Tuesday, August 31, 2010

प्रारंभ

रमेश मंत्र्यांची 'प्रारंभ' कादंबरी नुकतीच वाचून संपवली नि एका रसिक मनुष्याने लिहिलेले एक रसाळ पुस्तक वाचण्याचा आनंद मिळाला. खरेतर मराठीत लेखकांची आत्मचरित्रे फार नाहीत. म्हणजे लेखकांनी स्वत:बद्दल अनेकदा लिहिले आहे खरे, पण आपल्या संपूर्ण आयुष्याला शब्दबद्ध करणारे साहित्यिक विरळेच! आचार्य अत्र्यांचे 'क-हेचे पाणी', गंगाधर गाडगीळांचे 'एका मुंगीचे महाभारत' असे काही अपवाद. पण रमेश मंत्र्यांनी आपले आत्मवृत्त लिहिले आहे आणि ते नुसतेच न लिहिता अगदी प्रामाणिकपणे, कसलाही आडपडदा न ठेवता लिहिले आहे!

मंत्र्यांच्या आयुष्याचे जन्मापासून साधारण तरूणपणापर्यंतचे चित्रण या पुस्तकात आहे. पुस्तकाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंत्र्यांचा प्रामाणिकपणा नि कुठलीही गोष्ट न लपवता जे जसे घडले तसेच ते सांगण्याची त्यांची भूमिका. आपल्या (किंवा इतरांच्याही) आयुष्यातले कुठलेच गुपित मंत्र्यांनी दडवून ठेवलेले नाही. जे जसे घडले तसे ते त्यांनी अगदी सरळ वाचकांसमोर मांडले आहे. मंत्र्यांचे सगळेच कसे खुल्लमखुल्ला आहे, नदीच्या डोहातल्या निखळ पाण्यातून त्याचा तळ एखाद्या गरम दुपारी स्पष्ट दिसावा असे काहीसे. हा मोकळेपणा विशेष आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. असे करायला विलक्षण धैर्य लागते, मनाचा विलक्षण निग्रह लागतो, तो मंत्र्यांकडे आहे. त्यामुळेच पुस्तकात आपल्याला मंत्र्यांच्या पहिल्या चुंबनाविषयी, त्यांच्या सुनंदा, कमलिनी या मैत्रिणींविषयी (आणि मंत्र्यांनी त्यांसोबत घालवलेल्या मधुर क्षणांबद्दलही) वाचायला मिळते. विवाहित स्त्रीयांनी आपल्याला गटवण्यासाठी केलेले सारे प्रयत्न (आणि त्या यशस्वी झाल्यावर आलेले अनुभवही) मंत्री असेच विनासंकोच सांगतात. आपल्या 'विझलेली आग' या पुस्तकाविषयी किंवा ना. सी. फडके यांच्या 'सेकंड क्लास का तुम्हाला मिळाला? मागून भेटा तुम्ही आम्हाला!' या किस्याविषयीही मंत्री असेच हातचे काहीही राखून न ठेवता लिहितात. आत्मचरित्र असे हवे! केवळ आपल्याला रूचतील अशा काही निवडक गोष्टीच सांगणारे किंवा इतर जण दुखावतील म्हणून त्यांच्याविषयी न लिहिणारे आत्मचरित्र खरे कसे म्हणावे?

पुस्तकाचा दुसरा विशेष म्हणजे त्यातली रसाळ भाषा. 'रसाळ' या शब्दाचा वापर जरी हलक्या हाताने होत असला तरी मराठीत रसाळ लिहिणारे लेखक अगदी थोडे आहेत, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे. आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ ही काही चटकन डोळ्यांसमोर येणारी नावे. या नामावलीत रमेश मंत्र्यांचे नाव टाकायला काहीच हरकत नसावी. या पुस्तकातली भाषा विलक्षण रसाळ आहे आणि मला वाटते याचे मूळ मंत्र्यांच्या रसिक स्वभावात आहे. जीवनातला कुठलाही अनुभव घ्यायला मंत्र्यांची ना नाही, किंबहुना कुठलाही नवा अनुभव घ्यायला ते सदैव उत्सुक आहेत. ब-याचदा आत्मवृत्तांना कंटाळवाण्या रोजनिश्यांचे स्वरूप येतो, या पुस्तकाचे मात्र तसे नाही. ते वाचताना आपण एक पुस्तक वाचत आहोत असे वाटतच नाही, असे वाटते की मंत्री आपले बोट धरून आपल्याला त्या काळात ओढून नेत आहेत नि त्या घटना घडतानाच आपल्याला प्रत्यक्षात दाखवत आहेत. यामुळेच की काय, हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही; पुढे काय होईल, मंत्र्यांच्या आयुष्यात पुढे कुठली चमत्कारिक घटना घडेल हा प्रश्न वाचकाला सतत पडत रहातो!

पुस्तक वाचताना पानापानावर जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे रमेश मंत्र्यांची जीवनाला आनंदाने सामोरे जाण्याची वृत्ती. मंत्र्यांवर अनेक संकटे आली, परिस्थितीने अनेक चटके त्यांना दिले तरीही ते त्रासलेले किंवा वैतागलेले दिसत नाहीत. गर्भश्रीमंत बालपणापासून कर्जबाजारी तारूण्यावस्थेच्या प्रवास मंत्र्यांनी केला पण त्याबद्दल एक कटू अवाक्षरही ते काढत नाहीत. आपल्या आयुष्यात घडलेले आनंददायक किंवा दु:खदायक प्रसंग मंत्री तेवढ्याच अलिप्तपणे कथन करतात. आपला भाऊ अण्णा यानं वीस हजार रू. उडवून आपल्याला कॉलेजच्या फीसाठीही कसं महाग केलं हे ज्या सहजतेने मंत्री सांगतात तेवढ्याच सहजतेने 'सकाळ'चे नानासाहेब परूळेकर यांनी आपल्याला परदेशगमनासाठी एक हजार रूपये दिले तेही सांगतात. मंत्र्यांनी इतरांबाबत खरेखुरे लिहिले आहे असे मी म्हटलो, पण त्याचा उपयोग त्यांनी जुने हिशोब चुकते करण्यासाठी केलेला नाही. वाईटाला वाईट म्हणतानाच, चांगल्याला चांगले म्हणण्याइतका दिलदारपणाही त्यांनी दाखवलेला आहे.

या आत्मचरित्राचे 'मध्यम' नि 'अंत' असे पुढचे दोन भाग लिहिण्याचा मंत्र्यांचा मानस होता पण दुर्दैवाने तो पुरा होऊ शकला नाही. ९२ साली हे पुस्तक लिहून पूर्ण झाल्यावर ९३ सालच्या सप्टेंबर महिन्यात मंत्र्यांना अतिरक्तदाबामुळे पक्षाघात झाल्याने पुढच्या दोन्ही पुस्तकांचे काम थांबले. अर्थात मंत्री त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहू शकले नि तो आपल्याला वाचायला मिळाला यातच आपण समाधान वाटून घ्यायला हवे, नाही का?

केवळ मंत्र्यांच्या चाहत्यांनीच नव्हे तर प्रत्येक मराठीसाहित्यप्रेमी व्यक्तीने वाचावे असेच हे पुस्तक आहे!

प्रारंभ
रमेश मंत्री
अनुभव प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती : १ जुलै १९९५
किंमत : २२५ रू.

शासनाचे दोन तुघलकी निर्णय

आपली शासनयंत्रणा काहीच करत नाही अशी ओरड आपण नेहमी करत असतो, त्यामुळेच की काय, अचानक एखादा तुघलकी निर्णय घेऊन आपले अस्तित्व दाखवून देणे असा प्रकार तिच्याकडून नेहमीच घडताना दिसतो. लेखाचे कारण म्हणजे नुकतेच महाराष्ट्र सरकारने नि पुणे महानगरपालिकेने घेतलेले असेच दोन निर्णय. यातला पहिला निर्णय आहे महाराष्ट्र सरकारचा. या निर्णयानुसार अनेकपडदा चित्रपटगृहांना यापुढे मराठी चित्रपट दुपारी बाराच्या पुढेच दाखवावे लागतील, याशिवाय असे चित्रपटगृह उभारताना त्यामधे एक पडदा मराठी चित्रपटगृहांसाठी राखूनही ठेवावा लागेल. यातला पहिला निर्णय योग्य वाटत असला नि जरूर टाळ्या वसूल करणारा असला तरी त्यामुळे काहीही साध्य होणार नाही ही एक कटू वस्तुस्थिती आहे. या चित्रपटगृहांमधे दुपारनंतर चित्रपट दाखवल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पहायला प्रचंड गर्दी करतील अशी खात्री कोणी देऊ शकणार आहे काय? एकूनच मराठी चित्रपट टिकवणे ही सरकारची नव्हे तर लोकांची जबाबदारी आहे हे आपण कधी मान्य करणार आहोत? अर्थात ही जबाबदारी आपली आहे हे मराठी प्रेक्षक जाणतात नि ते ती पार पाडायला तयार आहेतच. लोकांना आकर्षित करणारे चित्रपट पडद्यावर आले तर तो पहायला प्रेक्षक चित्रपटगृहांकडे जातातच हे ’नटरंग’, ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ अशा चित्रपटांनी अनेकदा सिद्ध केले आहे. इथे ’चांगले’ नव्हे तर ’लोकांना आकर्षित करणारे’ चित्रपट असे मी म्हणतो. चांगले चित्रपट बनवण्यासोबतच त्याचे विपणनही आजकाल फार महत्वाचे झाले आहे ही गोष्ट मराठी चित्रपटनिर्मात्यांना कधी समजणार? प्रेक्षकांना आकर्षित करतील असे चेहरे, अशा कथा, अशी तांत्रिक सफाई सगळ्याच मराठी चित्रपटांत कधी दिसणार? तेच ते विनोद, तेच ते चेहरे नि त्याच त्या कथा यांचा मराठी प्रेक्षकांना वीट आला आहे हे मराठी चित्रपट निर्माते समजून का घेत नाहीत? पुण्यासारख्या शहरात चार सदस्यांच्या कुटुंबाला चित्रपट पाहण्यासाठी होणारा खर्च हजार रूपयांच्या घरात पोचलेला असताना ’नवरा अवली, बायको लवली’ यासारख्या चित्रपटात ’प्रसाद ओक’सारख्या नटाला पाहण्यासाठी एवढा खर्च करण्याचे धाडस कुठलाच मराठी माणूस (मराठीवर कितीही प्रेम असूनही) करणार नाही! मराठीचे मराठी लोकांना वावडे आहे हे रडगाणे मराठी चित्रपटनिर्माते कुठपर्यंत गाणार? मराठी कार्यक्रम दाखवणा-या दहा वाहिन्या आज आहेत, त्या चालतील याची खात्री असल्याशिवायच का त्या आल्या? मराठी चित्रपटनिर्मात्यांनी नवनविन विषय वापरून चित्रपट बनवावेत, ताज्या दमाच्या चेहे-यांना संधी द्यावी, दहा रूपये कमवण्यासाठी पाच रुपयांचे भांडवल घालावे लागते हे लक्षात ठेवून चित्रपटांवर थोडा खर्चही करावा नि त्यांचे योग्य विपणनही करावे, ते पहायला मराठी प्रेक्षक अगदी उड्या मारत येतील!

दुसरा निर्णय आहे पुणे महानगरपालिकेचा. या निर्णयानुसार आता प्रत्येक नविन घरयोजनेत लहान घरे बांधणे विकसकांसाठी बंधनकारक राहणार आहे. कुठलाही विचार न करता घेतलेले निर्णय कसे हास्यास्पद होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात घरांचे दर १०००० रू. प्रति स्क्वे.फू. इथपर्यंत पोचलेले असल्यामुळे जरी विकसकांनी ३५० ते ४०० स्क्वे. फूटांची घरे काढली तर त्यांची किंमत ३५ ते ४० लाख (इतर खर्च वेगळे) असणार हे नक्की. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातले लोक ही घरे कशी घेणार? मध्यवर्ती भागाचे सोडा, पुण्याच्या अनेक भागांत घरांचे दर ५००० रू. प्रति स्क्वे.फू. इथपर्यंत सहज पोचलेले आहेत, तिथेही अशा लहान घरांची किंमत २० लाखापेक्षा कमी असणार नाही. पुण्याबाहेरच्या खेड्यांमधे १२ लाखात याहून प्रशस्त घरे मिळत असताना इथे ही घरे कोण घेईल? जनसामान्यांसाठी घरांच्या किमती आटोक्यात ठेवण्याचे हे मार्ग नव्हेत. सध्या एक गुंतवणूक म्हणून घरे घेण्याची प्रवृत्ती पुणेकरांमधे वाढत आहे, त्यामुळे एकाच व्यक्तीच्या दोन/तीन सदनिका असे दृश्य आजकाल सर्रास पहायला मिळते. याला सरकारने प्रतिबंध करायला हवा. घरे ही जीवनावश्यक वस्तू माणून त्याची कृत्रिम टंचाई सरकारने थांबवायला हवी. त्याखेरीज पुण्यात जागांना नि पर्यायाने घरे बांधण्याला मर्यादा आहेत हेही सरकारने समजून घ्यायला हवे. त्यासाठी पुण्याच्या उपनगरांमधून, आजूबाजूच्या शहरांमधून वेगाने पुण्यात येता येईल अशी वाहतुकीची साधने सरकारने उपलब्ध करून द्यायला हवीत. जर सासवडमधून किंवा राजगूरुनगरमधून अर्ध्या तासात मेट्रोने पुण्यात येता येत असेल, तर पुण्यात राहील कोण? (निदान मी तरी नाही!) वस्तुस्थिती अशी की या दिवसेंदिवस उग्र होत जाणा-या समस्येकडे गंभीरपणे पाहण्याची सरकारची तयारी नाही. त्यामुळेच असे हास्यास्पद उपाय करणे नि काही दिवसांनी ते काम करीत नाहीत हे दिसल्यावर कोलांटी उडी घेणे हे सरकारचे नेहमीचे धोरण होऊन बसले आहे!

Sunday, August 29, 2010

अखेर नव्या घरात!

अखेर आम्ही आमचे स्वत:चे घर सोडले आणि भाड्याच्या घरात रहायला आलो. ’भाड्याच्या घराचा शोध’ हा खरोखरच एक भयंकर अनुभव होता; इतका भयंकर की तो आयुष्यात पुन्हा कधीही घ्यायला लागू नये अशीच माझी ईच्छा आहे!

आमचे घर विकले गेल्यावर ते लगेच खाली करून द्यावे असा धोशा घेणा-यांनी लावला नि आम्हाला भाड्याचे घर शोधणे क्रमप्राप्त झाले. पण आम्ही घराचा शोध सुरू केला नि हे काम वाटते तितके सोपे नाही ही जाणीव आम्हाला झाली. ’अरे हाय काय अन नाय काय? कुठलेतरी घर बघायचे, मालकाच्या डोक्यावर पैसे नेऊन आदळायचे आणि घर ताब्यात घ्यायचे!’ असा माझा घर भाड्याने घेण्याबाबत सर्वसाधारण समज होता, तो पूर्णपणे खोटा ठरला. भाड्याचे घर शोधण्यात तीन आठवडे घालवल्यावर हे जगातले सगळ्यात अवघड नि कटकटीचे काम आहे असे माझे मत झाले आहे. मी तर असे म्हणेन की एकवेळ मनाजोगती बायको मिळणे सोपे पण मनाजोगते भाड्याचे घर मिळणे अतिकठीण!

आजकाल लग्नाच्या बाजारात मुलींच्या (नि मुलांच्याही) आपल्याविषयी जशा अवास्तव कल्पना असतात नि समोरच्याकडून जशा अवाजवी अपेक्षा असतात, थोडीफार तशीच परिस्थिती आजकाल पुण्यातील घरमालकांची झाली आहे. आपली दोन बेडरूम्सची सदनिका ही सदनिका नसून राजवाडा आहे नि ती पुणे सातारा रोडवर नव्हे तर डेक्कन जिमखाना येथे आहे असाच आम्ही भेटलेल्या बहुतांश घरमालकांचा समज झालेला दिसला. त्यांनी सांगितलेले भाड्याचे नि पागडीचे भाव ऐकून तर आम्ही अक्षरश: हबकून गेलो. त्या पैशात पुण्यात पंधरा वर्षांपुर्वी चक्क एक घर खरेदी करता आले असते! एक दोन उदाहरणे - आमच्या घराजवळच असलेल्या सोसायटीतल्या एका फ्लॅटची कथा. ही ईमारत सुमारे वीस वर्षे जुनी. इथे पार्किंग नावापुरतेच, तेही फक्त आठ फुट उंच! खाली अस्वच्छता आणि गाड्यांची भरपूर गर्दी. आम्ही वेळ ठरवून फ्लॅट पहायला गेलो, तर काकू जिन्यातच दाराच्या कुलुपाशी खटपट करत होत्या. नंतर आमच्याकडे पाहून गोड हसत म्हटल्या, "अहो फ्लॅटची किल्ली म्हणून दुसरीच किल्ली आणली मी, थांबा किल्ली घेऊन आलेच मी दोन मिनिटात." दोन मिनिटांचा वायदा करून गेलेल्या काकू परतल्या दहा ते पंधरा मिनिटांनी. तोपर्यंत आम्ही असेच जिन्यात उभे. बरे हा जिना इतका अरूंद, की कुणी आले की आम्हाला पुढेमागे झुलत त्यांना वाट करून द्यावी लागत होती. एकूनच सोसायटीचा रागरंग पाहून मी तिथून निघण्याचा विचार करत होतो पण आमचे संस्कार आड आले आणि आम्ही काकुंची वाट पाहत तसेच थांबलो. पण सदनिका पाहून आमचा अपेक्षाभंग झाला नाही हे मात्र खरे; अगदी आम्ही कल्पना केली होती तशीच होती ती. फारसा प्रकाश नसलेल्या खोल्या, भडक रंग, अगदी साधी फरशी. धक्कादायक गोष्ट म्हणजे सदनिकेतले तोंड धुण्याचे बेसिन फुटलेले होते आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्याआधी ते दुरुस्त करण्याचे साधे सौजन्यही मालकांनी दाखवले नव्हते. दुसरे उदाहरण असेच. बावीस वर्षे जुनी इमारत नि चौथा मजला. लिफ्ट होती पण वीज गेल्यावर काही पर्यायी व्यवस्था नसल्याने ती गेल्यावर हिमालय चढणे आले. इथे एकच संडास/बाथरूम होती नि तरीही मालकांची भाड्याची अपेक्षा दहा हजार होती. वर ’इथे मुले रहात होती. फ्लॅट अजून साफ केलेला नाहीये, पण पाह्यचा तर पाहून घ्या.’ अशी प्रेमळ सूचना! तिसरे उदाहरण एका बंगल्याचे. बालाजीनगर इथल्या बंगल्यांच्या सोसायटीतला हा बंगला. जाहिरात पाहून आम्ही तो बघायला गेल्यावर "तुमचे बजेट काय आहे?" असा पहिलाच प्रश्न मालकीणबाईंनी विचारला. आमचे बजेट दहापर्यंत आहे सांगितल्यावर "एवढ्या बजेटमधे तुम्हाला ’बंगलो सोसायटी’त कुठेच घर मिळणार नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दहापर्यंत एक बेडरूम बंद करून एक बीएचके देऊ शकेन." असे औदार्य मालकीणबाईंनी दाखवले. आम्ही मनातून खट्टू झालो पण आता आलोच आहोत तर घर पाहून घेऊ असे वाटल्याने आम्ही त्यांच्याबरोबर बंगला पहायला निघालो. तेवढ्यातल्या तेवढ्यात मालकीण बाईंनी मला सगळे प्रश्न विचारून घेतले. ’तू काय करतोस, तुझा भाऊ काय करतो, तुझी आई/बाबा काय करतात, तुम्ही पुण्यात किती वर्षे आहात’ अशी प्रश्नांची फेरीच त्यांनी माझ्यावर झाडली. आम्ही पुण्यात पंधरा वर्षे आहोत हे कळाल्यावर ’काय? नि अजून तुमचे पुण्यात घर नाही?’ हा पुढचा प्रश्नही त्यांच्याकडे तयार होता. शेवटी तर त्यांनी ’तुझे शिक्षण कुठे झाले?’ हेही विचारले. आत्तापर्यंत मला हा प्रश्न मुली बघायला गेल्यावरही कुणी विचारला नव्हता. एवढे प्रश्न विचारल्यावर त्या नक्कीच मला कुणीतरी मुलगी सुचवतील अशी भीती मला वाटत होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. तर आता बंगल्याविषयी - हा बंगला ’प्रशस्त’ म्हणजे जरा जास्तच प्रशस्त होता. खोल्या एवढ्या मोठ्या की त्यांमधे क्रिकेट खेळता आले असते. आमच्याकडे सामान जरा जास्त पण ह्या खोल्यांमधे ते कुठल्याकुठे गडप झाले असते. बांधकामाचा दर्जाही एकूण सामान्यच होता. अशा या चार खोल्यांच्या घरासाठी या मालकीणबाईंनी पंधरा हजार हवे होते! ’बाई, साडेदहाहजारात आम्हाला तुमच्यापेक्षा अर्धा किलोमीटर जवळ असलेल्या चकाचक नव्या सोसायटीत दोन बीएचके फ्लॅट मिळतो, पंधरा हजार घालवून तुमचे हे घर घेण्यासाठी तुम्ही आम्हाला एकतरी सबळ कारण सांगू शकता का?’ हा एकच प्रश्न विचारून काकूंना निरूत्तर करावे असे मला वाटले, पण पुन्हा एकदा आमचे (सु)संस्कार आड आले!

घर शोधताना प्रचंड त्रासदायक ठरणारी दुसरी गोष्ट म्हणजे एजंट लोक. एजंट बनण्यासाठी भ्रमणध्वनी असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे असा समज झाल्यामुळे आजकाल कुणीही उठसूट एजंट बनू लागला आहे. शेतीबरोबर पुर्वी लोक कोंबड्या पाळणे/गाई पाळणे/शेळ्या पाळणे असा जोडधंदा करीत, आजकाल लोक इतर धंद्याबरोबर एजंटगिरी हा जोडधंदा करू लागले आहेत. हे एजंट नि त्यांच्या अजब गजब कहाण्यांवर एक वेगळा लेख(की पुस्तक?) लिहिता येईल! समाधानाची बाब एवढीच की पुणे सातारा रस्त्याचा परिसर पुण्याच्या ’उच्चभ्रू’ भागात येत असल्याने एजंट लोक अजूनतरी एकाच भाड्यामधे समाधान मानत आहेत!

असो, पण भाड्याचे घर शोधण्याच्या या अनुभवामधून बाहेर आलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भाड्याने घर घेऊन राहणा-या लोकांच्या दु:खाची मला झालेली जाणीव. भाड्याच्या घरात राहणा-यांच्या वेदना मी आता जाणतो, दर अकरा महिन्यांनी या फे-यातून जाणा-या लोकांविषयी मला आता सहानुभुती वाटते. घरमालक, एजंट यांच्या कात्रीत सापडलेल्या या लोकांचे दु:ख मी आता समजू शकतो. चला, भाड्याच्या घराचा अनुभव भयानक असला तरी त्यामुळे ही एक सकारात्मक गोष्ट घडली, हे चांगलेच नाही का?

Wednesday, August 18, 2010

नारायण सुर्वे - गरीबांचा, शोषितांचा आणि उपेक्षितांचा कवी अखेर कालवश!

अखेर नारायण सुर्वे गेले! गेले अनेक दिवस त्यांची तब्येत ठीक नव्हती; ती ढासळायला सुरुवात झाली सुमारे दोन वर्षांपुर्वी. पण त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी केलेली प्रार्थना देवाने ऐकली नि आपल्या चाहत्यांबरोबर अजून काही वेळ घालवण्याची सवलत त्यांना दिली. यावेळी मात्र तो कठोर झाला नि त्याने नारायण सुर्व्यांना थेट आपल्याकडे बोलवून घेतले!

या जगात अनेक कल्पनातीत गोष्टी घडतात, सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असते असे म्हणतात ते ह्यामुळेच. नारायण सुर्वेंचा जीवनप्रवासही असाच आहे. कचराकुंडीमधे सोडलेल्या एका मुलाला एक गिरणीकामगार उचलतो काय, त्याला मोठा करतो काय नि हा मुलगा पुढे आपल्यासारख्याच दुर्दैवी जीवांच्या जीवनकहाण्या जगासमोर मांडणारा एक मोठा कवी बनतो काय, हा एक चमत्कारच नव्हे तर काय!

१९२६ किंवा १९२७ साली एकेदिवशी एका आईने आपल्या बाळाला चिंचपोकळीत एका कापडगिरणीसमोर सोडले नि रस्त्यावरचा हा पोरका जीव गंगाराम सुर्वे या गिरणीकामगाराने उचलून घरात आणला. जे देणे शक्य होते ते सारे काही सुर्वे दांपत्याने या मुलाला दिले; घर, शिक्षण, आईबापाचे प्रेम आणि आपले नावदेखील! पण १९३६ साली गंगाराम सुर्वे निवृत्त झाले नि कोकणात आपल्या गावी निघून गेले; नारायणाला क्रूर मुंबईच्या तावडीत सोडून. मग नारायण कुणा कुटुंबात घरगडी, कुठल्या हॉटेलात कपबश्या विसळणारा, कधी दूध टाकणारा पो-या तर कधी कुठल्या कारखान्यात कामगार अशी लहानसहान कामे करत राहिला. अखेर ज्या शहरात कपबशा विसळल्या त्याच शहरात शिक्षक बनण्याचा पराक्रम नारायणाने केला आणि १९६१ साली तो महापालिकेच्या नायगाव क्र. एकच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला! अर्थात् या सा-या प्रवासात नारायणाने कविता करणे कधीच सोडले नाही, ती त्याला शेवटपर्यंत साथ देत राहिली, श्वासासारखी!

कुठल्याही भाषेत साहित्य लिहिणा-यांमधे दोन गट असतात. अवतीभोवतीची संपन्नता, विपुलता, आनंद पाहून स्वत: संतोष पावणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा एक गट तर आपल्या आजूबाजूची विषमता, दारिद्र्य, दु:ख पाहून अस्वस्थ होणा-यांचा नि त्याचे चित्रण करणा-यांचा दुसरा गट. अर्थात् यातील दुस-या गटाच्या लोकांमुळेच जागतिक साहित्य संपन्न होत असते हे कोण नाकारू शकणार आहे? नारायण सुर्वे हे असेच एक कवी होते. ’कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे’ असा सारस्वतांना इशारा देत त्यांनी आपली कविता सुरु केली. ह्या कवितेत होता ना कसला आव, ना कसला इशारा ना कसली द्वेषभावना, तिच्यात होती फक्त वेदना. वेदना ’भाकरीचा चंद्र शोधण्यात आख्खी जिंदगी बरबाद झाल्याची’. ’मास्तर, तुमचंच नाव लिवा...’ यासारख्या कवितेत कुण्या आईची तर ’मनिऑर्डर’ सारख्या कवितेत कुणा वेश्येची. पण अशी वेदना मनात असूनही सुर्व्यांचे मन करपले नाही. कुणाविषयीही राग किंवा अढी त्यांच्या मनात कधीच राहिली नाही. एवढे सोसूनही सुर्व्यांचे मनातले पाणी निखळ राहिले ते गढूळले नाही, हे विशेषच नाही का?

आयुष्याच्या पुर्वार्धात नारायण सुर्व्यांवर केलेल्या अन्यायाची सव्याज परतफेड नियतीने नंतर केली. महाराष्ट्र, भारत सरकारचे अनेक पुरस्कार, १९९५ सालच्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ११९८ साली पद्मश्री असे अनेक गौरव सुर्व्यांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात अनुभवायला मिळाले. अर्थात् एवढे सारे होऊनही सुर्वे अगदी साधेच राहिले, अगदी त्यांच्या कवितांसारखे. आयुष्याच्या अखेरची काही वर्षे त्यांनी मुंबई सोडून जवळच्याच नेरळ गावी काढली. मुंबईने दिलेल्या चटक्यांमुळे आपली शेवटची वर्षे कुठेतरी निवांत जागी घालवावीत असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला असेल काय?

ज्या कष्टक-यांची दु:खे नारायण सुर्व्यांनी सा-या जगापुढे कवितारुपाने मांडली त्या सा-या शोषितांच्या मनात आज ह्याच ओळी असतील -

सुर्वेसाहेब,
तुम्ही कवितेऐवजी रद्दी विकली असती तर काय झाले असते,
निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते.
असे झाले नाही; तुम्ही शब्दांतच इतके नादावला, बहकला,
असे झाले नसते तर कदाचित इमलेही बांधले असते.

पण तुम्ही नसता तर हे सूर्यचंद्र, तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते
आमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते
जन्ममरणाच्या प्रवासात तुम्हाशिवाय सोबतीस कोण असते
चला बरे झाले; तुम्हाला कवितेतच खराब व्हायचे होते!

Thursday, August 12, 2010

घरं आणि आठवणी !

ह्या घरातले आमचे शेवटचे काहीच दिवस उरलेत, पण अजून तरी आठवणी दाटून येऊन उगाचच वाईट वाटणं असं काही घडलेलं नाहीये. जसजशी घर सोडायची तारीख जवळ येईल तसतसे दु:खाचे कढ दाटून येतील किंवा मन भरून येईल असं वाटलं होतं खरं, पण प्रत्यक्षात तसं घडण्याची काही एक चिन्हे दिसत नाहीयेत. किंबहुना मनाला असं काही वाटत नसल्यामुळेच थोडंसं विचित्र वाटतंय हे मात्र नक्की.

खूप घरं बदलली आम्ही. आई नि पप्पांचं लग्न झालं आणि त्यांनी सासवडला काटकर चाळीत संसाराला सुरूवात केली. त्या एका खोलीत आई, पप्पा, काका नि आत्या असे चार जण रहात. त्या एका खोलीच्या भयाणकथा आईने आम्हाला अनेकदा ऐकवल्या आहेत नि दर वेळी तिच्या सासरच्या लोकांचा उद्धार करायची संधी साधून घेतली आहे. तिथून आम्ही म्हस्के ह्या प्रेमळ घरमालकांच्या वाड्यात रहायला गेलो. मी तेव्हा खूपच लहान होतो, त्यामुळे तिथले दिवस मला काही आठवत नाहीत. नंतर एक दोन वर्षांतच म्हाडाची नविन घरयोजना हडको सुरू झाली नि मग आम्ही हडकोत रहायला गेलो. ’पप्पा रंगीत टीव्ही घ्यायला निघाले होते, पण मी त्यांना थांबवलं नि घडकोत पैसे गुंतवायला सांगितले’ असं आई नेहमी आम्हाला सांगायची. आम्ही घडकोत रहायला गेलो तरी म्हस्के वाड्यात नेहमी जायचो हे मात्र आजही आठवतं. म्हस्के परिवार होताच तसा. राजबिंडे म्हस्के काका, मराठा असूनही ब्राह्मणी वळणाने बोलणा-या देखण्या नि अतिप्रेमळ म्हस्के बाई, त्यांच्या दोन मुली नि माझ्यापेक्षा मोठा एक मुलगा मनू. त्यांचा तो मोठ्ठा वाडा नि त्यातलं ते चिंचेचं झाड मला अजून आठवतं. सासवड आम्ही कधीच सोडलं असलं आणि सासवडचं ते घरही दोन वर्षांपुर्वीच विकलं असलं तरी म्हस्के आज्जीआजोबांकडे आम्ही अजूनही जातो. आत्ता काही महिन्यांपुर्वीच जाऊन आलो त्यांच्याकडे, अजूनही तस्सेच आहेत दोघे. प्रेमळ नि माया लावणारे. जेवूनच जा असं नुस्तं म्हणून न थांबता जेवूनच पाठवणारे. मंजूला (माझी आत्या) का नाही घेऊन आलात असं विचारणारे.

हडकोत आम्ही ७/८ वर्षे होतो. पहिली ते सहावी अशी सहा नि त्याआधीची एक/दोन वर्षे मी तिथे काढली असावीत. हडकोचं हे घर माझं आवडतं कारण ते जमिनीवर, बैठं होतं. आमच्या अगदी घरासमोर नव्हे पण जरा उजव्या बाजूला एक आंब्याचं मोठ्ठं झाड होतं. माझ्या मित्राच्या घरामागे किंवा आमच्या घराजवळच्याच पटांगणात आम्ही क्रिकेट खेळत असू. घराजवळच्या पटांगणाचा उपयोग पतंग उडवण्यासाठीही होत असे. भोंडल्याच्या दिवसात घरासमोरच्या जागेतच भोंडला खेळला जाई आणि कोजागिरीचा नैवेद्य चंद्राला इथेच मिळे.

नंतर पप्पांची बदली झाली नि आम्ही राजगुरूनगरला आलो. इथल्या माझ्या आठवणी काही खूप सुखद नाहीत. आम्ही पहिल्यांदा जिथे राहिलो तो एक बंगला होता. मालक पुढच्या दोन खोल्यांत नि आम्ही मागच्या दोन खोल्यांत रहात होतो. संडास सामाईक. आमच्या खोल्या संपल्याकी लगेचच एक मोठ्ठं शेत होतं. ह्याच्यापलीकडच्या शेतात आमचा क्रिकेटचा डाव रंगे. आमच्या घराशेजारचा मोकळा प्लॉट मी नि शेजारच्या एका आजोबांनी मोकळा केला होता नि तिथे काही दिवस आम्ही बॅडमिंटन खेळत होतो असं मला अंधुकसं आठवतं. घरात रहायला आल्यावर काही दिवसांतच आमच्याकडच्या लहानसहान वस्तू(कपड्याचे साबण/गोडेतेल ई.) अचानक कमी व्हायला लागल्या नि लवकरच हे आमच्या घरमालकांचेच प्रताप आहेत हे आमच्या लक्षात आले. आम्ही आमच्या घराची किल्ली त्यांच्याकडे ठेवून त्यांच्यावर जो विश्वास ठेवत होतो त्याचा ते गैरफायदा घेत होते. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे किल्ली ठेवणं बंद केलं तेव्हा ’का हो?’ असं घरमालकीणबाईंनी खोदून खोदून विचारलेलं मला स्पष्ट आठवतं. ह्या लोकांकडे एक कुत्राही होता, राजा नावाचा. त्याला जिन्याच्या पॅसेजात मोकळे सोडले जाई, त्यामुळे गच्चीवर गेले की राजासाहेबांच्या शौचरांगोळीतूनच मार्ग काढावा लागे. हळूहळू राजाची तब्येत ढासळत गेली नि एक दिवस बिचा-याचा कार्यभाग आटोपला. मग घरमालकांनी नि त्यांच्या मुलाने त्याला मागे शेतात पुरले. घरमालकांना एक मुलगा नि दोन मुली अशी तीन अपत्ये होती. त्यापैकी धाकटी तायडी गोड गोड बोलून नेहमी मला त्यांचे सामान आणण्यासाठी पिटाळे (आमचे घर लुटण्यासाठी?) हेही मला अगदी स्पष्ट आठवते.

ह्या सा-या कटकटींना कंटाळून आम्ही हा बंगला सोडला नि तिन्हेवाडी रस्त्यावरच्या एका चाळीत राहायला गेलो. पण इथे आमची ’आगीतून फुफाट्यात’ अशी अवस्था झाली. बंगल्यात संडास सामाईक होता पण तो आमच्यात नि घरमालकांत. इथे ह्या चाळीत १२ की १४ घरांना फक्त तीन संडास होते. स्वत: मालक नि एक ’अतिमहत्वाचे’ भाडेकरू ह्या दोघांना मात्र घरातच संडास होते. अजून एक गोष्ट म्हणजे वर घरात बाथरूम नव्हे तर चक्क मोरी होती. इथे पाणी नियमितपणे येत नसे, त्यामुळे ते आले की घरातल्या झाडून सगळ्या पात्रांमधे साठवून ठेवावे लागे. चाळीत आमचे घर वरच्या मजल्यावर अगदी कडेला असल्याने घरात येताना सगळ्यांच्या घरातली मनोहारी दृश्ये इच्छा नसतानाही पहावी लागत. कहर म्हणजे आम्ही पोरे या लहानशा जागेतही प्लास्टिकच्या बॉलने चक्क क्रिकेट खेळत असू. ह्या घरमालकांचा मुलगा महेश नि त्याचा मेंगळट चेहरा मला आजही अगदी स्पष्ट आठवतो.

खेडमधे सातवी नि आठवी अशी दोन वर्षे काढल्यावर आम्ही माझ्या नववीत पुण्याला आलो. पुण्यातला आमचा फ्लॅट पूर्ण झाला नसला तरी नववीत मला नूमवित प्रवेश घेतल्याने आम्हाला पुण्यात यावेच लागले. इथे आम्ही बिबवेवाडीत महेश सोसायटीत अगदी आतल्या बाजूला एक घर भाड्याने घेतले होते. इथेही खेडचीच पुनरावृत्ती झालेली, म्हणजे मालक खाली नि आम्ही वर. दोन लहानश्या खोल्यांमधे आम्ही कसे रहात असू असा विचार आत्ता केला की डोके भंजाळते. काही घरमालकांची जात मराठा किंवा ब्राह्मण नसते तर ते फक्त ’खडूस घरमालक’ या जातीचे असतात, आमचे घरमालक असेच होते. एकदा मला इस्त्री करत असताना पाहिल्यावर ’तुम्ही तर म्हटला होतात घरी इस्त्री करणार नाही म्हणून...’ असे त्यांनी माझ्या आईला विचारले. त्यावर माझ्या आईनेही ’तो इस्त्री करत नाहीये, फक्त कशी करायची ते शिकतोय’ असे खमके उत्तर दिले. (आमचे वीजेचे मीटर वेगळे नसल्याने आम्ही वीज काटकसरीने वापरावी असा आम्हाला घरमालकांचा प्रेमळ आग्रह होता.) या घरात आमच्या समोरच एक छोटे कुटुंब भाड्याने रहात होते, त्यांचा मुलगा भारीच गोड होता. या काकू नेहमी आमच्याकडे येत नि तासनतास गप्पा मारत, कधीकधी आईही त्यांच्याकडे जाई. या घरमालकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या त्यांना चक्क दोन बायका होत्या!

पण सुदैवाने काही महिन्यांतच आमचा फ्लॅट पूर्ण झाला नि आम्ही ९५ साली तिथे रहायला गेलो. हे घर मला आवडले, तिथे खाली आजूबाजूला बरीचशी मोकळी जागा होती नि झाडेही. इथली गुलमोहोराची झाडे उन्हाळ्यात फुलत नि त्या गरम दिवसात डोळ्यांना अंमळ गारवा देत. क्रिकेट खेळायची आमची इथली जागा म्हणजे आमच्या इमारतीखालचे पार्किंग. पार्किंगमधे क्रिकेट खेळणे नि तिथेच असलेल्या नळावर ढसाढसा पाणी पिणे हा आमचा उन्ह्याळ्याच्या सुट्टीतला नि दर रविवारचा नियमित कार्यक्रम होता. हे घर रस्त्यापासून अगदी जवळ आणि तरीही अगदी शांत होते. असे असले तरी हा प्लॅट होता अगदी छोटा. एक बेडरूमचा. नि शिवाय त्याची रचनाही विचित्र होती. म्हणजे आगगाडीच्या डब्यासारख्या एका पाठोपाठ एक खोल्या. म्हणजे पहिला दिवाणखाना, नंतर स्वयंपाकघर. मग डाव्या बाजूला बाथरूम नि उजव्या बाजूला स्वच्छतागृह. त्यानंतर बेडरूम. हळूहळू हा फ्लॅट आम्हाला लहान पडायला लागला नि पुन्हा आमचा नविन घराचा शोध सुरू झाला.

हा शोध संपला पुणे सातारा रस्त्यालगतच्या आमच्या सध्याच्या प्लॅटमधे. इथे आम्ही २००४ साली रहायला आलो आणि गेली सहा वर्षे आहोत. अर्थात इथेही अडचणी होत्याच. हा फ्लॅट २ बेडरूमचा असला तरी आकाराने लहान. शिवाय इथे सोसायटी वगेरे प्रकार नसल्याने अनंत अडचणी. आम्ही आल्यावर एक का दोन वर्षांनी आमच्या सोसायटीतला ट्रान्सफॉर्मर उडाला आणि आम्ही जवळजवळ एक आठवडा अंधारात काढला. कारण सोसायटी नव्हतीच आणि बिल्डरला इमारत पूर्ण झाल्यावर तिची पर्वा कशाला? इथे सुरक्षाव्यवस्था काही नाही, तेव्हा आओ जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती. शिवाय पार्किंगची जागा लहान असल्याने गाड्या उभ्या करायला अडचण. त्यात सोसायटी साफ करायची काही व्यवस्था नसल्याने सगळीकडेअ कच-याचेच साम्राज्य. शिवाय हा फ्लॅट रस्त्याला लागूनच असल्याने आम्हाला वाहनांच्या/मिरवणुकांच्या आवाजाचा प्रचंड त्रास सहन करावा लागे. सात वाजले की खालच्या हॉटेलांमधे बनणा-या अनेक खाद्यपदार्थांचा एक संमिश्र नकोसा वाट घरात घमघमे. शेवटी आम्ही वैतागलो नि हा फ्लॅटही सोडायचा निर्णय घेतला. पण का कोण जाणे, आता पुन्हा फ्लॅटमधे रहायला जायची आमची इच्छा नव्हती. आता बंगल्यातच रहायला जावे असे आम्ही ठरवले नि जागेचा शोध सुरू झाला. फ्लॅट शोधणे सोपे पण जागा शोधणे अती अवघड. अनेक जागा पाहिल्यावर त्यातल्या एखाददुसरी जागा आम्हाला आवडे. जर जागा आवडली तर ती परवडणारी नसे. आणि ती परवडणारी असली तर ती कटकटीची असे. जवळजवळ दोन वर्षे आम्ही जागा शोधत होतो, पण आम्हाला पसंत पडेल अशी जागा काही सापडेना. शेवटीशेवटी तर एखादा फ्लॅटच विकत घ्यावा असे वाटू लागले. पण नशिबाने साथ दिली नि अखेरीस आम्हाला मनोजागती जागा आमच्या सध्याच्या फ्लॅटपासून अगदी थोड्याच अंतरावर मिळाली. आता काही दिवसातच नविन घराच्या बांधकामाला सुरूवात होईलही!

अर्थात एवढे सगळे होऊनही आमचा घराचा शोध चालूच आहे! बंगला बांधून होईपर्यंत काही महिने तरी आम्हाला भाड्याच्या घरात काढायचे आहेत, तुमच्या माहितीत आहे एखादे रिकामे घर?

ता.क. माझ्या जालनिशीवरची जुन्या घरातली ही शेवटची नोंद ठरेल काय?