Wednesday, March 30, 2011

प्रिय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब!

मोहाली येथे ३० मार्च रोजी होणारा भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ गिलानी यांना आमंत्रित करण्याचा आपल्या सरकारचा निर्णय खरोखरच धक्कादायक नि प्रचंड संताप आणणारा आहे. भारत हा सामना हारला तर जेवढा संताप होईल त्यापेक्षा दहा पट संताप आपल्या या निर्णयामुळे आत्ता आम्हाला होत आहे असे म्हटले तर त्यात काडीचीही अतिशयोक्ती होणार नाही!

मनमोहन सिंग, आम्ही कोणी मोठे राजकारणतज्ञ नाही, पण या दरिद्री प्रस्तावामागचे कारण आपण आम्हाला सांगू शकाल काय? पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे, ते वाकडे ते वाकडेच राहणार हे आम्ही का आपल्याला सांगायला हवे? हे शेपूट कापणे हाच त्याचा त्रास संपवण्याचा एकमेव उपाय आहे, ते सरळ करण्यात वेळ घालवणे शुद्ध वेडेपणा होय. पाकिस्तानतल्या नद्यांमधे आणि तेथील प्रत्येक माणसाच्या रक्तामधे भारतद्वेष वाहतो आहे, हे आपल्याला माहीत नाही का? या देशाच्या अतिरेक्यांनी भारतात येऊन शेकडो निरपराध भारतीयांची (नि काही परदेशी पाहुण्यांची) कत्तल केलेल्यास अजून पुरती तीन वर्षेही झाली नाहीत हे आपण विसरलात काय? छत्रपती शिवाजी टर्निमस येथील रक्ताचे डाग अजूनही ओले आहेत, लिओपोल्ड कॅफेमधील काचांना बंदुकीच्या गोळ्यांनी गेलेले तडे अजून तसेच आहेत आणि गोळीबारात अडकलेल्या अनेकांच्या कानांना बंदुकींच्या दणदणाटाने गेलेले दडे अजूनही मोकळे झालेले नाहीत; हे सगळे असे असताना आपण हा लाजिरवाणा निर्णय कसा घेऊ शकता?

आणि आम्ही म्हणतो, एवढेच जर करायचे आहे तर मग त्या अजमल कसाबने काय घोडे मारले आहे? त्यालाही सामना पाहण्यास बोलवा आणि तुमच्या नि गिलानी साहेबांच्यामधे बसवा. त्याहून उत्तम गोष्ट म्हणजे सामन्यानंतर त्याला गिलानी साहेबांबरोबर (सुटाबुटाचा आहेर करूनच) घरी पाठवून द्या. असे झाल्यावर तर काय, पाकिस्तान २६/११ घडलेच नाही असेही कमी करणार नाही!

मनमोहनसिंग साहेब, आम्ही आपल्याला एक सज्जन गृहस्थ समजत होतो, पण आपले सहकारी करत असलेले घोटाळ्यांचे नवनवे विक्रम (नि आपली त्यांना मूकसंमती) पहाता आमचे ते म्हणणे चुकीचे होते असेच आता म्हणावे लागते आहे. कौरवांची सगळी दु:साहसे निमूटपणे पाहणा-या नि आतून त्यांना प्रोत्साहन देणा-या धृतराष्ट्रासारखे आपले हे वागणे आहे. नुकताच आपण घेतलेला हा निर्णय तर या सगळ्यावर कडी करणारा आहे. सामना सुरू होण्यास अजूनही एक तास आहे, आपण करोडो भारतीयांना क्लेश देणारा हा निर्णय बदलावा आणि पाकिस्तानाच्या अतिरेकी कारवायांमधे वेळोवेळी बळी पडलेल्या हजारो भारतीयांची विटंबना थांबवावी अशी मी आपल्याला विनंती करतो.

ईश्वर आपल्यास सुबुद्धी देवो!

आपला नम्र,
तिरशिंगराव टिकोजीराव पुणेकर

Friday, March 25, 2011

गाणी, गाणी, गाणी!

मला वाटतं प्रत्येक माणसाचा असतो तसा प्रत्येक गाण्याचाही एक स्वभाव असतो. काही लोक सतत दुर्मुखलेले, तर काहींमधे उत्साह ठासून भरलेला. काही हसरे तर काही उदास. काही खूप वर्षे एकत्र घालवूनही लांब लांब भासणारे तर काही क्षणात काळजाला चटका लावून जाणारे. गाणीही अशीच असतात. काही मन प्रसन्न करणारी तर काही उदास. काही नाचरी तर काही गंभीर. काही वात्रट तर काही या दुनियेतली अंतिम सत्यं सांगणारी.

आता 'गुनगुना रहें हैं भँवरें, खिल रही है कलीं कलीं' हे आराधना चित्रपटातलं गाणं घ्या. हे गाणं कानावर पडलं की मन कसं आनंदानं भरून जातं. भर उन्हाळ्यात अचानक एक कारंजं सुरू व्हावं आणि थंड पाण्याचे आल्हाददायक तुषार अंगावर यावेत असं काहीसं वाटतं हे गाणं ऐकलं की. आराधनामधलंच 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' हे गाणंही तसंच. शंभर वर्षांच्या चिरनिद्रेतून जागा झालो तरी हे गाणं मी सुरुवातीच्या तुकड्यावरूनही सहज ओळखीन. शर्मिलीमधलं 'ओ मेरी शर्मिली', जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें' ही गाणी याच पठडीतली. दिवसभर कामं करून थकून आलात की ही गाणी ऐकावीत, थकवा पळालाच म्हणून समजा. संगीत ऐकवलं की पीकं जोमानं वाढतात आणि गाई जास्त दूध देतात ही वाक्यं ही गाणी ऐकली की मुळीच खोटी वाटत नाहीत.

दुसरीकडे 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर' हे सफर चित्रपटातलं गाणं. कुठलीतरी खोल जखम अचानक उघडी पडावी अन्य त्यातून भळाभळा रक्त वहायला लागावं असं हे गाणं ऐकलं की दरवेळी का वाटावं? 'जिंदगी को बहोत प्यार हमनें किया, मौतसेभी मोहोब्बत निभाएंगे हम' - एक कसलीशी, व्यक्त न करता येणारी वेदना. ह्दयात दुखतं तर आहे पण नेमकं कुठे ते समजू नये असं काहीसं. तीच गत 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाँ' ह्या आप की कसममधल्या गाण्याची. (बाकी ह्या गाण्यात वरचढ काय आहे, म्हणजे शब्द, संगीत की गायकाचं कसब हा एका वेगळ्या लेखाचा मुद्दा होऊ शकतो.) हे गाणं ऐकलं की असं का वाटावं की हा नायक नव्हे तर मीच कुठेतरी चाललो आहे एकटा. माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना मागे टाकून. दूर कुठेतरी, लांब, जिथे फक्त दु:ख आणि दु:खच भरलेलं आहे अशा दिशेने. 'तेरी गलियोमें ना रखेंगे कदम आज के बाद' हे गाणं असंच. ह्या गाण्यातला दर्द ऐकून असं का वाटावं की नायक नायिका नव्हे तर जगणंच सोडून चालला आहे? मराठीतलं 'वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले' हे गाणं याच गटातलं. हे गाणं लागलं की वाटतं एखाद्या उदास संध्याकाळी दूरवर कुणीतरी एखादं वाद्य वाजवत असावं आणि वा-यावर तरंगणारे त्याचे सूर आपल्याला अस्वस्थ करत जावेत.

आता काही वात्रट गाणी. उदाहरणार्थ गोविंदा नि चंकीचं आंखेमधलं 'ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता' - माझं जाम आवडतं गाणं. हे कधीही लागलं तरी मी पूर्ण ऐकतो आणि ते दर वेळी माझ्या मनात स्मितहास्य फुलवतंच. आँटी नंबर वन चित्रपटाचं शीर्षकगीत, हिरो नंबर वन मधलं 'मै तो रस्तेसे जा रहा था', कसौटीमधलं 'हम बोलेगा तो बोलेगे के बोलता हैं', हाफ टिकट मधलं 'आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया' किंवा चल्ती का नाम गाडी मधलं 'बाबू समझो इशारे' ही गाणी अशीच. ती ऐकावी नि गालातल्या गालात हसावं. तेजाबमधलं 'एक दो तीन, चार पाँच छे...' हे असंच एक मारू गाणं. हे लागलं आणि आजूबाजूला कुणी नसलं, की मी थोडीशी का होईना, कंबर हालवून घेतोच.

काही गाणी एकदम बिनधास्त - 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं फिक्र को धुएंमे उडाता चला गया' असं म्हणणारी. काही 'मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा' असं म्हणत आपल्याच मस्तीत जगणारी. काही 'ए मेरे वतनके लोगों, जराँ आँखमें भरलों पानी' असं म्हणत रडवणारी तर काही 'दुनियामे रहनाहोतो काम करो प्यारे, हाथ जोड सबको सलाम करो प्यारे' असं म्हणत जगण्याचं कटू तत्वज्ञान सांगणारी.

तर अशी ही गाणी. वेगवेगळ्या स्वभावांची. वेगवेगळ्या रंगांची. ही नसती तर जगणं अशक्य झालं असतं हे मात्र नक्की.

Thursday, March 17, 2011

माझ्या लाडक्या सख्या हरी...

लारा दत्ताने महेश भूपतिशी लग्न केल्यामुळे तू प्रचंड निराश झालास आणि स्वतःला गेले एक महिना खोलीत बंद करून घेतलेस हे मला आज कुणीसे सांगितले नि मला मोठाच धक्का बसला. लाराने एका घटस्फोटित माणसाशी लग्न करावे या गोष्टीचा तुला सात्विक संताप आला आणि तू हे पाऊल उचललेस असे समजते. सख्या हरी, अरे लाराने महेशशी लग्न केले यात एवढं निराश होण्यासारखं काय आहे? समजा तिने ब्रायन लाराशी लग्न केले असते तर तिचे नाव लारा लारा झाले असते; त्यापेक्षा हे लखपटीने बरे नाही का?

सख्या हरी, तुला माहित नसेल, पण हिरॉईनींनी विवाहित माणसाशी लग्न करण्याची आपल्या चित्रपटसृष्टीतली चाल बरीच जुनी आहे. वैजयंतिमाला, जयाप्रदा, हेमा मालिनी, हेलन, श्रीदेवी, शबाना आझमी, रविना टंडन, करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी, किती नावे सांगू तुला? अरे अफवा तर अशी आहे, 'मेरा पति सिर्फ मेरा है' या चित्रपटावर चित्रपटसृष्टीतल्या झाडून सगळ्या अभिनेत्रींनी बहिष्कार टाकला आणि त्यामुळेच तो चित्रपट आपटला.

अरे मागचे कशाला, आत्ताचीच बातमी ऐक. तुझी आवडती राणी मुखर्जी लवकरच आदित्य चोप्राशी लग्न करते आहे. त्यामुळेच ह्या राणीला एक दिवशी आपली राणी बनवीन अशी दिवास्वप्ने जर तू पहात असशील तर तो विचार सोडून दे; नाहीतर राणीच्या नव्या चित्रपटाप्रमाणे तुझेही पानिपत व्हायला वेळ लागणार नाही. तीच गोष्ट करिनाची. करेना करेना म्हणता म्हणता ती एक दिवस सैफशी लग्न करेल आणि तू असाच हात चोळत बसशील.

सख्या हरी, माझे ऐक. तू मला मागणी घाल. ती लारा जरी गेली असली तरी ही तारा तुझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे. तुझ्या रागाचा पारा चढल्यावर मी तुला माझ्या प्रेमरूपी पंख्याने वारा घालेन आणि तुझ्यावर माझ्या प्रेमाचा मारा करताकरता तुझ्याकडून लग्नाचा प्रेमसारा वसूल करेन. मग, मला मागणी घालायला कधी येतोस?

हो, पण आपलं लग्न झाल्यावर 'आता आपण विवाहीत, आता तर हिरॉईनी आपल्याला सहज पटतील' असं म्हणत जास्त चेकाळून तू त्यांच्यामागे पळणार नाहीस ना?

टीप :
सदर लेख सुप्रसिद्ध मराठी लेखक दत्तू बांदेकर यांच्या 'सख्या हरी' या व्यक्तिविशेषावर आधारलेला आहे. कोण होता हा सख्या हरी? अत्र्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "आपल्या अलौकिक प्रतिभेतून त्यांनी [दत्तू बांदेकरांनी] 'सख्या हरी' नावाचा एक अजब नमुना निर्माण केला. चाळीत राहणारा, मळकट कपडे अंगात राहणारा, नळावर बायकांशी चावटपणा करणारा, चौपाटीवर भेळ खाऊन शीळ फुंकणारा आणि मुंबईच्या सा-या गमतींचा वात्रटपणाने नि मिस्किलपण आस्वाद घेणारा दत्तू बांदेकरांचा 'सख्या हरी' म्हणजे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदाचा एक अविस्मरणीय नमुना होय. त्यांच्या ह्या 'सख्या हरी'ने एक वेळ बहुजनसमाजाला वेड लावले होते." दत्तू बांदेकरांविषयी अधिक माहिती आणि सख्या हरीचा आणखी एक नमुना मी पुर्वी लिहिलेल्या एका लेखात वाचता येईल. दत्तू बांदेकरांवरचा हा लेखही त्यांची चांगली माहिती करून देणारा आहे.

Tuesday, March 8, 2011

महाराष्ट्रातल्या राजकीय कोलांट्याउड्या

नेहमी एकमेकांना लोळवणा-या नि एकमेकांना धोबीपछाड देणा-या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा आवडता खेळ कुस्ती असला पाहिजे असा माझा कालपर्यंत समज होता; पण राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, मनसे यांनी पुण्यात आणि शिवसेनेने ठाण्यात नुकत्याच मारलेल्या कोलांट्याउड्या पाहून मात्र माझा हा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे!

पुणे महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक नुकतीच झाली. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सगळीकडे हिंडणा-या काँग्रेस नि राष्ट्रवादी काँग्रेस या जोडीत का कोण जाणे, यावेळी मात्र काहीतरी बिनसले आणि भाजपाने राष्ट्रवादीला डोळा मारून मनसेशी चुम्माचाटी करत अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. जे झाले ते तर मजेदार होतेच, पण नंतर यावर राजकीय पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अधिक मनोरंजक होत्या. काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली आणि शिवसेनेने भाजपावर. 'लोकनेते' गोपीनाथ मुंडे यांनी 'ही युती फक्त पुण्यापुरती आहे' असे म्हणून तिचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे ते विधान एखाद्या लफडेबाज नव-याने 'ति'चे नि माझे लफडे फक्त तिच्या घरापुरतेच मर्यादित आहे असे म्हणून स्वतःचे समर्थन करण्याइतकेच हास्यास्पद होते. राष्ट्रवादीचे काय सांगावे? सत्तेसाठी कुणाबरोबरही जाण्यात आम्हाला ना नाही हे त्यांनी पुन्हापुन्हा सिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांच्याबरोबर शरद पवार यांचे झळकलेले फोटो हे याचे एक उत्तम उदाहरण. सत्तेसाठी हा पक्ष उद्या ओसामा बिन लादेन किंवा दाऊद इब्राहीमच्या पक्षाशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही हे नक्की.

मनसेचे वागणे त्यांच्या खंद्या पाठीराख्यांना अस्वस्थ करून गेले हे मात्र खरे. शेवटी काय, बोलायच्या गोष्टी वेगळ्या नि करायच्या वेगळ्या हे कसलेल्या राज्यकर्त्यांचे धोरण राज ठाकरेंनीही अवलंबलेच. आजकाल त्यांचा प्रवास पाहता ते हळूहळू एक मुरब्बी राजकारणी बनत चालले आहेत म्हणावे लागते आहे, पण ते खेदाने. सगळ्यात मोठे हसे झाले ते काँग्रेसचे आणि यात काहीच नवे नाही. आपण एक प्रचंड मोठा इतिहास असलेला एक अतिशय नितिमान पक्ष आहोत असा दिखावा करत हा पक्ष वागतो खरे, पण शेवटी त्याला नेहमीच तोंडावर पडायची वेळ येते; ही वेळही त्याला अपवाद नव्हती.

दुसरी घटना ठाण्याची. तिथे नुकतीच शिवसेनेने मुस्लिम महासंघ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा अबू आझमींकडून मराठी महासंघाची किंवा कलमाडींकडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाची घोषणा होण्याइतकीच धक्कादायक होती. पण बारकाईने पाहिले तर शिवसेनेचा इतिहासच अशा घटनांनी भरलेला दिसतो. शिवसेनेने सुरुवात केली मराठीच्या मुद्दयावर. 'लुंगी हटाव, पुंगी बजाव' असे म्हणत त्यांनी दक्षिण भारतीयांविरुद्द शस्त्रे परजली. नंतर त्यांचा रोख वळला तो उत्तर भारतीयांकडे. त्यापश्चात्, का कोण जाणे त्यांनी मराठीचा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आणि दक्षिणच काय उत्तर भारतीयांनाही आपल्या पक्षात सामील करून घेतले. (आठवा ते संजय निरुपम यांच्या कार्यालयाचे स्वतः बाळासाहेबांनी केलेले उद्घाटन.) पाकिस्तान नि भारतीय मुस्लिमांवर टीका करणे हा त्यावेळी त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. आता हिंदुत्वाचाही मुद्दा त्यांनी सोडला असावा, त्याशिवाय त्यांनी मुस्लिम महासंघाची स्थापना केली नसती. काही दिवसांनी त्यांनी परवेझ मुशर्रफांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली तरी आश्चर्य वाटायला नको.

म्हणजे मुस्लिमांसाठी महासंघ बनवण्यात काही गैर आहे असे नव्हे; भारतीय मुस्लिम आजही सामाजिक/आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि एका पक्षाने (राजकीय स्वार्थ मनात ठेवूनही) त्यांच्यासाठी काही चांगले काम केले तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. माझा आक्षेप आहे शिवसेनेच्या वागण्यावर. परदेशी संस्कृतीला नावे ठेवत असताना मायकल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करणे आणि फक्त वॅलेंटाईन डेची शुभेच्छापत्रे विक्रीस ठेवली म्हणून मराठी दुकानदारांची दुकाने फोडणे ही कामे केली शिवसेनेनेच. काहीही कारण नसताना एखाद्या समूहाला वर्षानुवर्षे शिव्या द्यायच्या नि एके दिवशी अचानक आपली भूमिका गुंडाळून त्यांच्याविषयी काळजीचा आव आणायचा यामुळे आपण हास्यास्पद दिसतो नि विनोदाचा विषय होतो हे शिवसेनेला कधी कळणार? शिवाय आपण असेच वागत राहिलो तर आपल्याला शिवीगाळ करण्यासाठी 'शत्रू'च उरणार नाहीत हे शिवसेनेने समजून घ्यायला हवे. म्हणजे आता शिव्या देणार कोणाला, फक्त मनसेला? त्या ऐकून आम्हाला आधीच कंटाळा आलाय हो!

असो, पण राजकीय पक्ष या कोलांट्याउड्या मारत असताना महाराष्ट्रातली जनता काय करते आहे? ती धुंद झाली आहे क्रिकेट पहाण्यात. देवा, या महाराष्ट्राचे कसे होणार? मला त्याची मोठीच काळजी लागून राहिली आहे रे!