Thursday, May 31, 2012

मुस्लिम आरक्षण आणि विरोधकांची कोल्हेकुई!

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारने मुस्लिमांना इतर मागास वर्गीय कोट्यात दिलेले साडेचार टक्के आरक्षण रद्द केल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय निघाला की काही लोकांची मूळव्याध उपटते तशी ती (न्यायालयाचा निर्णय आरक्षण रद्द करणारा असला तरीही) यावेळीही उपटली आहे आणि मुस्लिमांना आरक्षण म्हणजे सरकारचे मुस्लिमांपुढे सपशेल लोटांगण कसे आहे आणि त्यामुळे या देशाचा सत्यानाश कसा होणार आहे हे त्यांनी मोठमोठ्याने ओरडून सांगायला सुरुवात केली आहे. या सा-यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या देशात हिंदूंना आरक्षण दिले तर तुम्हाला चालते, मग या देशात पिढ्यानपिढ्या राहिलेल्या, या देशावर तेवढेच प्रेम करणा-या, या देशाचा अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिमांना आरक्षण दिले तर बिघडले कुठे?

मुस्लिम समाजाची सरासरी आर्थिक स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाही हे समजण्यास तुम्ही कुणी आर्थिक तज्ञ असण्याची गरज नाही. या समाजातला बहुतेक वर्ग अशिक्षित नि गरीब आहे, शिक्षण आणि त्यामुळे येणारे फायदे अशा गोष्टींपासून तो पूर्णपणे अनभिज्ञ आहे. या समाजाला आरक्षणाची गरज आहे ती यामुळेच. आरक्षणामुळे गरीबीतून वर येण्याची संधी या समाजाला मिळणार आहे, त्याबरोबरच आपल्याला वेगळी वागणूक मिळते, समाजाच्या मुख्य धारेत येण्याची संधी आपल्याला मिळत नाही ही भावना नाहीशी होण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.

एका बाजूला मुस्लिम स्वतःला या देशाचे नागरीक मानत नाहीत, ते समाजात मिसळत नाहीत, ते आपापले घोळके बनवून त्यातच जगतात असे आरोप करायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांना शिक्षण, नोकरी अशा संधी उपलब्ध करून देणा-या मुस्लिम आरक्षणाला विरोध करायचा हा शुद्ध खोटेपणा आहे. आरक्षणाचा मूळ हेतू काय? विशिष्ट जातीमधे, मागास घरामधे, गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाला एक खास संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येता येईल आणि स्वत:ला आणि आपल्या घराला प्रगतीच्या वाटेवर नेता येईल. मुस्लिम आरक्षणामुळे हे उद्देश साध्य होत असताना त्याला विरोध का? एक श्रीमंत हिंदू मुलगा त्याच्या जातीमुळे आरक्षण मिळवतो मात्र आपण गरीब असूनही फक्त मुस्लिम असल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही हे पाहणारा मुस्लिम मुलगा जर सा-या व्यवस्थेला आपला शत्रू मानू लागला तर यात दोष कुणाचा?

आरक्षण सुरू झाले ते मागे राहिलेल्यांना पुढे येण्याची एक संधी म्हणून. असे असताना हा या धर्माचा, तो त्या धर्माचा हा भेदभाव कशाला? जे गरीब आहेत, जे अजून मागासलेले राहिले आहेत अशा सा-यांना आरक्षण मिळायला हवे. किंबहुना आरक्षण जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर न देता ते आर्थिक परिस्थितीवर देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच मुस्लिम आरक्षणाला आंधळा विरोध न करता सारासार विचार करून त्याला पाठिंबा देणे यातच शहाणपणा आहे.