाजालाच्या कृपेने हे शक्य झाले आहे. ’टिम बर्नर्स ली’ साहेबाचे आभार मानावे तेवढे कमीच, बहुत काय लिहणे? सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकणा-या दादा लोकांसारखीच रेल्वे एजंट ही जमातदेखील काही वर्षांत नामशेष होईल की काय अशी मला आताशा भीती वाटते. असो, कालाय तस्मै नम: हेच खरे!

रेल्वेची तिकीटे मिळाली खरी, पण इथेही एक गोची होतीच. आमची रेल्वे सुटत होती रात्री (की पहाटे?) ००:१० वाजता. अनेकवेळा खात्री करूनच तिकिटे काढूनही ही तारीख चुकलेली आहे अशी भिती मला अगदी शेवटपर्यंत वाटत होती. माझे हे असेच आहे. अभियांत्रिकीचे पेपर देतानाही आपण अभ्यास करून आलोत तो पेपर आज नाहीच अशी भिती नेहमी मला वाटत असे. सुदैवाने तसे काही झाले नसले (माझे गुण पाहून काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत) तरी हा बागुलबुवा मला अजूनही त्रास देतोच.

असो, रेल्वेची तिकीटे मिळाली आणि मी थोडासा निर्धास्त झालो. यानंतर सुरू झाले माहिती मिळवण्याचे काम. गुगल साहेबांच्या कृपेने हेही आता खूपच सोपे झाले आहे. महाजालावर मी काही हॉटेले निवडली नि त्यांचे पैसे भरून टाकले. निदान पहिल्या दिवशी तरी हॉटेल आरक्षित केलेले असावे असा आमचा सहलीचा नियम आहे, जो आम्ही इथेही पाळला.

हा हा म्हणता दिवस गेले नि जाण्याचा दिवस उजाडला. शुक्रवार कामाचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्यांचा तेव्हाच निरोप घेतला होता आणि पूर्ण दिवाळी आम्ही सुट्टीवर असल्याने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही तेव्हाच झाली होती. सोमवारी पहाटे ००:१० वाजता आमची रेल्वे असल्याने रविवारी रात्री दहालाच निघणे क्रमप्राप्त होते, त्याप्रमाणे निघालो. मनाला आनंद होत असला तरी आत कुठेतरी थोडीशी धाकधूक होतीच. पुढचे १४ दिवस कसे जातील हा विचार सारखा मनाला त्रास देत होता. त्यात या सगळ्या सहलीचे नियोजन मीच केले असल्याने मला थोडी अधिकच चिंता होती. पण ’आता होईल ते होईल’ असे मी मनाशी म्हटले आणि आम्ही पुणे रेल्वेस्थानकात शिरलो.

जर गलिच्छ रेल्वे स्थानकांची स्पर्धा घेतली तर पुणे रेल्वे स्थानक त्यात नक्कीच पहिला नंबर पटकावेल असे माझे तरी स्पष्ट मत आहे. दिवाळी असल्याने लोकांची झालेली प्रचंड गर्दी, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच पसरलेल्या पथा-या, सा-या स्थानकभर पसरलेला लघवीचा वास हे सगळे सहन करताना फलाटावर साधे चालणेही मुश्किल झाले होते. प्रवाशांसाठी बांधलेल्या उड्डाणपुलावर तर कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरी सुरू होईल इतकी गर्दी होती. तरीही आम्ही त्या गर्दीत उडी घेतली नि आपल्या सामानासहित एकदाचे फलाट क्र. ३ वर पोचलो!

रेल्वे अस्वच्छ असली तरीही तिने प्रवास करणे मला आवडते. रेल्वेने प्रवास करताना ख-या भारताचे दर्शन घडते असे कुणीसे म्हटले आहे, आणि मला वाटते ते खरेच आहे. फलाटावरचे भिकारी, मोठी बोचकी घेऊन निघालेले मजूर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणारे शिष्ट श्रीमंत लोक आणि या सा-यांपासून स्वत:ला वेगळे ठेवणारे मध्यमवर्गीय असा एक अनोखा संगम तिथे दिसतो. असेच इकडेतिकडे पहाता पहाता वेळ कसा गेला ते कळलेही नाही नि एकदाचे १२:१० झाले. रेल्वे चक्क वेळेवर आलीही. तिकीटे नक्की झाली असल्याने डबा क्रमांक आणि बर्थ क्रमांक आमच्याकडे होतेच. आम्ही आमच्या S१ डब्याजवळ पोचलो आणि बाहेर लावलेल्या तक्त्यावर आमची नावे शोधू लागलो. तक्ता वाचताना मी एके ठिकाणी थबकलो, तिथला तो मजकूर पाहून मला आश्चर्याचा असा मोठा धक्का बसला म्हणता!

Friday, November 26, 2010

पुलंचे एक रटाळ पुस्तक

'पुलंचे एक रटाळ पुस्तक' हे शीर्षक वाचून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल (कदाचित चिडलाही असाल) यात काही शंका नाही. पुलं आणि रटाळ या दोन गोष्टी एका वाक्यात एकत्र येणे कदापि शक्य नाही असे त्यांच्या चाहत्यांचे मत आहे, आणि ते योग्यच आहे. पुलंचे जवळपास सगळेच लिखाण सकस आणि दर्जेदार आहे. पाट्या टाकणे हे काम पुलंनी आपल्या आयुष्यात कधीही केले नाही आणि त्यांची पुस्तके वाचतानाच काय, त्यांची भाषणे ऐकताना आणि त्यांचे एकपात्री प्रयोग पाहतानाही याची खात्री पटते. त्यामुळेच मी पुलंचा मोठा पंखा आहे आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची मी पारायणे केली आहेत.

असे असले तरी पुलंचे अगदी झाडून सगळे लिखाण उत्तम आहे असे म्हणणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करण्यासारखे ठरेल. कुठल्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच केले जायला हवे. ते करताना त्या साहित्यकृतीचा जनक कोण, त्याचे साहित्यातील योगदान काय या बाबी विचारात घेतल्या जाता कामा नयेत. पुलंचे सुरुवातीचे लेखन पाहिले की माझ्या विधानाची खात्री पटावी. पुलंच्या नंतरच्या लिखाणात दिसणारा सफाईदारपणा, सहजता, सराईतपणा त्यात नाही. अर्थात, हे साहजिकच आहे. लेखक हा शेवटी एक माणूसच, तोही प्रत्येक दिवसागणिक घडत, शिकत असतो. पण असे असले तरी त्यांच्या चाहत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. एखादी साहित्यकृती सामान्य दर्जाची म्हटली म्हणून तिचा लेखक सामान्य ठरला असे नाही. (आणि लेखक महान असला म्हणजे त्याची प्रत्येक साहित्यकृती महान असलीच पाहिजे असेही नाही!)

आता पुन्हा एकदा वळूयात या लेखाच्या विषयाकडे - तो म्हणजे पुलंचे 'खोगीरभरती' हे पुस्तक. 'खोगीरभरती' हे पुलंचे दुसरे पुस्तक. 'तुका म्हणे आता' या नाटकानंतर आलेले हे पुस्तक त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अगदी सुरुवातीला लिहिलेले आहे. पुस्तकात एकूण १७ लेख आहेत, त्यातली ४ भाषणे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे पुलंचे हे लिखाण त्यांचे सुरुवातीचे लिखाण आहे. एका नव्या लेखकाचा अननुभवीपणा त्यात अगदी स्पष्ट दिसतो. पुलं ज्या विनोदासाठी ओळखले जातात तो सहज नि स्वाभाविक विनोद या पुस्तकात जवळपास नाहीच असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. या पुस्तकातले सगळेच विनोद हे अगदी ओढूनताणून केल्यासारखे वाटतात. एका होतकरू लेखकाची छाप या पुस्तकातल्या प्रत्येक लेखावर अगदी स्पष्ट दिसते. 'नाटक कसे बसवतात' आणि 'पानवाला' हे लेख सोडले तर बाकीचे सगळे लेख हे काही सांगण्यासारखे किंवा लिहिण्यासारखे आहे या कारणापेक्षा एक विनोदी लेख लिहायचा म्हणूनच लिहिल्यासारखे वाटतात.

तसे असेल तर असो! पण या लेखाचा उद्देश काय हा प्रश्न उरतोच – 'पुलंच्या एका पुस्तकातले दोष दाखवणे' हा? नाही, उद्देश आहे 'अपयशाने खचून न जाता नेटाने पुढे जात रहावे' हा संदेश वाचकांना देणे. मला वाटते हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. काम कुठलेही असो, दर वेळी त्यात यश मिळेलच असे नाही, आपण प्रयत्न करीत राहणे महत्वाचे. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तरीही निराश न होता 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करीत रहायला हवे. आपल्या भाईकाकांनी हेच केले. आपले पहिले नाटक पडले आणि दुसरे पुस्तकही लोकांना फारसे आवडले नाही हे दिसूत असूनही त्यांनी नेटाने आपले काम सुरुच ठेवले. 'कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा मात्र लोकांना हसवण्याचा धंदा' हे पुलंच्या जगण्याचे सूत्र होते नि त्यांनी ते आयुष्यभर कसोशीने पाळले. अर्थात विनोदी लेखक एवढीच पुलंची ओळख नाही, जीवन म्हणजे काय आणि ते त्याची गोडी चाखत कसे जगावे हे त्यांनीच आपल्याला सांगितले. आपल्याला खाण्यावर, गाण्यावर, सुंदर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं ते त्यांनीच. एकूणच आयुष्य रसिकतेने कसं जगावं हे आपल्याला दाखवून दिलं ते त्यांनीच.

'खोगीरभरती'सारखे पुस्तक लिहिणा-या या पुलंनीच पुढे 'बटाट्याची चाळ', 'खिल्ली', 'उरलंसुरलं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अजरामर पुस्तके आणि 'तुझे आहे तुजपाशी','ती फुलराणी' यांसारखी नाटके लिहून मराठीजनांना वेडे केले हे लक्षात घेतले तर आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे!

Thursday, November 25, 2010

भारतीय लोकशाही अमर रहे!

नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सर्वसामान्य जनता काय, भल्याभल्या निवडणूक तज्ञांनाही या निकालाने तोंडात बोटे घालायला लावली. १/२ नव्हे, २/३ नव्हे, ३/४ही नव्हे तर तब्बल ५/६ बहुमत नितीशकुमारांनी मिळवले, आपल्याला एवढा मोठा विजय मिळेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल! स्वातंत्र्यापासून खितपत पडलेला बिहार आज ख-या अर्थाने स्वातंत्र्याची वाट चालू लागला आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये!

नितीशकुमारांचा हा विजय विकासाच्या आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीच्या मुद्द्यांवर आहे आणि यासाठी आपण बिहारी जनतेचे अभिनंदन करायला हवे. बिहारी जनतेला आपण दोष देत असलो तरी वस्तुस्थिती तशी नाही; आत्तापर्यंत परिस्थितीच अशी होती की त्यांच्या हाती करण्यासारखे काही नव्हते. इकडे आड नि तिकडे विहीर अशी दर निवडणुकीत त्यांची स्थिती होत असताना त्यांना दोष कसा देणार? पण जर कुणी काम करीत असेल तर जातीपातीचे राजकारण विसरून आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि यासाठी खरोखरच त्यांची पाठ थोपटायला हवी.


याचबरोबर हेही स्पष्ट आहे की हा लालूंचा नि गांधी द्विकुटाचाही पराभव आहे. जातीपातीचे किळसवाणे राजकारण करणारे आणि बिहारला ५० वर्षे मागे नेणारे लालूं यादव यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीच गोष्ट राहुल गांधींची. काँग्रेसने कितीही नाकारले तरी हा त्यांचा सरळसरळ पराभव आहे यात काय शंका? अनेक महत्वाच्या मुद्यांवर बिहारचा लक्षणीय विकास झालेला दिसत असूनही राहुल गांधीनी ही बाब मान्य केली नाही; याउलट बिहारमधे जो काही थोडाफार विकास झाला आहे तो केंद्रामुळेच अशी खोटी बतावणी त्यांनी केली. अरे वा रे वा! विकास झाला नाही की तो स्थानिक राजकारण्यांमुळे नि तो झाला की केंद्रामुळे? हा कुठला न्याय? आपण केवळ आपल्या करिष्याच्या जोरावर लोकांना जास्त वेळ गुंतवून ठेवू शकत नाही हे राहुल गांधींनी मान्य करावे आणि नुस्ती भाषणे करण्यापेक्षा विकासकामांकडे जास्त लक्ष द्यावे.

आता महत्वाचा प्रश्न! महाराष्ट्रात असे घडेल काय? याचे उत्तर सोपे आहे, अर्थातच नाही! आपण कितीही म्हटले तरी जातींचे राजकारण अजूनही महाराष्ट्रात चालू आहेच; मराठी माणूस बोलतो बराच, पण वेळ आली की आपल्या जातीतल्या माणसालाच मत देतो हे पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे. नितीशकुमारांसारखा कुठलाही जाती-आधार नसलेला नेता मुख्यमंत्री होणे ही बाब महाराष्ट्रात तरी अशक्य आहे. याशिवाय नितीशकुमारांसारखा कर्तबगार कुणी नेताही विरोधी पक्षाकडे नसणे हाही मुद्दा आहेच. म्हणजे सत्ता काँग्रेस आघाडीकडून काढायची, पण द्यायची कुणाला? गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना? या कारणामुळे बिचारा मराठी मतदार 'दगडापेक्षा वीट मऊ' असे म्हणत पुन्हा आघाडीलाच संधी देतो हे आपण मागे पाहिले आहेच.

ते असेल ते असो, पण बिहारमधल्या या निवडणुक निकालाने सगळ्या जगाला भारतातल्या लोकशाहीची एक चु़णूक दाखवली आहे आणि माझ्या मते हेच सगळ्यात महत्वाचे आहे! भारतीय लोकशाही अमर रहे!

Wednesday, October 20, 2010

एका कार्यक्रमाचा मृत्यु!

दूरदर्शन पडद्यावर एक काळ गाजवलेल्या, आपल्या वेळी प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकसंख्येचे नवनविन विक्रम करणा-या एका कार्यक्रमाचा गेल्या सोमवारी तडकाफडकी मृत्यु झाला, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. बरोबर! 'कौन बनेगा करोडपती' हाच तो कार्यक्रम. सध्या सुरू असलेला कार्यक्रम हा मूळ कार्यक्रमाचे भूत आहे नि त्याचे उथळ स्वरूप पहाता त्याला 'कौन बनेगा मेरा पती' असे एखादे सवंग नावच शोभून दिसेल असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही काय म्हणता?

केबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत!

पण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख! हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले! अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार? अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.

या नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्‍या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा! सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते? तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे! आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती! कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह! ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल? हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा! हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला!

अमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले! हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात?

भारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं?

Thursday, October 14, 2010

या ’बडे खॉं’ना कुणीतरी आवरा...

आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट नि विविध वाहिन्यांवर दिसणा-या जाहिराती पाहून या देशात १९६५ नंतर कुणी नविन बाळ जन्मालाच आले नाही असे एखाद्याला वाटले तर मी त्याला दोष देणार नाही. मला तरी असेच वाटते बुवा! आपली मुलगी शोभेल अशा वयाच्या तरूणीला चिठ्ठ्या पाठवणारा शाहरूख, आपल्या मित्राची धाकटी मुलगी शोभेल अशा दिपिकासोबत गाणी गाणारा सैफ आणि आपल्या तरूण मेव्हणीसारख्या दिसणा-या असीनबरोबर इष्कबाजी करणारा अमीर पाहून आणखी काय वाटावे?

म्हणजे मी या खानांच्या विरोधात नाही, एक शाहरूख खान सोडला तर बाकीच्या दोन खानांविषयी माझे मत चांगलेच आहे. अमीर खान एक चांगला, चोखंदळ अभिनेता आहे आणि सैफ अली खानचा तर मी काही वर्षांपुर्वी चक्क एक चाहता होतो. (आठवा ते 'नीला दुपट्टा पीला सूट...' गाणे) पण मला वाटते आता खरेच 'बास!' असे म्हणायची वेळ आली आहे. ह्यांना अजून किती सहन करायचे? आणि का? म्हणजे ह्या खानांचे वय वाढले याबाबत माझी तक्रार नाही. तुम्ही जन्माला आलात त्याअर्थी तुमचे वय हे वाढणारच. माझा आक्षेप आहे ह्या खानांनी तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यावर. शाहरूख खानची 'फौजी'ही मालिका आल्याला आता जवळजवळ दोन दशके होऊन गेली. तेव्हाचा नि आजचा शाहरूख यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्याचे चाहतेही मान्य करतील. कुठे तो रसरशीत चेहे-याचा शाहरूख आणि कुठे आजचा थकलेला नि डोळ्यातली चमक हरवलेला शाहरूख. त्या जाहिरातीत झोपलेल्या टिनाच्या खोलीत कागदाचे बोळे फेकताना पाहून त्याला विचारावेसे वाटते, 'काय लिहिलेयेस त्यात? टिना, उद्या माझी मुलगी तुझ्याबरोबर येणार आहे, तिला न घेता कॉलेजला जाउ नकोस हो!' हेच ना? आमीरचीही तीच गत. आठवा तो 'अंदाज अपना अपना' मधला 'आयला...' म्हणणारा कोवळा आमीर नि त्या तुलनेत आजचा 'थ्री इडियटस्'मधला निबर आमीर. आणि सैफबाबत काय म्हणावे? 'मै खिलाडी तू अनाडी'मधल्या सैफला कोवळी काकडी म्हटले तर आजच्या सैफला दुधी भोपळा म्हणावे लागेल! एका नविन जाहिरातीत दाढी वाढवलेला सैफ करिनाच्या मागे पळताना पाहून मला तर असे वाटते की एखादा गुंडच तिच्या मागे लागला आहे!

या अभिनेत्यांनी सिनेमासृष्टीत रहावे, वेगवेगळ्या भूमिकाही कराव्यात, पण आपले वाढते वय लक्षात घेता त्यांमधे बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला नको का? जीवननदी पुढेपुढे जात असताना हे अभिनेते मात्र आजही नदीकाठच्या झाडाची मुळे पकडून एकाच जागी उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, हे हास्यास्पदच नाही का? अर्थात् आपण आता तरूण राहिलो नाही हे मान्य करायला नि आपल्या भुमिकांमधे बदल करायला विलक्षण धैर्य लागते, या अभिनेत्यांकडे ते आहे का?

हे झाले या अभिनेत्यांचे वागणे, पण मी म्हणतो ह्या जाहिराती नि हे चित्रपट बनवण-यांनी तरी डोके वापरावे की नाही! हे नट काय, पैसे मिळवायलाच बसले आहेत, पण या लोकांनी त्यांना का घ्यावे? यांच्याकडे पर्याय कमी आहेत का? इम्रान हाश्मी आहे, रणबीर कपूर आहे, शाहिद कपूर आहे आणि यांपैकी कुणी तयार नसेल तर सगळ्यांचा आवडता हिमेश रेशमिया आहे, त्याला घ्या नि करा की हव्या तेवढ्या जाहिराती नि सिनेमे! पण जनतेला म्हातारचाळे आवडतात असा गैरसमज करून घेतलेल्या या लोकांना कोण समजवणार?

अरे कुणी आहे का तिकडे? जमल्यास या 'बडे खॉं'ना आवर घाला रे!

Wednesday, October 13, 2010

’महाराष्ट्र देशा’ - उद्धव ठाकरेंचे देखणे पुस्तक

या शनिवारी आचार्य अत्रे सभागृहावरून जाताना एका पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात नि त्यांचा 'सरसकट २०% सूट' असा फलक पाहिला नि क्षणभर थबकलो. हाताशी थोडा वेळ होता, तेव्हा आत गेलोही. खरेतर या पुस्तक प्रदर्शनांमधे वेगळे काही नसते. आचार्य अत्रे सभागृहात होणारी ही प्रदर्शने तर आता मला पाठ झाल्यासारखी झाली आहेत. बाहेर दिवाळी अंक नि फुटकळ पुस्तके, आत गेल्यावर पहिल्यांदा इंग्रजीतून अनुवादित झालेली मराठी पुस्तके, नंतर आचार्य अत्रे नि पु ल देशपांडे ह्यांची पुस्तके, त्यापुढे कथासंग्रह, परचुरे प्रकाशनवाल्यांचे एक टेबल, मधे काही बालपुस्तके नि मग शेवटी इंग्रजी पुस्तके असे या प्रदर्शनांचे साधारण स्वरूप असते. पण असे असले तरी मी इथे आवर्जून जातो आणि नाही म्हटले तरी ३००/४०० रुपयांची खरेदी होतेच.
 
यावेळीही असाच आत गेलो नि आत शिरताक्षणीच माझे लक्ष वेधून घेतले एका लंब्याचवड्या पुस्तकाने. 'पाहूया तरी खरे' असे म्हणत ते पुस्तक मी हातात घेतले नि क्षणार्धात त्यात गुंतून गेलो. पुस्तक होतेच तसे. महाराष्ट्रातले गड, धार्मिक स्थळे आणि इतर प्रसिद्ध वास्तू यांची आकाशातून घेतलेली छायाचित्रे असे त्याचे स्वरूप होते. या सा-या छायाचित्रांचे छायाचित्रक होते शिवसेना नेते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचे हवाई चित्रण करणारे असे पुस्तक मी मराठीत काय, इंग्रजीतही कधी पाहिले नव्हते. पुस्तकाची किंमतही फारच माफक म्हणजे फक्त १०० रुपये होती, तेव्हा ते लगेच विकत घेतलेही.
 
सुमारे १०० पानांच्या ह्या सुंदर पुस्तकाचे वाचन पूर्ण करूनच आता हा लेख लिहितो आहे. प्रत्येक पानावर एक छायाचित्र नि त्याशेजारी त्यावरची छोटी टिप्पणी अशी पुस्तकाची साधारण मांडणी आहे. पुस्तकातली काही (७ ते ८) चित्रे आपल्याला ओळखीची वाटतात कारण आपण ती पुर्वी पाहिलेली आहेत. बरोबर, काही वर्षांपुर्वी महाजालावर ढकलपत्रांच्या स्वरूपात फिरत असलेली गडचित्रे ती हीच. पण अशी चित्रे फारच थोडी; पुस्तकातली बहुसंख्य चित्रे नविन (निदान मला तरी) आहेत. पुस्तकाचे लगेचच जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दर्जा; तो खरोखरच उत्कृष्ट आहे. गुळगुळीत पाने आणि त्यावरची प्रत्येक बारकावा जिवंत करणारी सुबक छपाई यामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झाले आहे. मी तर म्हणेन, मी पाहिलेल्या अशा परदेशी पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा दर्जा तसूभरही कमी नाही. मराठी पुस्तकांचा तांत्रिक दर्जा चांगला नसल्याचे रडगाणे गाणा-यांना निदान हे पुस्तक न वाचण्यासाठी तरी हे कारण पुढे करता येणार नाही!
 
आता थोडेसे पुस्तकाचे मुख्य आकर्षण असलेल्या त्यातल्या छायचित्रांविषयी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल अनेकांची वेगवेगळी मते असली तरी सदर छायाचित्रांवरून ते एक उत्कृष्ट छायाचित्रणकार आहेत याबाबत एकवाक्यता होण्यास हरकत नसावी. छायाचित्रे आकाशातून काढल्यावर ती चांगली येणारच असे काही जण म्हणतील, मी मात्र त्यांच्याशी सहमत होणार नाही. प्रत्येक छायाचित्राचा कोन(Framing), चौकट निवडण्याची पद्धत(Composition), त्याची स्पष्टता(Sharpness), त्यातली रंगसंगती(Combination of colors) या सा-या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी काढलेली छायाचित्रे पैकीच्यापैकी गुण मिळवतात. अर्थात् ही छायाचित्रे आपल्या आपुलकीचा विषय असलेले किल्ले नि आपल्या परिचयाची प्रसिद्ध स्थळे यांचे एका वेगळ्या दृष्टीने चित्रण करणारी असल्याने आपल्याला अधिक जवळची वाटतात हेही खरे. पण या पुस्तकात फक्त प्रसिद्ध जागांचीच चित्रे नाहीत, नांगर धरणारे शेतकरी, भातलागवड करणारे मजूर, तलावात डुंबणा-या गाई आणि घाटाघाटांमधले रस्ते अशी काही चित्रेही त्यात आहेत. पेंटिंग नि छायाचित्र यातील सीमारेषा धूसर करणारे छायाचित्र ते सर्वोत्तम छायाचित्र असे मानले तर या पुस्तकातली बरीचशी छायाचित्रे ही अट नेमकेपणाने पूर्ण करताना दिसतात. किना-यावर विश्रांती घेणा-या बोटींचं किंवा नाना रंगांची खाचरं दाखवणारं चित्र ही याची उत्तम उदाहरणे.
 
महाराष्ट्रातले डोंगर, नद्या, मंदिरे नि दर्ये यांवर प्रेम करणा-यांबरोबरच छायाचित्रणाचा छंद असलेल्या व्यक्तींनाही आवडेल असे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राचे चित्ररूप दर्शन आपल्या वाचकांना घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या पुस्तकातून केला आहे आणि माझ्या मते ते त्यात १००% टक्के यशस्वी झाले आहेत. खिशाला परवडणारे असल्यामुळे, ते विकत घेण्यासही काही अडचण नाही. मी तर म्हणेन, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी घरात हे पुस्तक असायलाच हवे!
 
महाराष्ट्र देशा
उद्धव ठाकरे
प्रबोधन प्रकाशन
सहावी आवृत्ती (१६ ऑगस्ट २०१०)
मूल्य : रू. १०० फक्त
 
ता.क. 'सरसकट २०% सूट'असा फलक 'शुभम साहित्य'ने या प्रदर्शनात लावला असला तरी या पुस्तकावर मात्र त्यांनी फक्त १० टक्केच सूट दिली. हा प्रकार लक्षात घेता पैसे देताना आपले बील व्यवस्थित तपासून घेणे उत्तम!

Wednesday, October 6, 2010

भारतातल्या दोन आनंददायी घटना

गेल्या काही दिवसात भारतात दोन आनंददायी घटना घडल्या. देशातली सध्याची परिस्थिती पाहून त्याचे काही खरे नाही असे वाटण्यासारखी वेळ आली होती खरी; सदर घटना मात्र मनाला आनंद देणा-या नि चला 'होत असलेले सगळेच काही निराशाजनक नाही' असा दिलासा देणा-या ठरल्या!

पहिली घटना म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला निकाल दिल्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त केलेली संयत प्रतिक्रिया नि करोडो भारतीयांनी त्यांना दिलेली साथ. हा निकाल देण्याआधी सरकारने मोठमोठ्या जाहिराती देऊन नि नागरिकांना भावनिक आवाहने करून असे काही वातावरण तयार केले होते की वाटावे त्या दिवशी जणु जगबुडीच होणार आहे! मला तर असे वाटत होते की क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला की आनंद साजरा करण्यासाठी आतूर झालेले नागरिक जसे घराबाहेर पळतात नि फटाके फोडतात अगदी तसेच न्यायालयात न्यायाधीशांनी निकाल वाचताक्षणीच लोक बाहेर पडतील नि गोळीबार सुरू करतील. पण सुदैवाने असे काही घडले नाही! १९९२ सालच्या नि आजच्या भारतात पडलेला मोठा फरक हे असे होण्यामागचे महत्वाचे कारण. धर्माच्या छत्रीखाली भारतीय तरूणांना गोळा करणे सोपे नाही हे सा-याच चतुर राजकरण्यांना नि धार्मिक नेत्यांना आता कळून चुकलेले आहे. लोक आता ह्दयाऐवजी डोक्याने विचार करू लागले आहेत हे त्यांना समजले आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे नि अशा घटनांमधे आपली उर्जा वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही हे भारतीयांना (विशेषतः तरूणांना) पटते आहे. आमचा तिरस्कार नि द्वेषापेक्षा प्रेम नि बंधुभावावर अधिक विश्वास आहे हे भारतीय तरूणांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे नि मला वाटते याबद्दल आपण त्यांचे कौतुक करायला हवे.


दुसरी घटना म्हणजे नवी दिल्ली येथे झालेले 'राष्ट्रकुल स्पर्धांचे' दिमाखदार उद्घाटन. ही स्पर्धा भारताकडे यजमानपद आल्यापासून फक्त नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत राहिलेली होती. स्पर्धेसाठीची स्टेडीयम्स वेळेत तयार होतील की नाही हा प्रश्न, त्यांच्या दर्जाबाबतचा प्रश्न, खेळाडू राहणार आहेत त्या इमारतींच्या दर्जाचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न असे सारे प्रश्न पुन्हापुन्हा विचारले जात होते. त्यातच या स्पर्धेतून काही नामवंत खेळाडूंनी माघार घेणे, स्पर्धेसाठीचा पादचारी पूल पडणे, खेळाडूनिवासात साप सापडणे अशा घटना घडल्या नि स्पर्धेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परदेशी माध्यमे तर या स्पर्धा रद्दच होणार आहेत (किंवा व्हाव्यात) असेच चित्र जगासमोर मांडत होती, पण तसे काही घडले नाही. डोळ्यांचे पारणे फेडील अशा दिलखेचक नि चित्ताकर्षक सोहळ्याने या स्पर्धेचे उद्घाटन झाले नि 'ज्याचा शेवट गोड ते सारे गोड' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. या सोहळ्यात मला व्यक्तिश: आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे बॉलीवूडचा कमीत कमी सहभाग नि कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा झालेला प्रयत्न. अर्थात हा सोहळा यशस्वी झाला म्हणून आपले सारे गुन्हे माफ या भ्रमात कलमाडी व कंपनी यांनी राहू नये. त्यांच्या वागण्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल नि जर तो मिळाला नाही तर जनतेने तो त्यांच्याकडून मागून घ्यायला हवा.

ता.क. : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेकडे वळून पाहताना एका माजी कारसेवकाच्या मनात आलेले विचार येथे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms] वाचता येतील.

Thursday, September 30, 2010

कोसला - मराठीतली माझी सगळ्यात आवडती कादंबरी

'औदुंबर'कवितेविषयी लिहिताना मी मागे असे म्हटले होते की या कवितेविषयी जेवढे आजपर्यंत लिहिले गेले आहे, तेवढे दुस-या कुठल्याच कवितेविषयी लिहिले गेले नसेल. हाच निकष जर कादंब-यांना लावला तर हा मान नक्कीच 'भालचंद्र नेमाडे'यांच्या कोसलाला जाईल. कोसलावर आजपर्यंत लिहिले गेलेले सारे लिखाण एकत्र केले तर ते नक्कीच कोसलाच्या शंभर प्रतींइतके भरेल. अर्थात या कादंबरीचे तोंड भरून कौतुक करणा-यांबरोबरच तिला मोडीत काढणा-यांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष. कोसलाबाबत आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर तिच्या बाजूने असता किंवा तिच्या विरूद्ध तरी. म्हणजे देवावरच्या श्रद्धेसारखं, आस्तिक किंवा नास्तिक, मधलं काही नाही. आमच्या साहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर ह्या कादंबरीविषयी तुमची दोनच मते असू शकतात. 'गेल्या दहा हजार वर्षांत अशी कादंबरी झाली नाही!' असे किंवा 'ही कादंबरी महाभिकार आहे!' असे तरी. ही कादंबरी ठीकठाक वाटली असे म्हणणारा मनुष्य मला अजूनतरी भेटायचा आहे!

लेखाचे कारण म्हणजे नुकतीच कोसलावर एका मराठी संकेतस्थळावर झालेली चर्चा. ही कादंबरी मला अतिसामान्य वाटली असे मत या चर्चेच्या निवेदिकेने नोंदवले. माझ्या मते, सगळ्यात प्रथम, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले मत मांडल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. हा खरेपणा महत्वाचा, इतरांचा विचार करून दिलेले मत, मग ते कसेही का असेना, काय कामाचे? म्हणजे, कोसला कादंबरी मोठी असेलही, पण मी म्हणतो, 'ती महाभिकार आहे' असे म्हणण्याचे स्वातंत्र्य त्यापेक्षा मोठे आहे. या स्वातंत्र्याचा आपण सगळ्यांनीच आदर केला पाहिजे, अगदी माझ्यासारख्या कोसलाच्या चाहत्यांनीदेखील.

मला विचाराल तर, कोसला ही मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे असे माझे मत आहे. मला असे का वाटते? माझ्या मते याचे कारण सोपे आहे, ही कादंबरी मला आपली वाटते, ती माझ्या मनाच्या तळापर्यंत जाऊन भिडते, कोसलातला पांडुरंग सांगवीकर मला अगदी जवळचा वाटतो. असे का वाटत असेल? हा पांडुरंग अगदी ख-या पांडुरंगासारखाच निरागस नि निष्पाप आहे म्हणून कदाचित. 'मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे.' अशी त्याच्या आत्मकथनाची सुरुवात तो करतो नि एका क्षणात तुम्हाला आपलेसे करतो. तो आपल्याला सारं काही सांगतो, त्याच्या कॉलेजाविषयी, तिथल्या त्याच्या फजितींविषयी, वडिलांशी झालेल्या त्याच्या वादांविषयी, आईवरच्या त्याच्या प्रेमाविषयी, त्याच्या बहिणींविषयी, त्याच्या एकूण अयशस्वी आयुष्याविषयी. अगदी जवळच्या मित्राला सांगावे तसे. आणि मग त्याचे हे आयुष्य त्याचे रहातच नाही, ते आपले बनते. तुम्ही स्वत:ला पांडुरग सांगवीकरमधे शोधू लागता. पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यावर गडबडलेला पांडुरंग, मित्रांना स्वखर्चाने चहा पाजणारा पांडुरंग, मेसच्या भानगडीत सापडणारा पांडुरंग, आजूबाजूचे 'थोर' लोक पाहून आपणही त्यांच्यासारखे व्हावे अशी इच्छा धरणारा पांडुरंग आणि आपल्या बहिणीच्या अकाली जाण्याने व्यथित झालेला पांडुरंग. पुण्यात सहा वर्षे काढून नि वडीलांचे दहा बारा हजार वर्षे खर्चूनही हा घरी परततो तो पदवीशिवायच. त्याच्या वडिलांच्या शब्दांत, 'तुला बारा हजारांनी गुणलं तरी सहासात वर्षांचा गुणाकार शून्यच'. आयुष्याची लढाई यशस्वी झालेल्या नायकांची अनेक चरित्रे वाचलेली असली तरी का कोण जाणे, रुढार्थाने आयुष्यात अपयशी झालेल्या पांडुरंग सांगवीकरशी तुम्ही जास्त जवळीक साधता. मजेची गोष्ट आहे नाही ही?

कोसलाचे आणखी एक आकर्षण म्हणजे भालचंद्र नेमाड्यांची भाषा. किंबहुना मराठी भाषेला असा सहज वळवणारा लेखक मी जी ए कुलकर्ण्यांनंतर अजूनतरी दुसरा पाहिलेला नाही. एखाद्या रंगाधळ्या माणसाला अचानक रंग दिसू लागल्यानंतर जसे वाटेल अगदी तसेच नेमाड्यांची ही मराठी वाचताना वाटते. कोसल्यातल्या प्रत्येक वाक्याला हा 'नेमाडे' स्पर्श आहे. 'पण मी अगदी सगळंच सांगणार नाही. कारण ते तर माझ्या सद-यांनासुद्धा ठाऊक आहे.' 'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारून टाकून तिच्या कातड्याचा डफ करून त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.' 'पण ज्या अर्थी बापानं आपल्याला विकत घेतलं त्या अर्थी हा गृहस्थ आता आपला बाप लागत नाही. हा आपला मालक, आपण ह्याच्या खानावळीत जेवतो.' 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच' ही काही उदाहरणे.

समीक्षकांनी पांडुरंग सांगवीकर या व्यक्तीरेखेचे अनेक अर्थ काढले. कुणाला त्याचे जगणे 'सारे काही मिथ्या आहे' या अंतिम सत्याचे एक उदाहरण वाटले तर कुणाला तो गौतम बुद्धासारखा वाटला. कुणाला त्याच्या गरीब मित्रांचे जगणे चटका लावून गेले तर कुणाला त्याच्या बहिण मनूचे जाणे. मला मात्र पांडुरंग सांगवीकर असामान्य वाटला तो आधी सामान्य आहे म्हणूनच. नेमाड्यांनी स्वतः अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे 'शंभरातल्या नव्याण्णवांसारखा' - खूप काही करायला जाणारा, सगळ्यांपासून वेगळं बनू पाहणारा नि शेवटी सर्वसामान्यांसारखंच जगणारा. तुमच्या आमच्यासारखा!

तर अशी आहे ही कोसला. ती तुम्हाला आवडो, न आवडो, पण तिला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे मात्र खरे!

Wednesday, September 29, 2010

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली माझी पाच वर्षे आणि काही अनुभवाचे बोल

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मी नुकतीच पाच वर्षे पूर्ण केली. पाच वर्षे हा काही फार मोठा काळ नव्हे असे काही लोक म्हणतील, पण १९९० साली भारतात संगणक आले नि संगणक प्रणाली निर्माण [Software developement] या क्षेत्राला साधारण ९८ सालापासून सुरुवात झाली असे मानले तर उण्यापु-या १२ वर्षे जुन्या या क्षेत्रात मला एक 'अनुभवी माणूस' म्हणण्यास हरकत नसावी! (पण मी पुणेकर असल्याने तशीही या स्पष्टीकरणाची काही गरज नाही; सच्च्या पुणेकराला कुठल्याही गोष्टीवर अधिकारवाणीने मतप्रदर्शन करण्यासाठी कसल्याही पात्रतेची गरज नसते.)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माझी सुरूवात झाली एका लहानश्या कंपनीत. ह्या कंपनीत मी काय काम केले हे सांगणे मोठे अवघड आहे. (याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रश्नाचे उत्तर मला त्या कंपनीत असतानाही देता आले नसते.) इथे माझ्या साहेबांनाच काही काम नव्हते, तर मला कुठून मिळणार? तिथे मी संपूर्ण कालावधीत फक्त एक .html पान एका .aspx पानामधे बदलल्याचे आठवते. अर्थात ह्या कंपनीतला माझा पगारही मी करत असलेल्या कामाला साजेसाच होता. काही खोचक वाचक 'कमी म्हणजे नेमका किती?' असे विचारतील, त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी दर महिन्याला घरी नेत असलेला पगार पाच आकडे पार करत नसे.

सकाळी नऊ वाजता कार्यालयात येणे नि संध्याकाळी सहाला घरी जाणे या मधील वेळात नवनविन संकेतस्थळे शोधणे आणि ती वाचणे हा इथे माझा एककलमी कार्यक्रम होता. (ह्या माहितीचा मला पुढे फार उपयोग झाला!) इथे एक गोष्ट मात्र चांगली होती, माहिती संकलन [Content developement] हया विभागात ब-याच सुंदर कन्यका असल्याने मानेला चांगला व्यायाम होत असे. तरीही काही महिन्यांतच मी ह्या नोकरीला कंटाळलो नि रुजू झाल्यापासून दहा महिन्यांच्या आतच मी तिला रामराम ठोकला.

दुसरी कंपनीही छोटीशीच होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती जुन्या कंपनीच्या इमारतीतच, पण वरच्या मजल्यावर होती. (लोक रूढार्थाने जातात, मी ख-या अर्थाने नोकरीत वर वर जात होतो!) इथे मात्र माझा पार पिट्टा पडला. जुन्या कंपनीत जेवढे काम मी १० महिन्यात केले नसेन, तेवढे काम मी इथे एका आठवड्यात केले. इथे माझे साहेब होते 'सोर' सर. (आड)नाव विचित्र वाटत असले तरी हे साहेब मराठीच होते. वयाने तरूण असले तरी 'साहेब' हा शब्द उच्चारला असता जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अगदी तशाच वृत्तीचे हे सद्गृहस्थ होते. आम्हाला मानसिक त्रास देण्यात ह्या 'सोर' साहेबांना अगदी असूरी (की 'सौरी'?) आनंद होई. प्रामाणिकपणे सांगतो, आज इतकी वर्षे होऊनही ह्या साहेबांविषयी माझे मत जराही बदललेले नाही. ह्या साहेबांचा चेहरा समोर आला की त्यांचे ते बसके नाक एक ठोसा मारून int चे short बनवावे असे आजही मला वाटते! तीन महिन्यांतच या कंपनीलाही मी रामराम ठोकला नि सध्याच्या कंपनीत रुजू झालो. इथे मी चार वर्षे आहे. काम चांगले आहे, पगारही पोटापुरता आहे; एकंदर दिवस बरे चालले आहेत!

असो, ही कहाणी पुरे झाली, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षे घालवल्यानंतर काढलेले निष्कर्ष आता मी तुमच्यासमोर मांडतो. माझ्या आयुष्याचे सिंहावलोकन [भारी शब्द आहे नै हा?] करत असताना ठळकपणे आठवणारे रम्य रस्ते नि धोकादायक वळणे मी शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवतो आहे, या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या नवोदितांना या आठवणी सहाय्यकारी ठरतील अशी आशा करतो! [बापरे!]

माझ्या मते, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी हव्यात.

१)आत्मविश्वास : सोप्या शब्दांत सांगायचे तर आत्मविश्वास म्हणजे आपण काहीही करू शकतो हा विश्वास. अगदी काहीही, म्हणजे नऊ बायका उपलब्ध असतील तर एका महिन्यात मूल जन्माला घालणे किंवा 'विन्डोज सेवन' सारखी संगणक प्रणाली दोन महिन्यात बनविणे इ. कामे. आत्मविश्वास असेल तर बाकीचे कुठलेही गुण नसले तरी चालतात एवढा महत्वाचा हा गुण आहे. आता माझेच पहा ना! पूर्वी मी साहेबांना अचूक माहिती देतानाही चाचरत असे, आज मी साहेबांना चुकीची माहितीही मोठ्या खात्रीने देऊ शकतो; हा आत्मविश्वासाचाच परिणाम नव्हे काय? तेव्हा, नेहमी आत्मविश्वासाने वावरावे आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास चेहे-यावर सतत दिसू द्यावा.

२)पुढेपुढे करण्याची सवय : मा.तं. क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हा गुणही फारच महत्वाचा आहे. दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर ज्यादा जबाबदारी घेण्यास तुम्ही उत्सुक आहोत हे तुम्हाला वरिष्ठांना सतत दाखवून देता यायला हवे. त्यासाठी नेहमी पुढेपुढे करत रहावे, विशेषत: बडे साहेब उपस्थित असतील तेव्हा. 'केक कुणीकुणी खाल्ला नाही?' असे विचारल्यावर वाढदिवसाला आलेली मुले जशी 'मी! मी!' ओरडतात अगदी तसेच तुमच्या साहेबांनी कामाची यादी वाचून दाखवल्यावर 'मी! मी!' असे ओरडावे. फिकर करू नये, त्यातली निम्मी कामे रद्द होतात. राहिलेल्या कामांमधली सोपी कामे ठेवून बाकीची कामे तुमच्या हाताखालच्या लोकांकडे सोपवावीत. स्वत:कडे फक्त बड्या साहेबांसमोर सादरीकरण, त्यांना दैनंदिन प्रगती रिपोर्ट पाठवणे इत्यादी कामे ठेवावीत. सादरीकरण करताना 'हे काम किती अवघड होते.' हे प्रत्येक कामाबाबत न चुकता सांगावे.

३)सकारात्मक दृष्टीकोन : कुठल्याही घटनेतून चांगलाच अर्थ काढण्याची सवय म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. म्हणजे जर कुठे भूकंप झाला नि सारे गाव उध्वस्त झाले तर 'अरे वा! बरे झाले, आता पुन्हा नव्याने सुरूवात करता येतील, जुन्या चुका टाळता येतील' असे तुम्हाला म्हणता यायला हवे. कुठलीही नविन कल्पना मांडली की ती कशी चुकीची आहे नि प्रत्यक्षात उतरवण्यास कशी अडचणीची आहे हे सांगणा-या लोकांचा एक गट असतो, या गटात आपण येणार नाही याची काळजी घ्यावी. [विशेषत: ती कल्पना तुमच्या साहेबांची असेल तर.] कुठल्याच कामाला नाही म्हणू नये. [त्याचा काहीही उपयोग नसतो हे तसेही तुम्हाला काही दिवसातच कळतेच.] जे काम दिले ते करत रहावे, जर काम बनले तर साहेबांची स्तुतिगीते गावीत आणि जर बिनसले तर साहेबांना डोके कसे नाही अशी बोंब मारावी, दोन्ही वेळा जीत तुमचीच!

४)नविन गोष्टी वेगाने शिकण्याची क्षमता : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे एक वेगाने बदलणारे क्षेत्र आहे; इथे टिकायचे असेल तर तुम्हास स्वत:ला अद्यावत ठेवता यायला हवे. पण स्वत:ला अद्यावत ठेवण्य़ासाठी ज्ञान मिळवण्याची आवश्यकता नसते हा महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवावा. जुजबी माहितीने काम होत असताना ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणे म्हणजे घरात उजेड पाडण्यासाठी १० रुपयात १०० वॅटचा दिवा मिळत असतानाही त्यासाठी सूर्याच्या गोळ्यामागे धावण्यासारखे आहे. हा गाढवपणा करू नये. कुठलेही नविन तंत्रज्ञान आले की त्यासंबंधी संकेतस्थळे धुंडाळावीत, त्यातले मोजून १० शब्द पाठ करावेत. या नविन तंत्रज्ञानाचा उल्लेख कुठेही झाला की हे १० शब्द फेकावेत नि समोरच्याला गार करावे.

५)संभाषणकौशल्य : इंग्रजीत संभाषण करण्यासाठी तुमचे इंग्रजी चांगले हवे हा गैरसमज मनातून आधी काढून टाकावा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली इंग्रजी भाषा इंग्लंडमधल्या इंग्रजी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, त्यांचा परस्परसंबंध काही नाही. इथल्या भाषेचे व्याकरण नि त्यांतले शब्द पूर्णपणे वेगळे आहेत. आता Prepone हा शब्दच पहा. इंग्रजी भाषेत तो अस्तित्वात नाही, पण मातं क्षेत्रात तो प्रत्येकाकडून रोज कमीतकमी तीनदा वापरला जातो!

लिखित संभाषण : लिहिताना गोष्टी मुद्दाम अवघड करून लिहाव्यात. म्हणजे वाक्ये अशी लिहावीत की ती तीनतीनदा वाचूनही लोकांना काही समजता कामा नये. यामुळे वाचकांच्या मनात येणारे नि त्यातून पुढे निर्माण होणारे सगळे गंभीर प्रश्न टाळता येतात. म्हणजे काही कळालेच नाही तर प्रश्न विचारणार कसे? हा डाव विशेषत: SRS documents लिहिताना फार उपयोगी पडतो. पण काहीही झाले तरी 'Thanks and regards', 'Please review the same', 'One of the main reason' असे घाटी शब्दप्रयोग करण्याची गफलत करू नये, अनुभवी साहेब लगेच तुमचे पाणी ओळखतात!

मौखिक संभाषण : बोलताना याच्या अगदी उलट नीती वापरावी. कुठलीही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आली की ती समजायला किती सोप्पी आहे हे पहिल्यांदाच सांगून टाकावे. त्यामुळे काहीही समजले नाही तरी कुणीही ते पुन्हा विचारण्याच्या फंदात पडत नाही. तरीही एखाद्या खमक्या माणसाने एखादा अवघड प्रश्न विचारलाच तर त्याचे उत्तर दहा मिनिटे मोठ्या विस्ताराने द्यावे. पहिले अर्धा मिनिट त्याच्या प्रश्नाविषयी बोलल्यावर नंतर गाडी सुसाट सोडावी नि भाषणाचा शेवट 'असे असल्यामुळेच आपल्या कंपनीचे भवितव्य उज्ज्वल आहे'असा करावा.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्वागत!

Monday, September 27, 2010

'दबंग' आणि आपण

सलमान खानचा 'दबंग' काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला तर चाललाच पण त्याने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जास्तीत गल्ला जमवण्याचा 'थ्री इडियटस' या चित्रपटाचा विक्रमही मोडला. काहींना तर हा चित्रपट एवढा आवडला की त्यांनी तो दोनदा-तीनदा पाहिला. कुणी काहीही म्हणो, पण हे यश सलमान खानचेच आहे हे नक्की, आणि माझ्या मते हीच चिंतेची गोष्ट आहे. सलमान खानविषयी अधिक माहिती देण्याची गरज नसावी. 'मैने प्यार किया'तला निरागस नायक ते ख-या जगातला खलनायक हा सलमान खानचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. चिंकारा जातीच्या हरणांची शिकार करणे आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका मनुष्यास यमसदनी पाठवणे असे गुन्हे करूनही सलमान आज मोकळाच आहे. आपल्या न्यायव्यवस्थेची आजपर्यंतची कामगिरी पहाता ती भविष्यातही सलमानचे काही वाकडे करू शकेल असे दिसत नाही. पण न्यायव्यवस्थेचे सोडा, ती गाढव आहे, मला आश्चर्य वाटते ते लोकांचे. सलमान खानला डोक्यावर घेऊन नाचताना तो एक गुन्हेगार आहे हे लोक कसे विसरतात? पडद्यावर त्याला नायक म्हणून पाहताना नि त्याच्या करामतींना शिट्ट्या मारताना तो वास्तवात एक खलनायक आहे हे लोक दृष्टीआड कसे करू शकतात? आपण एवढे संवेदनाहीन झालो आहोत काय? कुणा उपटसुंभ्याने काहीतरी लिहिले म्हणून जाळपोळ करणारे आपण एका माणसाचा जीव घेणा-या सलमानला मात्र वेगळा न्याय का लावतो? तेव्हा कुठे जाते आपली संवेदनशीलता, तेव्हा कुठे जातात आपल्या भावना?

अपघातात मृत पावलेली व्यक्ती जर आपली जवळची नातेवाईक असती तर ते याच निर्विकारपणे हा चित्रपट पहायला गेले असते का या प्रश्नाचे उत्तर सलमानच्या या चाहत्यांनी द्यायला हवे. अर्थात 'आम्ही सलमानचे चाहते आहोत, आम्हाला इतर गोष्टींशी घेणेदेणे नाही' असा बचाव हे लोक करू शकतात, पण तो लंगडा आहे. हाच न्याय जर लोकप्रतिनिधिंना लावला तर तेही 'आमची गुंडगिरी नजरेआड करा, जनतेची सेवा करता यावी म्हणून आम्हालाच पुन्हा निवडून द्या' असा युक्तिवाद करू शकतातच की! सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यामुळे त्याचे खटले वेगात चालणार नाहीत हे मान्य, पण आपण काहीही गैरकाम केले तरी जनतेचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे असा या गुन्हेगारांचा समज होण्यापासून तरी आपण त्यांना रोखू शकतो. असा बहिष्कार टाकून बळी पडलेल्यांना सहानूभुती दाखवण्याचा आणि न्यायव्यवस्थेच्या हळू चालीबद्दल आपण असमाधानी आहोत हे सरकारला दाखवण्याचा मुद्दाही महत्वाचा आहेच.

सलमान खान म्हटले की मला आठवतो तो त्याच्या गाडीखाली आलेल्या माणसाच्या नातेवाईकांचा तो आक्रोश. ते छायाचित्र माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे. कुठे असतील ते लोक आज? आजही ते असेच कुठेतरी जनावरासारखे जगत असतील आणि एवढे होऊनही कदाचित एखाद्या फुटपाथवरच झोपत असतील. काही दिवसांनी असाच एखादा सलमान खान त्यापैकी कुणालातरी उडवेल, माध्यमे चवीने बातम्या देतील, पोलिस कारवाईचे देखावे करतील नि न्यायालये निर्णय नि त्यांना स्थगिती हा खेळ खेळत राहतील. थोडक्यात, 'मेरा भारत महान' हे वाक्य पुन्हा एकदा खोटे ठरेल आणि कितीही अमान्य केले तरी त्यासाठी आपणच जबाबदार असू!

Friday, September 17, 2010

अमेरिकेला दमवले ढेकणांनी!

'चिरकूट बांगलादेशला ढेकणासारखे चिरडू!' अशी घोषणा काही वर्षांपुर्वी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाक-यांनी केल्याचे सगळ्यांनाच आठवत असेल. बांगलादेशने भारताची काही कुरापत काढल्याने संतप्त होऊन ठाकरेंनी ही महागर्जना केली होती. पण नुसत्याच गर्जना करायच्या नि काहीच कृती करायची नाही ही बाळासाहेबांची नि कसल्या गर्जनाही करायच्या नाहीत नि कसली कृतीही करायची नाही ही आपल्या सरकारची सवय लक्षात घेता बांगलादेशच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत भारताला झाली नाही हे सांगायलाच हवे का?

या गर्जनेचे अचानक स्मरण होण्याचे कारण म्हणजे याच छोट्याश्या ढेकणांनी सध्या अमेरिकेत घातलेला मोठा गोंधळ. 'या ढेकणांना ढेकणासारखे चिरडू' असे उद्गार अमेरिकन लष्करप्रमुखांनी अजून काढले नसले तरी त्यांनी 'अमेरिका बाहेर दोन नि दस्तुरखुद्द अमेरिकेत ढेकणांविरुद्ध एक अशी तीन युद्धे लढत असल्याचे (खाजगीत) मान्य केल्याचे आमचा वार्ताहर (खाजगीत) कळवतो. न्यूयॉर्क टाईम्स [http://www.nytimes.com/2010/08/31/science/31bedbug.html], लॉस ऍंजलिस टाईम्स [http://www.latimes.com/sns-health-bed-bugs,0,4665398.story], टाईम [http://www.time.com/time/travel/article/0,31542,1955180,00.html] अशा मुख्य वृत्तपत्रांमधे रोज प्रसिद्ध होणारे याबाबतचे लेख यावरून या समस्येची व्याप्ती लक्षात यावी. ढेकूण हे कीटक नेमके कसे आहेत, ते लपतात कुठे, ते रक्त पिल्याशिवायही किती दिवस जगू शकतात यासारख्या माहितीने वृत्तपत्रांमधले रकानेच्या रकाने भरले जात आहेत. हॉटेले, हॉस्पिटले, घरे यांसारख्या ठिकाणी ढेकणांच्या झुंडीच्या झुंडी आक्रमणे करत आहेत आणि त्यांच्याशी लढतालढता अमेरिकन्स अक्षरश: हतबल झाले आहेत. (खरं तर हा विषय एखाद्या होलिवूडपटासाठी किती साजेसा आहे, यावर 'स्लीपिंग विथ द एनिमी', 'द वॅम्पायर' असा एखादा झकास ऍक्शनपट बनू शकतो; एखादा हॉलिवूडनिर्माता इकडे लक्ष देईल काय?)

माझ्या मते, ढेकणांमुळे अमेरिकेच्या झालेल्या या दयनीय स्थितीचा भारत सरकारने अगदी पुरेपूर फायदा उचलायला हवा. भारतीयांना सतत घाणेरडे घाणेरडे म्हणून चिडवणा-या अमेरिकनांचा सूड घेण्याची चांगली संधी सध्या आपल्याकडे आहे. अमेरिकन कपडे/बूट यांवर बंदी, अमेरिकेतून येणा-या प्रवाशांना (त्यांच्या अध्यक्षांसह) रॉकेलचे फवारे मारल्यावरच भारतात प्रवेश आणि अमेरिकेतील ढेकूण समस्या सुटेपर्यंत अमेरिकेच्या सा-या अधिकृत सरकारी निमंत्रणांना नकार असे काही उपाय करून भारत सरकार अमेरिकेची नालस्ती करू शकते. माननीय परराष्ट्रमंत्री इकडे लक्ष देतील काय?

कोणी काहीही म्हणो, पण माझ्या मते, जगातील एकमेव महासत्ता असे स्वत:चे गोडवे गाणा-या अमेरिकेला साधा ढेकणांचा नि:पात करता येऊ नये ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा अनेकवेळा विध्वंस करता येण्याइतकी विघातक अस्त्रे असूनही अमेरिकेला साध्या ढेकणांशी लढता येऊ नये? की हा ढेकणांचा बदला आहे? 'अमक्याला सहज चिरडू, तमक्याला सहज चिरडू' असे म्हणणा-या अमेरिकनांना 'आता आम्हाला चिरडून दाखवा' असे तर ते म्हणत नसतील? का हे अमेरिकेच्या दिवसेंदिवस घटत्या सामर्थ्याचे लक्षण मानावे? एकेकाळी मोठमोठ्या राष्ट्रांना घाम फोडणारी अमेरिका आता साध्या ढेकणांपासून स्वत:ला वाचवू शकत नाही यावरून कसले अर्थ काढावेत?

कुणी काहीही म्हणो, पण ढेकणांनी सध्या अमेरिकेची झोप उडवलेली आहे हे मात्र खरे!

ता.क. अमेरिकेत ढेकणांनी घातलेल्या हैदोसावरची मजेदार व्यंगचित्रे इथे पहा. [http://cagle.msnbc.com/news/Bedbugs/main.asp]

Sunday, September 12, 2010

जातीनिहाय जनगणना - सरकारचा एक योग्य निर्णय!

अखेर सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षी जून ते सप्टेंबर या काळात ही जनगणना पूर्ण केली जाईल असे जाहीर केले. ‘देर आये, मगर दुरूस्त आये‘ असे म्हणावेसे वाटावे असाच सरकारचा हा निर्णय आहे. १९३१ साली शेवटची जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती; २०११ साली, म्हणजेच सुमारे ८० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अशी जनगणना पुन्हा एकदा केली जाईल आणि भारतात राहणा-या अठरापगड जातींचे बलाबल ती जगासमोर ठेवेल.

जातीनिहाय जणगनणेच्या बाजूने नि तिच्या विरुद्ध अशा दोन्ही पक्षांनी या विषयावर बरेच चर्वितचर्वण केले, आपापली बाजू मोठ्या हिरिरीने मांडली; शेवटी जातीनिहाय जणगनणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे योग्य नि दूरगामी परिणाम करणारा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीजातींमधली तेढ वाढेल नि त्यांमधे पुन्हा वैतुष्ट्य येईल असा प्रचार विरोधी लोकांकडून केला जात होत होता, मात्र त्याला काहीही अर्थ नाही. लोकसंख्येत प्रत्येक जातीचे प्रमाण किती हे आकडे समोर आल्यामुळे जातीजातींमधले वैर अचानक का वाढेल या प्रश्नाचे उत्तर या त्यांच्याकडे नाही. या गणनेत सगळ्या जातींची नोंद होणार असली तरी तिचा निष्कर्ष सवर्णांपेक्षा मागासवर्गीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे हे नक्की. कुठलीही समस्येचे निराकरण करण्याचे दोन उपाय असतात; ती एक समस्या आहे हे मुळातच अमान्य करून तिचे अस्तित्वच स्वीकारण्यास नकार देणे हा एक मार्ग आणि ती समस्या आहे हे मान्य करून, तिचा सांगोपांग, व्यवस्थित अभ्यास करून ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते उपाय करणे हा दुसरा मार्ग. भारताच्या ‘जातिव्यवस्था‘ ह्या जटील समस्येवर जातीनिहाय जणगनणा हा असाच एक उपाय आहे.

मोठमोठ्या शहरांमधे जातीव्यवस्थेचे चटके फारसे जाणवत नसले तरी खेड्यात अजूनही ‘जात नाही ती जात‘ अशीच परिस्थिती आहे. तिथे आजही दलित सरपंचांना फक्त ते दलित असल्याने मारहाण होत आहे, दलित स्त्रीला नग्न करून तिची भर गावातून धिंड काढली जात आहे आणि खैरलांजीसारख्या हत्याकांडात दलितांच्या सामूहिक हत्या होत आहेत. महाराष्ट्रासारख्या सामाजिक सुधारणांचे वारे लागलेल्या राज्याची ही स्थिती तर उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांची स्थिती काय वर्णावी? तिथे आजही दलितांची स्थिती जनावरांसारखी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे या सा-या दुर्बलांना एक आवाज मिळणार आहे. आम्ही दलित आहोत नि या एकाच कारणामुळे आम्ही या देशाचे नागरिक असूनही आज विस्थापितांसारखे जगत आहोत हा आक्रोश सारे दलित या जनगणनेतून व्यक्त करणार आहेत. दलितांची नेमकी संख्या किती, त्यांची सांपत्तिक स्थिती काय, शहरातील, खेड्यातील दलित यांचे गुणोत्तर काय हे कळून आल्यामुळे सरकारला त्यांच्या कल्याणासाठी योग्य योजना राबविणे सोपे जाणार आहे. सवर्णांचा या प्रक्रियेला विरोध अनाकलनीय आहे; ही प्रक्रिया त्यांच्यासाठीही फायदेशीर असणार आहे हे नक्की. आरक्षणामुळे दलितांचे (किंवा त्यांमधल्या एखाद्या विशिष्ट जातीचे) जीवनमान सुधारले आहे असे दिसून आले तर त्यांना दिलेल्या ह्या सुविधेचा पुनर्विचार करण्याचा हक्क सरकारला असणार आहे. याबरोबरच अनेक सवर्णही आज विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत हे दिसून आल्यास त्यांच्यासाठीही आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवण्याची मागणी होऊ शकते आणि ती मुळीच चुकीची असणार नाही.

जातीनिहाय जनगणनेचा फायदा सवर्ण आणि दलित, दोघांनाही होणार आहे हे नक्की. यामुळेच या निर्णयाचे स्वागत करण्यात नि त्यासाठी सरकारला सहकार्य करण्यातच दोघांचे हित आहे!

Tuesday, August 31, 2010

प्रारंभ

रमेश मंत्र्यांची 'प्रारंभ' कादंबरी नुकतीच वाचून संपवली नि एका रसिक मनुष्याने लिहिलेले एक रसाळ पुस्तक वाचण्याचा आनंद मिळाला. खरेतर मराठीत लेखकांची आत्मचरित्रे फार नाहीत. म्हणजे लेखकांनी स्वत:बद्दल अनेकदा लिहिले आहे खरे, पण आपल्या संपूर्ण आयुष्याला शब्दबद्ध करणारे साहित्यिक विरळेच! आचार्य अत्र्यांचे 'क-हेचे पाणी', गंगाधर गाडगीळांचे 'एका मुंगीचे महाभारत' असे काही अपवाद. पण रमेश मंत्र्यांनी आपले आत्मवृत्त लिहिले आहे आणि ते नुसतेच न लिहिता अगदी प्रामाणिकपणे, कसलाही आडपडदा न ठेवता लिहिले आहे!

मंत्र्यांच्या आयुष्याचे जन्मापासून साधारण तरूणपणापर्यंतचे चित्रण या पुस्तकात आहे. पुस्तकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंत्र्यांचा प्रामाणिकपणा नि कुठलीही गोष्ट न लपवता जे जसे घडले तसेच ते सांगण्याची त्यांची भूमिका. आपल्या (किंवा इतरांच्याही) आयुष्यातले कुठलेच गुपित मंत्र्यांनी दडवून ठेवलेले नाही. जे जसे घडले तसे ते त्यांनी अगदी सरळ वाचकांसमोर मांडले आहे. मंत्र्यांचे सगळेच कसे खुल्लमखुल्ला आहे, नदीच्या डोहातल्या निखळ पाण्यातून त्याचा तळ एखाद्या गरम दुपारी स्पष्ट दिसावा असे काहीसे. हा मोकळेपणा विशेष आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. असे करायला विलक्षण धैर्य लागते, मनाचा विलक्षण निग्रह लागतो, तो मंत्र्यांकडे आहे. त्यामुळेच पुस्तकात आपल्याला मंत्र्यांच्या पहिल्या चुंबनाविषयी, त्यांच्या सुनंदा, कमलिनी या मैत्रिणींविषयी (आणि मंत्र्यांनी त्यांसोबत घालवलेल्या मधुर क्षणांबद्दलही) वाचायला मिळते. विवाहित स्त्रीयांनी आपल्याला गटवण्यासाठी केलेले सारे प्रयत्न (आणि त्या यशस्वी झाल्यावर आलेले अनुभवही) मंत्री असेच विनासंकोच सांगतात. आपल्या 'विझलेली आग' या पुस्तकाविषयी किंवा ना. सी. फडके यांच्या 'सेकंड क्लास का तुम्हाला मिळाला? मागून भेटा तुम्ही आम्हाला!' या किस्याविषयीही मंत्री असेच हातचे काहीही राखून न ठेवता लिहितात. आत्मचरित्र असे हवे! केवळ आपल्याला रूचतील अशा काही निवडक गोष्टीच सांगणारे किंवा इतर जण दुखावतील म्हणून त्यांच्याविषयी न लिहिणारे आत्मचरित्र खरे कसे म्हणावे?

पुस्तकाचा दुसरा विशेष म्हणजे त्यातली रसाळ भाषा. 'रसाळ' या शब्दाचा वापर जरी हलक्या हाताने होत असला तरी मराठीत रसाळ लिहिणारे लेखक अगदी थोडे आहेत, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे. आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ ही काही चटकन डोळ्यांसमोर येणारी नावे. या नामावलीत रमेश मंत्र्यांचे नाव टाकायला काहीच हरकत नसावी. या पुस्तकातली भाषा विलक्षण रसाळ आहे आणि मला वाटते याचे मूळ मंत्र्यांच्या रसिक स्वभावात आहे. जीवनातला कुठलाही अनुभव घ्यायला मंत्र्यांची ना नाही, किंबहुना कुठलाही नवा अनुभव घ्यायला ते सदैव उत्सुक आहेत. ब-याचदा आत्मवृत्तांना कंटाळवाण्या रोजनिश्यांचे स्वरूप येतो, या पुस्तकाचे मात्र तसे नाही. ते वाचताना आपण एक पुस्तक वाचत आहोत असे वाटतच नाही, असे वाटते की मंत्री आपले बोट धरून आपल्याला त्या काळात ओढून नेत आहेत नि त्या घटना घडतानाच आपल्याला प्रत्यक्षात दाखवत आहेत. यामुळेच की काय, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही; पुढे काय होईल, मंत्र्यांच्या आयुष्यात पुढे कुठली चमत्कारिक घटना घडेल हा प्रश्न वाचकाला सतत पडत रहातो!

पुस्तक वाचताना पानापानावर जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे रमेश मंत्र्यांची जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची वृत्ती. मंत्र्यांवर अनेक संकटे आली, परिस्थितीने अनेक चटके त्यांना दिले तरीही ते त्रासलेले किंवा वैतागलेले दिसत नाहीत. गर्भश्रीमंत बालपणापासून कर्जबाजारी तारूण्यावस्थेच्या प्रवास मंत्र्यांनी केला पण त्याबद्दल एक कटू अवाक्षरही ते काढत नाहीत. आपल्या आयुष्यात घडलेले आनंददायक किंवा दु:खदायक प्रसंग मंत्री तेवढ्याच अलिप्तपणे कथन करतात. आपला भाऊ अण्णा यानं वीस हजार रू. उडवून आपल्याला कॉलेजच्या फीसाठीही कसं महाग केलं हे ज्या सहजतेने मंत्री सांगतात तेवढ्याच सहजतेने 'सकाळ'चे नानासाहेब परूळेकर यांनी आपल्याला परदेशगमनासाठी एक हजार रूपये दिले तेही सांगतात. मंत्र्यांनी इतरांबाबत खरेखुरे लिहिले आहे असे मी म्हटलो, पण त्याचा उपयोग त्यांनी जुने हिशोब चुकते करण्यासाठी केलेला नाही. वाईटाला वाईट म्हणतानाच, चांगल्याला चांगले म्हणण्याइतका दिलदारपणाही त्यांनी दाखवलेला आहे.

या आत्मचरित्राचे 'मध्यम' नि 'अंत' असे पुढचे दोन भाग लिहिण्याचा मंत्र्यांचा मानस होता पण दुर्दैवाने तो पुरा होऊ शकला नाही. ९२ साली हे पुस्तक लिहून पूर्ण झाल्यावर ९३ सालच्या सप्टेंबर महिन्यात मंत्र्यांना अतिरक्तदाबामुळे पक्षाघात झाल्याने पुढच्या दोन्ही पुस्तकांचे काम थांबले. अर्थात मंत्री त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहू शकले नि तो आपल्याला वाचायला मिळाला यातच आपण समाधान वाटून घ्यायला हवे, नाही का?

केवळ मंत्र्यांच्या चाहत्यांनीच नव्हे तर प्रत्येक मराठीसाहित्यप्रेमी व्यक्तीने वाचावे असेच हे पुस्तक आहे!

प्रारंभ
रमेश मंत्री
अनुभव प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती : १ जुलै १९९५
किंमत : २२५ रू.

शासनाचे दोन तुघलकी निर्णय

आपली शासनयंत्रणा काहीच करत नाही अशी ओरड आपण नेहमी करत असतो, त्यामुळेच की काय, अचानक एखादा तुघलकी निर्णय घेऊन आपले अस्तित्व दाखवून देणे असा प्रकार तिच्याकडून नेहमीच घडताना दिसतो. लेखाचे कारण म्हणजे नुकतेच महाराष्ट्र सरकारने नि पुणे महानगरपालिकेने घेतलेले असेच दोन निर्णय. यातला पहिला निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा. या निर्णयानुसार अनेकपडदा चित्रपटगृहांना यापुढे मराठी चित्रपट दुपारी बाराच्या पुढेच दाखवावे लागतील, याशिवाय असे चित्रपटगृह उभारताना त्यामधे एक पडदा मराठी चित्रपटगृहांसाठी राखूनही ठेवावा लागेल. यातला पहिला निर्णय योग्य वाटत असला नि जरूर टाळ्या वसूल करणारा असला तरी त्यामुळे काहीही साध्य होणार नाही ही एक कटू वस्तुस्थिती आहे. या चित्रपटगृहांमधे दुपारनंतर चित्रपट दाखवल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पहायला प्रचंड गर्दी करतील अशी खात्री कोणी देऊ शकणार आहे काय? एकूनच मराठी चित्रपट टिकवणे ही सरकारची नव्हे तर लोकांची जबाबदारी आहे हे आपण कधी मान्य करणार आहोत? अर्थात ही जबाबदारी आपली आहे हे मराठी प्रेक्षक जाणतात नि ते ती पार पाडायला तयार आहेतच. लोकांना आकर्षित करणारे चित्रपट पडद्यावर आले तर तो पहायला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे जातातच हे ’नटरंग’, ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा चित्रपटांनी अनेकदा सिद्ध केले आहे. इथे ’चांगले’ नव्हे तर ’लोकांना आकर्षित करणारे’ चित्रपट असे मी म्हणतो. चांगले चित्रपट बनवण्यासोबतच त्याचे विपणनही आजकाल फार महत्वाचे झाले आहे ही गोष्ट मराठी चित्रपटनिर्मात्यांना कधी समजणार? प्रेक्षकांना आकर्षित करतील असे चेहरे, अशा कथा, अशी तांत्रिक सफाई सगळ्याच मराठी चित्रपटांत कधी दिसणार? तेच ते विनोद, तेच ते चेहरे नि त्याच त्या कथा यांचा मराठी प्रेक्षकांना वीट आला आहे हे मराठी चित्रपट निर्माते समजून का घेत नाहीत? पुण्यासारख्या शहरात चार सदस्यांच्या कुटुंबाला चित्रपट पाहण्यासाठी होणारा खर्च हजार रूपयांच्या घरात पोचलेला असताना ’नवरा अवली, बायको लवली’ यासारख्या चित्रपटात ’प्रसाद ओक’सारख्या नटाला पाहण्यासाठी एवढा खर्च करण्याचे धाडस कुठलाच मराठी माणूस (मराठीवर कितीही प्रेम असूनही) करणार नाही! मराठीचे मराठी लोकांना वावडे आहे हे रडगाणे मराठी चित्रपटनिर्माते कुठपर्यंत गाणार? मराठी कार्यक्रम दाखवणा-या दहा वाहिन्या आज आहेत, त्या चालतील याची खात्री असल्याशिवायच का त्या आल्या? मराठी चित्रपटनिर्मात्यांनी नवनविन विषय वापरून चित्रपट बनवावेत, ताज्या दमाच्या चेहे-यांना संधी द्यावी, दहा रूपये कमवण्यासाठी पाच रुपयांचे भांडवल घालावे लागते हे लक्षात ठेवून चित्रपटांवर थोडा खर्चही करावा नि त्यांचे योग्य विपणनही करावे, ते पहायला मराठी प्रेक्षक अगदी उड्या मारत येतील!

दुसरा निर्णय आहे पुणे महानगरपालिकेचा. या निर्णयानुसार आता प्रत्येक नविन घरयोजनेत लहान घरे बांधणे विकसकांसाठी बंधनकारक राहणार आहे. कुठलाही विचार न करता घेतलेले निर्णय कसे हास्यास्पद होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात घरांचे दर १०००० रू. प्रति स्क्वे.फू. इथपर्यंत पोचलेले असल्यामुळे जरी विकसकांनी ३५० ते ४०० स्क्वे. फूटांची घरे काढली तर त्यांची किंमत ३५ ते ४० लाख (इतर खर्च वेगळे) असणार हे नक्की. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातले लोक ही घरे कशी घेणार? मध्यवर्ती भागाचे सोडा, पुण्याच्या अनेक भागांत घरांचे दर ५००० रू. प्रति स्क्वे.फू. इथपर्यंत सहज पोचलेले आहेत, तिथेही अशा लहान घरांची किंमत २० लाखापेक्षा कमी असणार नाही. पुण्याबाहेरच्या खेड्यांमधे १२ लाखात याहून प्रशस्त घरे मिळत असताना इथे ही घरे कोण घेईल? जनसामान्यांसाठी घरांच्या किमती आटोक्यात ठेवण्याचे हे मार्ग नव्हेत. सध्या एक गुंतवणूक म्हणून घरे घेण्याची प्रवृत्ती पुणेकरांमधे वाढत आहे, त्यामुळे एकाच व्यक्तीच्या दोन/तीन सदनिका असे दृश्य आजकाल सर्रास पहायला मिळते. याला सरकारने प्रतिबंध करायला हवा. घरे ही जीवनावश्यक वस्तू माणून त्याची कृत्रिम टंचाई सरकारने थांबवायला हवी. त्याखेरीज पुण्यात जागांना नि पर्यायाने घरे बांधण्याला मर्यादा आहेत हेही सरकारने समजून घ्यायला हवे. त्यासाठी पुण्याच्या उपनगरांमधून, आजूबाजूच्या शहरांमधून वेगाने पुण्यात येता येईल अशी वाहतुकीची साधने सरकारने उपलब्ध करून द्यायला हवीत. जर सासवडमधून किंवा राजगूरुनगरमधून अर्ध्या तासात मेट्रोने पुण्यात येता येत असेल, तर पुण्यात राहील कोण? (निदान मी तरी नाही!) वस्तुस्थिती अशी की या दिवसेंदिवस उग्र होत जाणा-या समस्येकडे गंभीरपणे पाहण्याची सरकारची तयारी नाही. त्यामुळेच असे हास्यास्पद उपाय करणे नि काही दिवसांनी ते काम करीत नाहीत हे दिसल्यावर कोलांटी उडी घेणे हे सरकारचे नेहमीचे धोरण होऊन बसले आहे!

Sunday, August 29, 2010

अखेर नव्या घरात!

अखेर आम्ही आमचे स्वत:चे घर सोडले आणि भाड्याच्या घरात रहायला आलो. ’भाड्याच्या घराचा शोध’ हा खरोखरच एक भयंकर अनुभव होता; इतका भयंकर की तो आयुष्यात पुन्हा कधीही घ्यायला लागू नये अशीच माझी ईच्छा आहे!

आमचे घर विकले गेल्यावर ते लगेच खाली करून द्यावे असा धोशा घेणा-यांनी लावला नि आम्हाला भाड्याचे घर शोधणे क्रमप्राप्त झाले. पण आम्ही घराचा शोध सुरू केला नि हे काम वाटते तितके सोपे नाही ही जाणीव आम्हाला झाली. ’अरे हाय काय अन नाय काय? कुठलेतरी घर बघायचे, मालकाच्या डोक्यावर पैसे नेऊन आदळायचे आणि घर ताब्यात घ्यायचे!’ असा माझा घर भाड्याने घेण्याबाबत सर्वसाधारण समज होता, तो पूर्णपणे खोटा ठरला. भाड्याचे घर शोधण्यात तीन आठवडे घालवल्यावर हे जगातले सगळ्यात अवघड नि कटकटीचे काम आहे असे माझे मत झाले आहे. मी तर असे म्हणेन की एकवेळ मनाजोगती बायको मिळणे सोपे पण मनाजोगते भाड्याचे घर मिळणे अतिकठीण!

आजकाल लग्नाच्या बाजारात मुलींच्या (नि मुलांच्याही) आपल्याविषयी जशा अवास्तव कल्पना असतात नि समोरच्याकडून जशा अवाजवी अपेक्षा असतात, थोडीफार तशीच परिस्थिती आजकाल पुण्यातील घरमालकांची झाली आहे. आपली दोन बेडरूम्सची सदनिका ही सदनिका नसून राजवाडा आहे नि ती पुणे सातारा रोडवर नव्हे तर डेक्कन जिमखाना येथे आहे असाच आम्ही भेटलेल्या बहुतांश घरमालकांचा समज झालेला दिसला. त्यांनी सांगितलेले भाड्याचे नि पागडीचे भाव ऐकून तर आम्ही अक्षरश: हबकून गेलो. त्या पैशात पुण्यात पंधरा वर्षांपुर्वी चक्क एक घर खरेदी करता आले असते! एक दोन उदाहरणे - आमच्या घराजवळच असलेल्या सोसायटीतल्या एका फ्लॅटची कथा. ही ईमारत सुमारे वीस वर्षे जुनी. इथे पार्किंग नावापुरतेच, तेही फक्त आठ फुट उंच! खाली अस्वच्छता आणि गाड्यांची भरपूर गर्दी. आम्ही वेळ ठरवून फ्लॅट पहायला गेलो, तर काकू जिन्यातच दाराच्या कुलुपाशी खटपट करत होत्या. नंतर आमच्याकडे पाहून गोड हसत म्हटल्या, "अहो फ्लॅटची किल्ली म्हणून दुसरीच किल्ली आणली मी, थांबा किल्ली घेऊन आलेच मी दोन मिनिटात." दोन मिनिटांचा वायदा करून गेलेल्या काकू परतल्या दहा ते पंधरा मिनिटांनी. तोपर्यंत आम्ही असेच जिन्यात उभे. बरे हा जिना इतका अरूंद, की कुणी आले की आम्हाला पुढेमागे झुलत त्यांना वाट करून द्यावी लागत होती. एकूनच सोसायटीचा रागरंग पाहून मी तिथून निघण्याचा विचार करत होतो पण आमचे संस्कार आड आले आणि आम्ही काकुंची वाट पाहत तसेच थांबलो. पण सदनिका पाहून आमचा अपेक्षाभंग झाला नाही हे मात्र खरे; अगदी आम्ही कल्पना केली होती तशीच होती ती. फारसा प्रकाश नसलेल्या खोल्या, भडक रंग, अगदी साधी फरशी. धक्कादायक गोष्ट म्हणजे सदनिकेतले तोंड धुण्याचे बेसिन फुटलेले होते आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्याआधी ते दुरुस्त करण्याचे साधे सौजन्यही मालकांनी दाखवले नव्हते. दुसरे उदाहरण असेच. बावीस वर्षे जुनी इमारत नि चौथा मजला. लिफ्ट होती पण वीज गेल्यावर काही पर्यायी व्यवस्था नसल्याने ती गेल्यावर हिमालय चढणे आले. इथे एकच संडास/बाथरूम होती नि तरीही मालकांची भाड्याची अपेक्षा दहा हजार होती. वर ’इथे मुले रहात होती. फ्लॅट अजून साफ केलेला नाहीये, पण पाह्यचा तर पाहून घ्या.’ अशी प्रेमळ सूचना! तिसरे उदाहरण एका बंगल्याचे. बालाजीनगर इथल्या बंगल्यांच्या सोसायटीतला हा बंगला. जाहिरात पाहून आम्ही तो बघायला गेल्यावर "तुमचे बजेट काय आहे?" असा पहिलाच प्रश्न मालकीणबाईंनी विचारला. आमचे बजेट दहापर्यंत आहे सांगितल्यावर "एवढ्या बजेटमधे तुम्हाला ’बंगलो सोसायटी’त कुठेच घर मिळणार नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दहापर्यंत एक बेडरूम बंद करून एक बीएचके देऊ शकेन." असे औदार्य मालकीणबाईंनी दाखवले. आम्ही मनातून खट्टू झालो पण आता आलोच आहोत तर घर पाहून घेऊ असे वाटल्याने आम्ही त्यांच्याबरोबर बंगला पहायला निघालो. तेवढ्यातल्या तेवढ्यात मालकीण बाईंनी मला सगळे प्रश्न विचारून घेतले. ’तू काय करतोस, तुझा भाऊ काय करतो, तुझी आई/बाबा काय करतात, तुम्ही पुण्यात किती वर्षे आहात’ अशी प्रश्नांची फेरीच त्यांनी माझ्यावर झाडली. आम्ही पुण्यात पंधरा वर्षे आहोत हे कळाल्यावर ’काय? नि अजून तुमचे पुण्यात घर नाही?’ हा पुढचा प्रश्नही त्यांच्याकडे तयार होता. शेवटी तर त्यांनी ’तुझे शिक्षण कुठे झाले?’ हेही विचारले. आत्तापर्यंत मला हा प्रश्न मुली बघायला गेल्यावरही कुणी विचारला नव्हता. एवढे प्रश्न विचारल्यावर त्या नक्कीच मला कुणीतरी मुलगी सुचवतील अशी भीती मला वाटत होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. तर आता बंगल्याविषयी - हा बंगला ’प्रशस्त’ म्हणजे जरा जास्तच प्रशस्त होता. खोल्या एवढ्या मोठ्या की त्यांमधे क्रिकेट खेळता आले असते. आमच्याकडे सामान जरा जास्त पण ह्या खोल्यांमधे ते कुठल्याकुठे गडप झाले असते. बांधकामाचा दर्जाही एकूण सामान्यच होता. अशा या चार खोल्यांच्या घरासाठी या मालकीणबाईंनी पंधरा हजार हवे होते! ’बाई, साडेदहाहजारात आम्हाला तुमच्यापेक्षा अर्धा किलोमीटर जवळ असलेल्या चकाचक नव्या सोसायटीत दोन बीएचके फ्लॅट मिळतो, पंधरा हजार घालवून तुमचे हे घर घेण्यासाठी तुम्ही आम्हाला एकतरी सबळ कारण सांगू शकता का?’ हा एकच प्रश्न विचारून काकूंना निरूत्तर करावे असे मला वाटले, पण पुन्हा एकदा आमचे (सु)संस्कार आड आले!

घर शोधताना प्रचंड त्रासदायक ठरणारी दुसरी गोष्ट म्हणजे एजंट लोक. एजंट बनण्यासाठी भ्रमणध्वनी असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे असा समज झाल्यामुळे आजकाल कुणीही उठसूट एजंट बनू लागला आहे. शेतीबरोबर पुर्वी लोक कोंबड्या पाळणे/गाई पाळणे/शेळ्या पाळणे असा जोडधंदा करीत, आजकाल लोक इतर धंद्याबरोबर एजंटगिरी हा जोडधंदा करू लागले आहेत. हे एजंट नि त्यांच्या अजब गजब कहाण्यांवर एक वेगळा लेख(की पुस्तक?) लिहिता येईल! समाधानाची बाब एवढीच की पुणे सातारा रस्त्याचा परिसर पुण्याच्या ’उच्चभ्रू’ भागात येत असल्याने एजंट लोक अजूनतरी एकाच भाड्यामधे समाधान मानत आहेत!

असो, पण भाड्याचे घर शोधण्याच्या या अनुभवामधून बाहेर आलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भाड्याने घर घेऊन राहणा-या लोकांच्या दु:खाची मला झालेली जाणीव. भाड्याच्या घरात राहणा-यांच्या वेदना मी आता जाणतो, दर अकरा महिन्यांनी या फे-यातून जाणा-या लोकांविषयी मला आता सहानुभुती वाटते. घरमालक, एजंट यांच्या कात्रीत सापडलेल्या या लोकांचे दु:ख मी आता समजू शकतो. चला, भाड्याच्या घराचा अनुभव भयानक असला तरी त्यामुळे ही एक सकारात्मक गोष्ट घडली, हे चांगलेच नाही का?

Wednesday, August 18, 2010

नारायण सुर्वे - गरीबांचा, शोषितांचा आणि उपेक्षितांचा कवी अखेर कालवश!

अखेर नारायण सुर्वे गेले! गेले अनेक दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती; ती ढासळायला सुरुवात झाली सुमारे दोन वर्षांपुर्वी. पण त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी केलेली प्रार्थना देवाने ऐकली नि आपल्या चाहत्यांबरोबर अजून काही वेळ घालवण्याची सवलत त्यांना दिली. यावेळी मात्र तो कठोर झाला नि त्याने नारायण सुर्व्यांना थेट आपल्याकडे बोलवून घेतले!

या जगात अनेक कल्पनातीत गोष्टी घडतात, सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असते असे म्हणतात ते ह्यामुळेच. नारायण सुर्वेंचा जीवनप्रवासही असाच आहे. कचराकुंडीमधे सोडलेल्या एका मुलाला एक गिरणीकामगार उचलतो काय, त्याला मोठा करतो काय नि हा मुलगा पुढे आपल्यासारख्याच दुर्दैवी जीवांच्या जीवनकहाण्या जगासमोर मांडणारा एक मोठा कवी बनतो काय, हा एक चमत्कारच नव्हे तर काय!

१९२६ किंवा १९२७ साली एकेदिवशी एका आईने आपल्या बाळाला चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर सोडले नि रस्त्यावरचा हा पोरका जीव गंगाराम सुर्वे या गिरणीकामगाराने उचलून घरात आणला. जे देणे शक्य होते ते सारे काही सुर्वे दांपत्याने या मुलाला दिले; घर, शिक्षण, आईबापाचे प्रेम आणि आपले नावदेखील! पण १९३६ साली गंगाराम सुर्वे निवृत्त झाले नि कोकणात आपल्या गावी निघून गेले; नारायणाला क्रूर मुंबईच्या तावडीत सोडून. मग नारायण कुणा कुटुंबात घरगडी, कुठल्या हॉटेलात कपबश्या विसळणारा, कधी दूध टाकणारा पो-या तर कधी कुठल्या कारखान्यात कामगार अशी लहानसहान कामे करत राहिला. अखेर ज्या शहरात कपबशा विसळल्या त्याच शहरात शिक्षक बनण्याचा पराक्रम नारायणाने केला आणि १९६१ साली तो महापालिकेच्या नायगाव क्र. एकच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला! अर्थात् या सा-या प्रवासात नारायणाने कविता करणे कधीच सोडले नाही, ती त्याला शेवटपर्यंत साथ देत राहिली, श्वासासारखी!

कुठल्याही भाषेत साहित्य लिहिणा-यांमधे दोन गट असतात. अवतीभोवतीची संपन्नता, विपुलता, आनंद पाहून स्वत: संतोष पावणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा एक गट तर आपल्या आजूबाजूची विषमता, दारिद्र्य, दु:ख पाहून अस्वस्थ होणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा दुसरा गट. अर्थात् यातील दुस-या गटाच्या लोकांमुळेच जागतिक साहित्य संपन्न होत असते हे कोण नाकारू शकणार आहे? नारायण सुर्वे हे असेच एक कवी होते. ’कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे’ असा सारस्वतांना इशारा देत त्यांनी आपली कविता सुरु केली. ह्या कवितेत होता ना कसला आव, ना कसला इशारा ना कसली द्वेषभावना, तिच्यात होती फक्त वेदना. वेदना ’भाकरीचा चंद्र शोधण्यात आख्खी जिंदगी बरबाद झाल्याची’. ’मास्तर, तुमचंच नाव लिवा...’ यासारख्या कवितेत कुण्या आईची तर ’मनिऑर्डर’ सारख्या कवितेत कुणा वेश्येची. पण अशी वेदना मनात असूनही सुर्व्यांचे मन करपले नाही. कुणाविषयीही राग किंवा अढी त्यांच्या मनात कधीच राहिली नाही. एवढे सोसूनही सुर्व्यांचे मनातले पाणी निखळ राहिले ते गढूळले नाही, हे विशेषच नाही का?

आयुष्याच्या पुर्वार्धात नारायण सुर्व्यांवर केलेल्या अन्यायाची सव्याज परतफेड नियतीने नंतर केली. महाराष्ट्र, भारत सरकारचे अनेक पुरस्कार, १९९५ सालच्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ११९८ साली पद्मश्री असे अनेक गौरव सुर्व्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अनुभवायला मिळाले. अर्थात् एवढे सारे होऊनही सुर्वे अगदी साधेच राहिले, अगदी त्यांच्या कवितांसारखे. आयुष्याच्या अखेरची काही वर्षे त्यांनी मुंबई सोडून जवळच्याच नेरळ गावी काढली. मुंबईने दिलेल्या चटक्यांमुळे आपली शेवटची वर्षे कुठेतरी निवांत जागी घालवावीत असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला असेल काय?

ज्या कष्टक-यांची दु:खे नारायण सुर्व्यांनी सा-या जगापुढे कवितारुपाने मांडली त्या सा-या शोषितांच्या मनात आज ह्याच ओळी असतील -

सुर्वेसाहेब,
तुम्ही कवितेऐवजी रद्दी विकली असती तर काय झाले असते,
निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते.
असे झाले नाही; तुम्ही शब्दांतच इतके नादावला, बहकला,
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते.

पण तुम्ही नसता तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
आमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात तुम्हाशिवाय सोबतीस कोण असते
चला बरे झाले; तुम्हाला कवितेतच खराब व्हायचे होते!

Thursday, August 12, 2010

घरं आणि आठवणी !

ह्या घरातले आमचे शेवटचे काहीच दिवस उरलेत, पण अजून तरी आठवणी दाटून येऊन उगाचच वाईट वाटणं असं काही घडलेलं नाहीये. जसजशी घर सोडायची तारीख जवळ येईल तसतसे दु:खाचे कढ दाटून येतील किंवा मन भरून येईल असं वाटलं होतं खरं, पण प्रत्यक्षात तसं घडण्याची काही एक चिन्हे दिसत नाहीयेत. किंबहुना मनाला असं काही वाटत नसल्यामुळेच थोडंसं विचित्र वाटतंय हे मात्र नक्की.

खूप घरं बदलली आम्ही. आई नि पप्पांचं लग्न झालं आणि त्यांनी सासवडला काटकर चाळीत संसाराला सुरूवात केली. त्या एका खोलीत आई, पप्पा, काका नि आत्या असे चार जण रहात. त्या एका खोलीच्या भयाणकथा आईने आम्हाला अनेकदा ऐकवल्या आहेत नि दर वेळी तिच्या सासरच्या लोकांचा उद्धार करायची संधी साधून घेतली आहे. तिथून आम्ही म्हस्के ह्या प्रेमळ घरमालकांच्या वाड्यात रहायला गेलो. मी तेव्हा खूपच लहान होतो, त्यामुळे तिथले दिवस मला काही आठवत नाहीत. नंतर एक दोन वर्षांतच म्हाडाची नविन घरयोजना हडको सुरू झाली नि मग आम्ही हडकोत रहायला गेलो. ’पप्पा रंगीत टीव्ही घ्यायला निघाले होते, पण मी त्यांना थांबवलं नि घडकोत पैसे गुंतवायला सांगितले’ असं आई नेहमी आम्हाला सांगायची. आम्ही घडकोत रहायला गेलो तरी म्हस्के वाड्यात नेहमी जायचो हे मात्र आजही आठवतं. म्हस्के परिवार होताच तसा. राजबिंडे म्हस्के काका, मराठा असूनही ब्राह्मणी वळणाने बोलणा-या देखण्या नि अतिप्रेमळ म्हस्के बाई, त्यांच्या दोन मुली नि माझ्यापेक्षा मोठा एक मुलगा मनू. त्यांचा तो मोठ्ठा वाडा नि त्यातलं ते चिंचेचं झाड मला अजून आठवतं. सासवड आम्ही कधीच सोडलं असलं आणि सासवडचं ते घरही दोन वर्षांपुर्वीच विकलं असलं तरी म्हस्के आज्जीआजोबांकडे आम्ही अजूनही जातो. आत्ता काही महिन्यांपुर्वीच जाऊन आलो त्यांच्याकडे, अजूनही तस्सेच आहेत दोघे. प्रेमळ नि माया लावणारे. जेवूनच जा असं नुस्तं म्हणून न थांबता जेवूनच पाठवणारे. मंजूला (माझी आत्या) का नाही घेऊन आलात असं विचारणारे.

हडकोत आम्ही ७/८ वर्षे होतो. पहिली ते सहावी अशी सहा नि त्याआधीची एक/दोन वर्षे मी तिथे काढली असावीत. हडकोचं हे घर माझं आवडतं कारण ते जमिनीवर, बैठं होतं. आमच्या अगदी घरासमोर नव्हे पण जरा उजव्या बाजूला एक आंब्याचं मोठ्ठं झाड होतं. माझ्या मित्राच्या घरामागे किंवा आमच्या घराजवळच्याच पटांगणात आम्ही क्रिकेट खेळत असू. घराजवळच्या पटांगणाचा उपयोग पतंग उडवण्यासाठीही होत असे. भोंडल्याच्या दिवसात घरासमोरच्या जागेतच भोंडला खेळला जाई आणि कोजागिरीचा नैवेद्य चंद्राला इथेच मिळे.

नंतर पप्पांची बदली झाली नि आम्ही राजगुरूनगरला आलो. इथल्या माझ्या आठवणी काही खूप सुखद नाहीत. आम्ही पहिल्यांदा जिथे राहिलो तो एक बंगला होता. मालक पुढच्या दोन खोल्यांत नि आम्ही मागच्या दोन खोल्यांत रहात होतो. संडास सामाईक. आमच्या खोल्या संपल्याकी लगेचच एक मोठ्ठं शेत होतं. ह्याच्यापलीकडच्या शेतात आमचा क्रिकेटचा डाव रंगे. आमच्या घराशेजारचा मोकळा प्लॉट मी नि शेजारच्या एका आजोबांनी मोकळा केला होता नि तिथे काही दिवस आम्ही बॅडमिंटन खेळत होतो असं मला अंधुकसं आठवतं. घरात रहायला आल्यावर काही दिवसांतच आमच्याकडच्या लहानसहान वस्तू(कपड्याचे साबण/गोडेतेल ई.) अचानक कमी व्हायला लागल्या नि लवकरच हे आमच्या घरमालकांचेच प्रताप आहेत हे आमच्या लक्षात आले. आम्ही आमच्या घराची किल्ली त्यांच्याकडे ठेवून त्यांच्यावर जो विश्वास ठेवत होतो त्याचा ते गैरफायदा घेत होते. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे किल्ली ठेवणं बंद केलं तेव्हा ’का हो?’ असं घरमालकीणबाईंनी खोदून खोदून विचारलेलं मला स्पष्ट आठवतं. ह्या लोकांकडे एक कुत्राही होता, राजा नावाचा. त्याला जिन्याच्या पॅसेजात मोकळे सोडले जाई, त्यामुळे गच्चीवर गेले की राजासाहेबांच्या शौचरांगोळीतूनच मार्ग काढावा लागे. हळूहळू राजाची तब्येत ढासळत गेली नि एक दिवस बिचा-याचा कार्यभाग आटोपला. मग घरमालकांनी नि त्यांच्या मुलाने त्याला मागे शेतात पुरले. घरमालकांना एक मुलगा नि दोन मुली अशी तीन अपत्ये होती. त्यापैकी धाकटी तायडी गोड गोड बोलून नेहमी मला त्यांचे सामान आणण्यासाठी पिटाळे (आमचे घर लुटण्यासाठी?) हेही मला अगदी स्पष्ट आठवते.

ह्या सा-या कटकटींना कंटाळून आम्ही हा बंगला सोडला नि तिन्हेवाडी रस्त्यावरच्या एका चाळीत राहायला गेलो. पण इथे आमची ’आगीतून फुफाट्यात’ अशी अवस्था झाली. बंगल्यात संडास सामाईक होता पण तो आमच्यात नि घरमालकांत. इथे ह्या चाळीत १२ की १४ घरांना फक्त तीन संडास होते. स्वत: मालक नि एक ’अतिमहत्वाचे’ भाडेकरू ह्या दोघांना मात्र घरातच संडास होते. अजून एक गोष्ट म्हणजे वर घरात बाथरूम नव्हे तर चक्क मोरी होती. इथे पाणी नियमितपणे येत नसे, त्यामुळे ते आले की घरातल्या झाडून सगळ्या पात्रांमधे साठवून ठेवावे लागे. चाळीत आमचे घर वरच्या मजल्यावर अगदी कडेला असल्याने घरात येताना सगळ्यांच्या घरातली मनोहारी दृश्ये इच्छा नसतानाही पहावी लागत. कहर म्हणजे आम्ही पोरे या लहानशा जागेतही प्लास्टिकच्या बॉलने चक्क क्रिकेट खेळत असू. ह्या घरमालकांचा मुलगा महेश नि त्याचा मेंगळट चेहरा मला आजही अगदी स्पष्ट आठवतो.

खेडमधे सातवी नि आठवी अशी दोन वर्षे काढल्यावर आम्ही माझ्या नववीत पुण्याला आलो. पुण्यातला आमचा फ्लॅट पूर्ण झाला नसला तरी नववीत मला नूमवित प्रवेश घेतल्याने आम्हाला पुण्यात यावेच लागले. इथे आम्ही बिबवेवाडीत महेश सोसायटीत अगदी आतल्या बाजूला एक घर भाड्याने घेतले होते. इथेही खेडचीच पुनरावृत्ती झालेली, म्हणजे मालक खाली नि आम्ही वर. दोन लहानश्या खोल्यांमधे आम्ही कसे रहात असू असा विचार आत्ता केला की डोके भंजाळते. काही घरमालकांची जात मराठा किंवा ब्राह्मण नसते तर ते फक्त ’खडूस घरमालक’ या जातीचे असतात, आमचे घरमालक असेच होते. एकदा मला इस्त्री करत असताना पाहिल्यावर ’तुम्ही तर म्हटला होतात घरी इस्त्री करणार नाही म्हणून...’ असे त्यांनी माझ्या आईला विचारले. त्यावर माझ्या आईनेही ’तो इस्त्री करत नाहीये, फक्त कशी करायची ते शिकतोय’ असे खमके उत्तर दिले. (आमचे वीजेचे मीटर वेगळे नसल्याने आम्ही वीज काटकसरीने वापरावी असा आम्हाला घरमालकांचा प्रेमळ आग्रह होता.) या घरात आमच्या समोरच एक छोटे कुटुंब भाड्याने रहात होते, त्यांचा मुलगा भारीच गोड होता. या काकू नेहमी आमच्याकडे येत नि तासनतास गप्पा मारत, कधीकधी आईही त्यांच्याकडे जाई. या घरमालकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या त्यांना चक्क दोन बायका होत्या!

पण सुदैवाने काही महिन्यांतच आमचा फ्लॅट पूर्ण झाला नि आम्ही ९५ साली तिथे रहायला गेलो. हे घर मला आवडले, तिथे खाली आजूबाजूला बरीचशी मोकळी जागा होती नि झाडेही. इथली गुलमोहोराची झाडे उन्हाळ्यात फुलत नि त्या गरम दिवसात डोळ्यांना अंमळ गारवा देत. क्रिकेट खेळायची आमची इथली जागा म्हणजे आमच्या इमारतीखालचे पार्किंग. पार्किंगमधे क्रिकेट खेळणे नि तिथेच असलेल्या नळावर ढसाढसा पाणी पिणे हा आमचा उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला नि दर रविवारचा नियमित कार्यक्रम होता. हे घर रस्त्यापासून अगदी जवळ आणि तरीही अगदी शांत होते. असे असले तरी हा प्लॅट होता अगदी छोटा. एक बेडरूमचा. नि शिवाय त्याची रचनाही विचित्र होती. म्हणजे आगगाडीच्या डब्यासारख्या एका पाठोपाठ एक खोल्या. म्हणजे पहिला दिवाणखाना, नंतर स्वयंपाकघर. मग डाव्या बाजूला बाथरूम नि उजव्या बाजूला स्वच्छतागृह. त्यानंतर बेडरूम. हळूहळू हा फ्लॅट आम्हाला लहान पडायला लागला नि पुन्हा आमचा नविन घराचा शोध सुरू झाला.

हा शोध संपला पुणे सातारा रस्त्यालगतच्या आमच्या सध्याच्या प्लॅटमधे. इथे आम्ही २००४ साली रहायला आलो आणि गेली सहा वर्षे आहोत. अर्थात इथेही अडचणी होत्याच. हा फ्लॅट २ बेडरूमचा असला तरी आकाराने लहान. शिवाय इथे सोसायटी वगेरे प्रकार नसल्याने अनंत अडचणी. आम्ही आल्यावर एक का दोन वर्षांनी आमच्या सोसायटीतला ट्रान्सफॉर्मर उडाला आणि आम्ही जवळजवळ एक आठवडा अंधारात काढला. कारण सोसायटी नव्हतीच आणि बिल्डरला इमारत पूर्ण झाल्यावर तिची पर्वा कशाला? इथे सुरक्षाव्यवस्था काही नाही, तेव्हा आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती. शिवाय पार्किंगची जागा लहान असल्याने गाड्या उभ्या करायला अडचण. त्यात सोसायटी साफ करायची काही व्यवस्था नसल्याने सगळीकडेअ कच-याचेच साम्राज्य. शिवाय हा फ्लॅट रस्त्याला लागूनच असल्याने आम्हाला वाहनांच्या/मिरवणुकांच्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागे. सात वाजले की खालच्या हॉटेलांमधे बनणा-या अनेक खाद्यपदार्थांचा एक संमिश्र नकोसा वाट घरात घमघमे. शेवटी आम्ही वैतागलो नि हा फ्लॅटही सोडायचा निर्णय घेतला. पण का कोण जाणे, आता पुन्हा फ्लॅटमधे रहायला जायची आमची इच्छा नव्हती. आता बंगल्यातच रहायला जावे असे आम्ही ठरवले नि जागेचा शोध सुरू झाला. फ्लॅट शोधणे सोपे पण जागा शोधणे अती अवघड. अनेक जागा पाहिल्यावर त्यातल्या एखाददुसरी जागा आम्हाला आवडे. जर जागा आवडली तर ती परवडणारी नसे. आणि ती परवडणारी असली तर ती कटकटीची असे. जवळजवळ दोन वर्षे आम्ही जागा शोधत होतो, पण आम्हाला पसंत पडेल अशी जागा काही सापडेना. शेवटीशेवटी तर एखादा फ्लॅटच विकत घ्यावा असे वाटू लागले. पण नशिबाने साथ दिली नि अखेरीस आम्हाला मनोजागती जागा आमच्या सध्याच्या फ्लॅटपासून अगदी थोड्याच अंतरावर मिळाली. आता काही दिवसातच नविन घराच्या बांधकामाला सुरूवात होईलही!

अर्थात एवढे सगळे होऊनही आमचा घराचा शोध चालूच आहे! बंगला बांधून होईपर्यंत काही महिने तरी आम्हाला भाड्याच्या घरात काढायचे आहेत, तुमच्या माहितीत आहे एखादे रिकामे घर?

ता.क. माझ्या जालनिशीवरची जुन्या घरातली ही शेवटची नोंद ठरेल काय?

Wednesday, July 28, 2010

शादी डॉट कॉम आणि मी!

आम्ही सत्ताविशी पार करताक्षणीच ’या वर्षी तुझे लग्न झालेच पाहिजे’ असे आमच्या पालकांनी जाहीर केले आणि आम्हाला ’मुली पहाणे’ या कार्यक्रमाला नाईलाजाने सुरूवात करावी लागली. (बाकी सध्याचे स्त्रीमुक्तीचे दिवस आणि या कार्यक्रमाला आलेले स्वरूप पाहता त्याला मुलींचा ’मुले पहाणे’ कार्यक्रम असे म्हणणेच योग्य ठरेल, पण तो विषय वेगळा.) तेव्हा मुली पाहणे ठरल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या जातीतल्या लग्नाळू मुलींची यादी कुठूनतरी पैदा करण्यात आली आणि तिच्यातल्या सुंदर पोरींच्या नावांवर टीकमार्क करत त्यांना फोनाफोनी सुरू झाली. त्यातल्या एखाद्या मुलीचे लग्न ठरल्याची सुवार्ता मिळे, पण असा प्रसंग विरळाच, त्यापैकी बहुतेकींची लग्ने अजून व्हायचीच होती. अचानक, का कोण जाणे, पण लग्न जमवणा-या संकेतस्थळांवरच्याही मुली पहाव्यात अशी टूम निघाली आणि मला नाईलाजाने तिथेही नाव नोंदवावे लागले. हा लेख म्हणजे या संकेतस्थळांवर मला आलेल्या दुर्दैवी अनुभवांचीच शिदोरी आहे.

दोन महिने या संकेतस्थळांवर घालवल्यावर मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की इथे मुलींचे फक्त दोनच प्रकार असतात. १) अशा मुली ज्यांमधे तुम्ही रस दाखवता पण ज्या तुमच्याकडे ढुंकुनही बघत नाहीत २) अशा मुली ज्या तुमच्यात रस दाखवतात पण ज्यांच्याकडे तुम्ही ढुंकुनही बघत नाही. (हा आता तुम्हाला ज्यांच्यात रस नाही नि त्यांनाही तुमच्यामधे रस नाही अशा मुलींचा एक तिसरा गट असतो, पण आपण तूर्त त्याकडे दुर्लक्ष करू!) मग पहिल्या गटात कोण येतात? तर अप्सरा मुली! या मुली (अर्थातच) दिसायला सुंदर असतात, चांगल्या शिकलेल्या असतात नि हटकून पुणे किंवा मुंबई अशाच शहरांमधल्या असतात. आयटीतल्या असल्यामुळे ह्यांना पगार चांगले असतात आणि ह्यांचे वडील/बंधूही(We live in a 'close knit' family...) एखाद्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारे असतात. तर तुम्ही ह्यांना पाहून खूश होता, जरा चेकाळता नि नंतर मनातल्या मनात मिटक्या मारत ’एक्सप्रेस इंटरेस्ट’ बटन दाबता. बास, संपला विषय! तुम्ही एक दिवस वाट पहाता, दोन दिवस वाट पहाता नि मग एका आठवड्याने काय समजायचे ते समजून जाता. नेमके काय घडते इथे? ह्या सुंदर कन्यकेला दररोज ५ ते १० मजनू मागणी घालत असतात, त्यापैकी एक तुम्ही असता. ती मग तुमचे पान उघडते, एकदा तुमच्या (फोटो)कडे, एकदा तुमच्या पगाराकडे पहाते नि ’हं..हं..’ असे हसून पुढच्या मजनूकडे वळते. पण तुम्हाला नकार न देण्याइतका मुत्सद्दीपणा तिच्याकडे असतो. ह्याची दोन कारणे असतात - पहिले म्हणजे तुम्हाला लटकून ठेवण्याची मजा तिला घेता येते नि दुसरे म्हणजे भविष्यात जर काही अतर्क्य घडामोडी घडल्या (जसे की तुम्हाला अचानक ५० कोटींची लॉटरी लागली) तर तुमच्या मागणीला होकार देण्याचा पर्याय ती मोकळा ठेवू शकते!

दुसरा गट असतो तो तुमच्यामागे लागणा-या मुलींचा. ह्या मुलीही सुंदर असतात, पण असे तुमच्या आईचे मत असते. तुम्हाला काही त्या ’इतक्या’ सुंदर वाटत नाहीत. ह्या शिकलेल्याही कमीच असतात नि नोकरी करत असतील तर तीही असते एखादी साधीशीच. प्रोफाईलची सुरूवात करताना त्या नेहमी ’हॅलो, मायसेल्फ कल्पना...’ अशीच करतात (मायसेल्फ या शब्दावर कायद्याने बंदी आणली पाहिजे!) आणि त्यांच्या प्रोफाईलमधे ’होमली’ हा शब्द कमीतकमी तीनदा तरी असतोच. ’I like listening music/born and brought up in Sangli/looking for a sutaible person' ही यांच्या प्रोफाईलमधली काही नेहमीची वाक्ये. तुमच्यात एका मुलीने रस दाखवला आहे हा संदेश वाचून तुम्ही संकेतस्थळावर जाता आणि ही मुलगी पहाताच तुमचे विमान क्षणात ३० हजार फुटावरून १०० फुटावर येते. (अर्थात हे मात्र खरे, ह्या मुलींना कितीही नावे ठेवलीत तरी तुमचे लग्न अशाच एखाद्या मुलीशी होणार हे तुम्हाला एव्हाना पुरते कळून चुकलेले असते!)

तीन महिने संकेतस्थळांवर चिक्कार मुली पाहिल्यानंतर (आणि प्रचंड विचारमंथन केल्यावर) मी खालील निष्कर्षांप्रत पोचलेलो आहे.

१) लग्न जमवण्यासाठी संकेतस्थळांचा काडीचाही उपयोग नाही. त्यांचा वापर करून लग्न जमलेला/जमलेली एकही ईसम/स्त्री मी माझ्या आख्ख्या आयुष्यात पाहिला/ली नाही. किंबहुना या संकेतस्थळांच्या जाहिरातीत दिसत असलेली जोडपीही बनावट आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
२) आयटीतला माणूस म्हणजे लग्नाच्या बाजारातला भारी माल, म्हणून त्याला गोरी/देखणी बायको मिळणारच हे समीकरण पूर्णपणे चुकीचे आहे. हे समीकरण ज्याने रूढ केले त्या माणसाला एका खोलीत बंद करून हिमेशची सगळी गाणी पुन्हापुन्हा ऐकण्याची शिक्षा द्यायला हवी.
३)एका संकेतस्थळावर नकार मिळाल्यावरही त्याच मुलीला पुन्हा दुस-या संकेतस्थळावर संदेश टाकल्यावर ती कंटाळून कदाचित तुम्हाला हो म्हणेल असा जर तुमचा समज असेल तर तो एक गोड गैरसमज होय.
४)आमच्यासारख्या रुपाने सामान्य मुलांसाठी सरकारने काही कठोर कायदे करायला हवेत. म्हणजे ह्या सुंदर मुली सुंदर मुलांशी लग्न करणार आणि आमच्यासारखी रुपाने सामान्य मुले राहिलेल्या मुलींशी. सुंदर जोडप्यांना सुंदर मुले होणार आणि सामान्य जोडप्यांना सामान्य. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असे चालू राहिले तर दिसायला एकदम सुंदर नि आमच्यासारखे सामान्य अशा दोनच प्रजाती जगात शिल्लक राहतील, सरकारला ही गोष्ट भितीदायक वाटत नाही का?

तेव्हा मित्रहो, ह्या संकेतस्थळांच्या नादी लागणे सोडा आणि आपल्या आजूबाजूला दिसणा-या पोरींपैकी एखादी सुबक ठेंगणी पटवायचा प्रयत्न करा. कसें?

Sunday, July 18, 2010

माझ्या लाडक्या सख्याहरी...

’कारूण्याचा विनोदी शाहीर’ असे अत्र्यांनी ज्यांना म्हटले त्या दत्तू बांदेकरांना मी जनसामान्यांचा विनोदवीर मानतो. इतके साधे, सोपे, सरळ, तरीही काळजाला चटका लावणारे लेखन करणारा विनोदी लेखक चि. वि. जोशींनंतर मी अजून पाहिलेला नाही. अर्थात चिवींचे लिखाण हे पांढरपेशा मध्यमवर्गीय जगाचे चित्रण करणारे होते, बांदेकरांचे लिखाण मात्र त्याहून वेगळे आहे. हे लिखाण गरीबांचे आहे, वेश्यांचे आहे, भिका-यांचे आहे, नायकिणींचे आहे, झोपडपट्टीत राहणा-या लोकांचे आहे, आणि वेगळ्या शब्दांत सांगायचे तर भारतातल्या शंभरातील नव्वदांचे आहे.

कारवारला राहणा-या नि कानडीतून शिक्षण झालेल्या बांदेकरांनी मराठी भाषेत विनोदाचे एक नवे युग निर्माण करावे हा एक चमत्कारच नव्हे तर काय! बहुजनसमाजाला पोट धरूनधरून हसायला लावणारा त्यांच्यासारखा विनोदी लेखक पुन्हा झाला नाही. विनोद ही उच्च अभिरूची असलेल्या लोकांनी आस्वाद घ्यायची एक खास गोष्ट आहे हा समज बांदेकरांनी खोटा ठरवला. किंबहुना अगदी साध्यासुध्या, रोजच्या प्रसंगातूनही उत्तम विनोदनिर्मिती होऊ शकते हे त्यांनी स्वत: आपल्या लेखनाने सिद्ध केले. उत्तम विनोदाला कारूण्याची झालर असते हे अनेक विनोदवीरांनी पुन्हापुन्हा दाखवून दिले आहे, बांदेकरांचा विनोदही असाच आहे. गरीबांची रोजची दु:खे, त्यांच्या समोरची संकटे, त्यांची जगण्याची लढाई यातून बांदेकरांचा विनोद फुलत असल्याने तो वाचताना एकाचवेळी हसूही येते नि ह्दयही गलबलते. त्यात बांदेकर पत्रकार, त्यांचे बरेचसे लेखन वर्तमानपत्रात झाले, तिथे लेखन करणे ही तर आणखीनच अवघड गोष्ट. कुठल्यातरी आयत्या विषयावर हे लेखन अचानक करावे लागते आणि तरीही ते दर्जेदार असावे लागते. मराठीत शिक्षणही न घेतलेल्या नि विनोदाचीच काय, इतर कुठलीही पुस्तके न वाचलेल्या बांदेकरांना हे कसे जमले असेल? आणि एवढे सगळे करूनही बांदेकर वृत्तीने अगदी अलिप्त होते हे विशेष. स्वस्तुती करणे, इतरांची हांजी हांजी करणे, पुरस्कारांवर डोळा ठेवणे, आदर/मानमरातब यांसाठी प्रयत्न करणे हे सगळे सोडाच, आपल्या लेखनाविषयी बोलणेही त्यांना मंजूर नव्हते. अशा या निगर्वी, साध्या नि एकलकोंड्या विनोदवीराचे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ४ ऑक्टोबर १९५९ रोजी निधन झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी बांदेकरांनी आपली लेखणी झिजवली तो संयुक्त महाराष्ट्र शेवटी बांदेकरांना पहायला मिळाला नाही ही नियतीची केवढी क्रूर थट्टा!

बांदेकरांचा सुप्रसिद्ध ’सख्या हरी’ जर आज असता तर काय झाले असते त्याची कल्पना करून मी हा लेख लिहिला आहे. मात्र वाचकांनी हे ध्यानात असू द्यावे की हा लेख माझा आहे, त्यामुळे त्यात आढळणारे दोष नि त्रुटी या माझ्याच आहेत. ह्या लेखावरून मूळ सख्या हरीची पात्रता जोखण्याचा प्रयत्न वाचकांनी करू नये. हा फक्त बांदेकरांच्या एका चाहत्याचा त्यांना साहित्यरूपी आदरांजली देण्याचा एक प्रयत्न आहे हे लक्षात असू द्यावे.


माझ्या लाडक्या सख्या हरी, ’पॉल’ ऑक्टोपसाचे प्रताप पाहून एक ऑक्टोपस पाळावयाचे नि त्याजकडून लोकांचे भविष्य ऐकवण्याचे तुझे इरादे ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली आहे. त्यातच हा ऑक्टोपस तारापोरवाला मत्स्यालयातून पळवण्याची तुझी मनिषा ऐकून तर हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले आहे. सख्याहरी, तुला वेड तर लागले नाही ना? अरे ऑक्टोपस काय मांजर आहे की कुत्रा आहे? आणि त्या ऑक्टोपसाला तू काय खायला घालणार आहेस? कांदे बटाटे? जेम्स बॉन्डचा ’ऑक्टोपसी’ पाहून तू मागे एकदा वेडा झाला होतास, आता खरोखरीचा ऑक्टोपस पाहून तू वेडा झाला आहेस! बाकी चित्रविचित्र प्राणी पाळायची ही तुझी सवय जुनीच. मागे एकदा ’कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा’ हे गाणे ऐकून तू एक ससा पाळला होतास हे तुला आठवते का? पण त्या सशाने पहिल्या दिवशी तुझ्या घरातली विजेची तार, दुस-या दिवशी तुझ्या पहिली पास ते दहावी नापास पर्यंतच्या सगळ्या गुणपत्रिका नि तिस-या दिवशी तुझी आतली चड्डी कुरतडली(नशिब तू ती तेव्हा घातली नव्हतीस!) तेव्हा कुठे तुझे डोके ठिकाणावर आले नि तू त्याला राणीच्या बागेत सोडून आलास. सख्याहारी तू हे धंदे का करतोस, तू आधीच तुझ्या घरात बक्कळ झुरळे नि ढेकणे पाळली आहेत हे काय कमी आहे का?

माझ्या लाडक्या प्रियकरा, माझे ऐक नि हे खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक. अरे ज्योतिषाच्या या धंद्याने आजपर्यंत कुणाचेही भले झाले नाही. पोपट जवळ ठेवून फुटपाथवर बसलेले ते कुडमुडे ज्योतिषी तू पाहिले नाहीस काय? अरे जर खरंच त्यांना ज्योतिष कळत असते तर ते जन्मभर असे फुटपाथवरच का राहिले असते? ज्योतिष वगेरे खरे होण्याचे दिवस वेगळे होते, तो काळ सत्ययुगातला होता. तप करून मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा तो काळ होता, सध्याचा काळ जिवंत माणसाला मृत बनविण्याचा आहे. तेव्हा माझे ऐक नि हा विचार मनातून अजिबात काढून टाक.

माझ्या प्रेमाच्या गुलकंदा, का कोण जाणे, पण मला तर अशी शंका येत आहे की तुझ्या रेसच्या नादामुळेच तू हा धंदा करायचे ठरवले आहेस. ह्या ऑक्टोपसाकडून रेसचे निकाल माहित करून घ्यायचे नि त्यावर बक्कळ पैसे कमवायचे असा एकंदर तुझा उद्योग दिसतो. सख्याहरी हे रेसचे खूळ तुझ्या डोक्यातून कधी जाणार आहे? ’तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही’ या उक्तीनुसार कितीही समजावले तरी तू पुन्हा घोड्यांवर पैसे लावतोसच! अरे मंत्र्यांच्या घोडेबाजारात सौदे करून तू एकवेळ करोडपती होऊ शकशील पण घोड्य़ांच्या शर्यतींवर पैसा लावून तुला कधी १०० रुपयेही मिळवता येणार नाहीत हे तुला का समजत नाही? त्यापेक्षा तू शेअरबाजारात पैसे लावत जा, तिथे सध्या ’इन्फोसिस’चा घोडा (नव्हे शेअर) जोरात आहे असे मी ऐकते, तू तिथे का प्रयत्न करत नाहीस?

जिवलगा, ऑक्टोपस पाळण्यात अजूनही अनेक धोके आहेत हे तू ध्यानात घे. पिटा संस्थेचे सभासद सध्या अशा गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून असतात हे लक्षात ठेव. माणूस सोडून इतर कुठल्याही प्राण्याचे शोषण केलेले या संस्थेला चालत नाही हे तू विसरू नकोस आणि त्या मेनका गांधी आत्ता सरकारात नसल्या तरी त्या काहीच करू शकत नाहीत असेही वाटून घेऊ नकोस. त्या शेवटी ’गांधी’ आहेत आणि आपल्या देशात त्या आडनावाला मोठे मोल आहे हे समजूनच पुढची पाऊले टाक. नाहीतर ऑक्टोपसाच्या आठ पायांसाठी त्या तुला आठ वर्षे जेलात टाकतील नि मला इथे तुझी वाट पहात एकटीनेच झुरत रहावे लागेल. त्याशिवाय आपल्या ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’लाही हे तुझे धंदे मुळीच आवडणार नाहीत हे मी खात्रीने सांगते. तिचे ते दाभोळकर ’ऑक्टोपस भविष्य वर्तावतो हे सिद्ध करा नाहीतर मुंडण करून घ्या’ असे आव्हान तुला देतील नि ते न पेलल्यामुळे तुझ्या डोक्याचे मुंडण त्यांनी केले तर नाक कापले गेलेल्या तुझ्याशी मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही हेही ध्यानात ठेव. म्हणूनच म्हणते सख्याहरी, हे नसते धंदे सोड नि दुसरा एखादा व्यवसाय शोध!

माझ्या गुलाबाच्या फुला, माझे ऐक नि हा विचार मनातून कायमचा काढून टाक. अरे ह्या धंद्यात काहीच राम नाही, किंबहुना ह्या धंद्याला काहीच भविष्य नाही असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. आता ह्या अकरावीच्याच मुलांचे उदाहरण पहा. १२ वेगवेगळ्या राशींची ही मुले होती, पण ’बेस्ट ऑफ फाईव्ह’ने त्यांचे सगळ्यांचे भविष्य एकत्रच टांगणीला लावले की नाही? आणि तू पॉलची स्तुतीगीते गातोस, पण सिंगापूरमधल्या ’मणी’ ह्या पोपटाचा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा अंदाज चुकलाच की! तेव्हा जरा डोक्याचा वापर कर नि भविष्य सांगण्याचा हा व्यवसाय तुझ्या डोक्यातून काढून टाक. ह्याऐवजी एखादा झनाना व्यवसाय तुला करू द्यायचीही माझी तयारी आहे. तू साड्या वीक, बांगड्या वीक, फुलांच्या वेण्या वीक, अत्तर, साबण, तेल, कुंकू, पाऊडर अशा बायकी वस्तू वीक, पण ऑक्टोपस घेऊन लोकांचे भविष्य सांगण्याचा (नि स्वत:चे भविष्य धोक्यात घालण्याचा) हा व्यवसाय तू करू नकोस!

प्राणनाथा, माझे बोलणे कठोर वाटले तरी तू रागावू नकोस, अरे तुझ्या भल्यासाठीच मी हे सांगते आहे. भविष्य सांगणे हा लोकांना उल्लू बनवण्याचा एक प्रकार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तू एक कर्तबगार तरूण आहेस, तू या धंद्याच्या नादी का लागतोस? मला सांग, भविष्य जर खरे होत असते तर जगात लाखो लग्ने रोज का मोडली असती? भविष्य जर खरे होत असते तर निवडणुकीला उभे असलेले सगळेच उमेदवार विजयी झाले नसते का? आणि भविष्य जर खरे होत असते तर जगातले प्रत्येक मूल डॉक्टर इंजिनियर किंवा कलेक्टर झाले नसते का? आता बेळगावचेच उदाहरण घे, बेळगाव महाराष्ट्रात येणार नाही असे कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाने हजार वेळा ओरडून सांगितले तरी तसे झाल्याशिवाय राहणार आहे का? तेव्हा सख्याहरी तो ऑक्टोपस चोरण्याचा विचार सोड, दुस-या कुठल्यातरी धंद्याचे सामान गोळा कर, वाटल्यास तुला मदत करायला मी तुझ्याबरोबर येते! सख्याहरी तू सुरूवात तर करून पहा, तुला साथ द्यायला ही मी मागून आलेच!

Wednesday, July 14, 2010

रीडर्स डायजेस्ट की जाहिरातदारांचे डायजेस्ट?

‘सकाळ‘ वृत्तपत्राचा घसरलेला दर्जा, तिथे पुरती मुरलेली व्यापारीवृत्ती नि तिथे बोकाळलेला सवंगपणा यावर आपण मागेच एका लेखात बोललो. मात्र मराठी भाषेतली वर्तमानपत्रे किंवा प्रकाशने यांपुरतीच ही कीड मर्यादित नाही, भारतातल्या जवळपास सगळ्याच प्रकाशनांना तिने ग्रासलेले आहे. मराठीत ’सकाळ’ची जी स्थिती झाली आहे नेमकी तशीच स्थिती इंग्रजीतल्या ‘रीडर्स डायजेस्ट‘ या मासिकाची झालेली दिसते. या मासिकाचे संस्थापक डीविट वॅलेस नि लीला वॅलेस यांच्या जीवाला आजचे हे मासिक पाहून किती त्रास होत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो!

रीडर्स डायजेस्ट मासिकाची सुरुवात झाली अगदी लहान. सकस लिखाण असलेले एक लहानसे मासिक(जे लोकांना कुठेही नेता येईल व वजनाचा/आकाराचा त्रास न होता वाचता येईल) आपण सुरू करावे या भुमिकेतून वॅलेसने हे मासिक सुरू केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त पुर्वी इतरत्र प्रकाशित झालेले लेखच प्रकाशित होत. (वदंता अशीही आहे की आपल्याकडे आलेले चांगले लेख वॅलेस या अटीमुळेच एखाद्या फालतू प्रकाशनात प्रकाशित करे नि मग त्यांना आरडीत छापे!) हळूहळू मासिकाची लोकप्रियता वाढत गेली नि एक दिवस ते जगात सगळ्यात जास्त वाचले जाणारे मासिक बनले. पण सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंत एक दिवशी होतोच, आरडीच्या बाबतीतही तेच झाले. एका साहित्यवेड्या माणसाने सुरु केलेले हे मासिक शेवटी भांडवलदारांच्या हातात पोचले, त्यांच्या भांडवलशाही वृत्तीचा परिणाम मासिकावर झाला नसता तरच नवल!

अगदी अलीकडे म्हणजे २००० सालापर्यंत आरडीचा दर्जा उत्तम होता. उत्तम लेख, गाजलेल्या पुस्तकांचे सारांश, ‘ऑल इन अ डेज वर्क‘,‘लाफ्टर - द बेस्ट मेडिसिन‘,‘ह्युमर इन युनिफोर्म‘, ’वर्ड पॉवर’ यांसारखी सदरे, पानापानांवर विखुरलेले चुटके, चटकदार वाक्ये यांमुळे आरडी वाचणे म्हणजे साहित्याची एखादी साग्रसंगीत मेजवाणी झोडण्यासारखे वाटे. किंबहुना भारतातच काय, ते सा-या जगात ते सर्वोत्कृष्ट इंग्रजी मासिक होते असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. काही वर्षांपुर्वी अशाच कुणीतरी रद्दीत दिलेल्या १९९० ते २००० सालांतल्या आरडीच्या ऐंशी प्रती मी घरी आणल्याचे आठवते. दोन किंवा तीन रुपयांना एक अशा मिळाल्या असाव्यात, पुढे कितीतरी दिवस त्या मला वाचायला पुरल्या होत्या.

पण एकविसावे शतक सुरू झाले नि आरडीच्या दर्जात हळूहळू घसरण सुरू झाली. एक दर्जेदार मासिक प्रसिद्ध करणे या गोष्टीपेक्षा आरडीच्या प्रकाशनातून होणारा नफा कसा वाढवता येईल हा मुद्दा प्रकाशकांना अधिक महत्वाचा वाटू लागला. यात सगळ्यात पहिल्यांदा कात्री लागली ती मजकुरावर, तो कमी केला गेला नि जाहिराती वाढवण्यात आल्या. मजकुराच्या प्रमाणाबरोबर त्याचा दर्जाही खालावला, सकस, निर्भेळ, दर्जेदार असे लेख देण्यापेक्षा लोकांना आवडेल तो माल देण्याची प्रवृत्ती वाढली. मधल्या काही अंकात प्रसिद्ध झालेल्या सिनेतारकांच्या मुलाखती पाहून तर आरडी हे एखादे फिल्मी मासिक असावे अशी शंका लोकांना यायला लागली. मासिकाच्या छपाईचा/छायाचित्रांचा दर्जा सुधारून त्याचे बाह्यरूप आकर्षक बनवले गेले तरी त्याचा गाभा असलेले लेखन मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक कनिष्ट दर्जाचे बनत गेले. पुढे तर मालकांची हाव इतकी वाढली की नंतर तिच्यातून चक्क मासिकाचे मलपृष्ठही सुटले नाही. एखाद्या सुप्रसिद्ध (किंवा क्वचित उदयोन्मुखही) चित्रकाराचे एखादे सुंदर चित्र मलपृष्ठावर छापायची परंपरा विसरून चक्क तिथे जाहिराती छापल्या जाऊ लागल्या, त्यासाठी चित्राचे ते सदर आत हलवण्यात आले. नोव्हेंबर २००९ सालचे न्यायाधीश श्रीकृष्ण यांची मुलाखत असलेले आरडी आत्ता माझ्यासमोर आहे. १९४ पानांच्या या मासिकात चक्क ६५ पाने जाहिराती आहेत! ६५! म्हणजे चक्क ३३% जाहिराती? ३ पैकी १ पानात जाहिराती, ही तर वाचकांची घोर फसवणूक आहे! अर्थात जाहिराती वाढल्या असल्या तरी मासिकाची किंमत मात्र सतत वाढतच राहिली आहे. काही वर्षांपुर्वी २५-३० रूपयांना विकले जात असलेले हे मासिक आता चक्क ६० रूपयांना विकले जात आहे.

परंतु आरडीच्या दर्जात दिवसेंदिवस होत असलेल्या घसरणीपेक्षाही मला जास्त अचंबित करणारी गोष्ट म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणा-या आरडीच्या प्रतींची(भारतीय आवृत्ती) दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या! याचे कारण काय असावे? याचे कारण सोपे आहे, आरडी वाचणे ही एक फॅशनेबल गोष्ट आहे असा भारतातल्या मध्यम नि गरीबवर्गाचा ग्रह झालेला आहे. आरडी वाचले म्हणजे आपले इंग्रजी सुधारेल हा आणखी एक गैरसमज! एक चांगले नि सगळ्या कुटुंबाला वाचता येण्यासारखे दुसरे चांगले इंग्रजी मासिक भारतात नाही ही नेहमीची रडकथा आहेच!

अर्थात एवढे होऊनही हे मासिक मी का वाचतो असा प्रश्न काही जागरूक वाचक जरूर विचारतील, त्याचे उत्तर सोपे आहे. आजपर्यंत मी आयुष्यात आरडी एकदाही नविन विकत घेतलेले नाही. पुर्वी दोन रुपयांना, तर आजकाल पाच रूपयांना हे मासिक मी रद्दीच्या दुकानातूनच विकत घेत आलेलो आहे. सद्ध्या वृत्तपत्रांचीच किंमत तीन रू. झाली असताना फिल्मी नटनट्यांच्या मुलाखती नि बक्कळ जाहिराती छापत असले तरी विनोदी चुटके वाचण्यासाठी आरडीची पाच रू. किंमत फार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे, काय म्हणता?

Saturday, July 3, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - ४ (’-पण बॅट नाही!’)[अंतिम]

दिवाकरांच्या अनेक नाट्यछटांमधे जीवनातील विसंगती, दु:ख, खोटेपणा, अप्पलपोटेपणा, ढोंगीपणा अशा गोष्टींचे चित्रण असले तरी त्यांच्या सगळ्याच नाट्यछटा या साच्यात बसवता येत नाहीत. बरोबर आहे, प्रत्येक नाट्यछटेत हा मसाला ठासून भरलेला हवाच हा नियम का? रोजच्या जेवणात आपण अनेक चमचमीत पदार्थ खात असलो तरी शेवट वरणभाताने करतोच की! दिवाकरांची ’-पण बॅट नाही!’ ही नाट्यछटा अशीच आहे, एका लहानग्या क्रिकेट खेळाडूचे मोठे गंमतीदार चित्रण यात आहे. या नाट्यछटेचा प्राण म्हणजे हिची भाषा. दिवाकरांची निरीक्षणशक्ती किती बारीक नि अचूक होती हे या नाट्यछटेतून दिसते. दिवाकरांचे हे बोल दिवाकरांचे वाटतच नाहीत, ही नाट्यछटा वाचताना आपण जणू स्टेडियममधे ह्या बालक्रिकेटरशेजारी बसून त्याच्या तोंडचे बोलच ऐकत आहोत असा भास होतो. कुठलेही पात्र तितक्याच सहजतेने उभे करतो तो श्रेष्ठ लेखक असे जर म्हटले तर दिवाकरांना श्रेष्ठ लेखक का म्हणावे ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या नाट्यछटेत मिळते. (एक मजेची गोष्ट म्हणजे, मराठी भाषा मोठ्या वेगाने बदलते आहे असे आपण रोज ऐकत असलो तरी खरेच तसे आहे का असा प्रश्न ही नाट्यछटा वाचल्यावर पडावा. ह्या नाट्यछटेतले बोल जर आजच्या एखाद्या बालक्रिकेटरच्या तोंडी टाकले तर ते मुळीच विचित्र वाटणार नाहीत, अगदी १००% शोभतील त्याला. ही नाट्यछटा ९५ वर्षांची असूनही असे व्हावे, ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का?)

वर सांगितल्याप्रमाणे, ही नाट्यछटा म्हणजे एका लहान क्रिकेट खेळाडूच्या तोंडचे उद्गार आहेत. नुकताच झेलबाद होऊन पॅवेलियनमधे परतलेला हा खेळाडू अर्थातच त्याचा दोष स्वत:कडे घेण्यास तयार नाही, तो पंचांचा चुकीचा निर्णय होता असे तो ठणकावून सांगतो आहे. मात्र आपल्या चांगल्या कामगिरीचे कारण म्हणजे आपली बॅट हे मान्य करायचा प्रामाणिकपणा त्याच्याकडे आहे. ही बॅट कशी बनली आहे, चेंडू टोलवायला कशी हुशार आहे नि कशी आपला जीव की प्राण आहे हेही पुढे तो आपल्याला सांगतो. मग ही लाखमोलाची बॅट दुस-याला द्यायची कशी? त्यामुळेच आपल्या मित्राने बॅट मागितल्यावर ह्या राजश्रींचे उद्गार आहेत, ’स्वत:च्या जीवाचा माणूस, अरे स्वत:चा जीव देईन मी, पण बॅट नाही!’

मूळ नाट्यछटा इथे वाचा.