Tuesday, December 27, 2011

छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?

सध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय? त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?'

कुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते!) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम? आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही? बदला कंपनी!' एवढे हे सारे सोपे झाले आहे.

छोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच! अरे काय चाललंय काय हे? पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.

आजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवता किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं?

Thursday, December 22, 2011

नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा

काही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.

नात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का? आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय? म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का?

नात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का? (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.

भारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का?

Wednesday, November 30, 2011

कबूतर, जा... जा... जा...

भाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी!) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.

कारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का?) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.

खरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै?) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे?)

असो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही!

Saturday, November 26, 2011

हरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते!

हरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.

सध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली? शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत? म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का?

घडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या?' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार!

पण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय? त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी!

आणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते! मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का? 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे? एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो!

असो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे! कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.

Friday, November 11, 2011

मराठी माणूस आणि दिवाळी अंक!

तर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा http://mr.upakram.org/node/3522#comment-60990 हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.

आता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे? पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का? आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना? मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे? मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.

दिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा? आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला?

Friday, October 21, 2011

खडकवासल्याचा धडा!

खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

हा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून?' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय? वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का? आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार? पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार? (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील?

बाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.

असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच!

Saturday, October 15, 2011

स्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर!

कुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार? पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते?

स्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय? त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय? आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय?

स्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता? ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल? स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का?

आता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल?

Thursday, September 29, 2011

ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...

रविवारी मटात "हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून 'हृदयेश आर्टस्' तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे आणि या माळेतला पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे" ही बातमी वाचली आणि हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.

हृदयनाथ मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार लतादिदींना देऊन आता काय साध्य होणार आहे? पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय? आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही? किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही! त्यात हे प्रकार कुण्या पुढारी घराण्याने केले तर ते समजण्यासारखे आहे, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अशा वागण्याची अपेक्षा नक्कीच महाराष्ट्राला नाही.

आता मंगेशकर कुटुंबियांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत थोडेसे. लता मंगेशकर यांना भारत सरकारचा 'भारतरत्न' पुरस्कार मिळालेला आहे. लता भोसले यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना मनोमन तो देऊनच टाकला आहे. (आणि तसाही त्यांना पद्मविभूषण आहेच.) आणि हृदयनाथांबद्दल काय बोलावे? त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय? किंबहुना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर, लता मंगेशकर यांनी इतर पुरस्कार नाकारणेच योग्य नव्हे काय?

असो. कितीही पोटतिडकीने लिहिले तरी एकूण रागरंग पहाता रविवारी हृदयनाथ लतादिदींना हा पुरस्कार देतील आणि त्याही तो स्वीकारतील याबाबत मला तरी मुळीच शंका वाटत नाही. तेव्हा सध्यातरी देवाकडे इवढीच प्रार्थना करतो, 'ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...'

Sunday, September 25, 2011

कोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)

तिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते!

त्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.

आज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. पंधरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी तसंच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की!

Thursday, September 15, 2011

वाह ताज!

असं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.

मी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता!) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.

उत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं? त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का?

पण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच! आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज!'

[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]












Sunday, September 11, 2011

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

अखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत्ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण!’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल? मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.

आमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास!’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास?’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे.

असो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’

वि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो!

Wednesday, August 17, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २

दुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी! काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.

किल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.

लो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय?

त्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.

जेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील?'

थिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.

रत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.

Friday, August 12, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी

'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.

पुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.

शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे!

कोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे? तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.

सुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता!) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.

टीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.

टीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.

Wednesday, August 10, 2011

अदेन सलाद आणि आपण

'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.



हे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.

या चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं?' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का? आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.

केनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.

Friday, July 29, 2011

गुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड

लेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का? की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे?

मला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो!' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा असा की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.

साहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार? मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे! असे का झाले असावे? माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही!)

हे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा? मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.

सगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid? हा माझा शोध गुगलने is google making us stupid? असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय?

Friday, July 15, 2011

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट

बुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल? आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ज्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे?

या बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय! त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार? अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार? नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार?

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना? पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल? मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल? दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?

पण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.

Thursday, July 7, 2011

हे सारे अद्भुत आहे!

'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे!' असे वाटून मी आजही अचंबित होतो.

उदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तविक ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही? हे सगळे कसे होत असेल? आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल? इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल? दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल? मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल?

पण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.

सध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चालायलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे!

Thursday, June 30, 2011

मनमोहनसिंग साहेब, आवरा...

वृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे?

पंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही.

सरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही?

वाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते?

Saturday, June 25, 2011

किती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब?

जुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार? तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी?

जुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का? मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.

जुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार? जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते? अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का? नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी!

यावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय?' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे? निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको!

Saturday, June 18, 2011

का? ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात?

कधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.

ही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी! कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र(?) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल? ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय?

लग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय?

ही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील? हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे?

Monday, June 13, 2011

अखेर उपोषण संपले!

गेले अनेक दिवस गाजत असलेले बाबा रामदेव यांचे उपोषण अखेर संपले. चित्रपट नि उपोषणे लांबली की ती कंटाळवाणी होतात, त्यामुळे हे उपोषण संपल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या उपोषणातून काय कमावले नि काय गमावले याचा हिशोब बाबा रामदेव यांनी केल्यास (बाकी तो करण्याचा सूज्ञपणा ते दाखवतील का हा प्रश्नच आहे!) तो वजाच येणार यात काय शंका? किंबहुना गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी पाहता बाबा रामदेव दिसले की ‘कोण होतास तू, कोण झालास तू‘ हे गाणे आठवावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.

बाबांच्या गाडीची वाटचाल चुकली ती सुरुवातीलाच. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण नुकतेच ताजे असताना बाबा रामदेव यांनी काहीशा तशाच मागण्यांसाठी पुन्हा वेगळे उपोषण करावे ही गोष्ट लोकांना काही फारशी पचनी पडली नाही. त्यातच बाबा रामदेव यांनी आपल्या उपोषणासाठी उभारलेल्या पंचतारांकित शामियान्याचा मुद्दाही गाजला. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनासाठी भरमसाठ पैसे खर्च करून हा जामानिमा करण्याची गरज काय? लोकांना रामदेव बाबांचे हे वागणे दुटप्पीपणाचे वाटले. स्वत: वातानुकूलित मंडपात राजेशाही उपोषण करणारे बाबा रामदेव मंत्र्यांना जाब कसे विचारू शकतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मुलाला साखर खाऊ नये एवढे सांगण्यासाठी स्वत: साखर सोडणा-या त्या महात्म्याची आठवण झाली.

नंतर मुद्दा गाजला तो बाबा रामदेवांच्या सहका-यांचा. आपण ताडाच्या झाडाखाली ताक जरी प्यायलो तरी लोकांना ताडी पिल्यासारखेच वाटणार हे रामदेवबाबा कसे विसरले? आपण कुणासोबत राहतो, दिसतो याचे भान समाजसेवकांनी सतत ठेवायला हवे. किंबहुना समाजसेवकांचे चारित्र्य धुतलेल्या तांदळाइतके स्वच्छ हवे, त्यावर एकही डाग असता कामा नये. साध्वी वितंबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे लोक अशा लोकांना बाबांसोबत पाहून हे बाबांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे की विरोधी पक्षांचे सरकारविरोधी आंदोलन हा प्रश्न लोकांना पडला. बाबांचे आंदोलन जनतेच्या मनातून उतरायला सुरूवात झाली ती इथेच.

नंतर उपोषण सुरू झाले आणि बाबांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. मात्र त्या मांडतानाही वास्तवाचा विसर त्यांना पडला. त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अवास्तव नि राजकीय स्वरूपाच्या होत्या; देशहिताशी त्यांचा दुरूनदुरून संबंध नव्हता. काळ्या पैशाची मागणी ही त्यांची महत्वाची मागणी खरी, पण (सरकारलाही) ते काम तितके सोपे नाही या महत्वाच्या वस्तुस्थितीचे विस्मरण त्यांना झाले. स्विस सरकारचे कायदे पहाता ही माहिती मिळवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. ‘५००/१००० च्या नोटा रद्द व्हाव्यात‘ ही मागणी योग्य खरी, पण तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम अवघड होते. बाकी ‘भ्रष्टाचा-यांना फाशीची शिक्षा व्हावी, प्रधानमंत्री थेट निवडण्याचा अधिकार लोकांना मिळावा, इंग्रजीच्या जागी हिंदी वापरली जावी‘ या त्यांच्या मागण्या तर थक्क करणा-या होत्या. त्या मान्य झाल्यास जनतेचे आयुष्य कसे सुधारणार हे सांगण्यास ते का बरे विसरले असावेत?

नंतर घडला तो चार जूनचा प्रकार. हजारो पोलिसांनी रामलीला मैदानावर अचानक धाड टाकली आणि तिथल्या जवळपास लाखभर समर्थकांना पळवून लावत रामदेव बाबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत स्वत:ला अटक करून न घेता बाबांनी स्त्रीवेश परिधान करून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गमतीची गोष्ट अशी की एवढे करूनही पळून जाण्यात ते यशस्वी झाले नाहीतच. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना हरिद्वारला नेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले. असा प्रकार घडल्यावर वर ‘आपण स्त्रीवेश घातला यात काहीच गैर केले नाही; किंबहुना आपण शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला‘ असे लंगडे स्पष्टीकरण बाबांनी दिले. खरेतर स्वत:ला सन्मानाने अटक करून घेऊन स्वत:चे महत्व वाढवण्याची मोठी संधी बाबांकडे होती; तिचा फायदा त्यांनी का करून घेतला नाही या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करूनही मला आजपर्यंत सापडलेले नाही. या प्रकारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी सरकारवर केलेले आरोप अक्षरश: थक्क करणारे होते. ‘मला मारण्याचा सरकारचा डाव होता आणि माझे ५००० कार्यकर्ते बेपत्त्ता झाले आहेत‘ अशी सनसनाटी वक्तव्ये करून त्यांनी स्वत:च स्वत:च्या पायांवर धोंडा मारून घेतला. त्यातच १८०० कोटी हा आपल्या संपत्तीचा भरभक्कम आकडा जाहीर करून बाबांनी उपोषणापासून सामान्य जनतेला आणखीनच दूर लोटले.

मला वाटते, प्रत्येक समाजसेवकाची जी शोकांतिका होते तीच बाबांची झाली. ‘आपले म्हणणे लोक ऐकत आहेत, ते त्यांना पटते आहे, लोक आपल्याला मानू लागले आहेत‘ हे एकदा जाणवले की मग आपण काय करतो आहोत याचे भान लोकांना रहात नाही, बाबांचे काहीसे असेच झाले. याखेरीज समाजसेवकाने प्रचंड धूर्त असायला हवे हे बाबांना समजले नाही. आपल्या मंत्र्यांना आपण बरीच नावे ठेवत असलो तरी त्यांचा हा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. प्रत्येक चाल जिंकण्यासाठीच चालायची आणि नशिबाने ती उलटी पडली तरी तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे कसब त्यांना पक्के जमलेले आहे. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चाणाक्षपणा हे गुण का कोण जाणे आपण नकारात्मक माणतो, प्रत्यक्षात मात्र ते अतिशय उपयोगी आहेत. कुठे थांबायचे, कुठे विरोधकांना कोंडीत पकडायचे, कुठे थोडे नमते घ्यायचे नि कुठे आक्रमकपणा दाखवायचा हे जाणत्या समाजसुधारकाला नेमके कळायला हवे, रामदेव बाबा इथेच कमी पडले. याबाबत समाजसेवकांनी श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ह्या गोष्टीचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गांधींना आपण खूप साधे समजत असलो तरी ते तसे नव्हते, ते अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होते. जनआंदोलन कसे सूरू करायचे, ते कसे चालवायचे नि ते थांबवायची कधी याची खूणगाठ त्यांच्या मनात पक्की होती, त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठीचा सर्वव्यापी लढा उभारण्यात नि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी ठरले. समाजसुधारकांना आणि चळवळ करणा-यांना त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

असो, झाले ते झाले. जे घडले त्याला बहुतांशी रामदेव बाबा स्वत:च जबाबदार असले तरी मन त्यामुळे उदास झाले हे खरे. बाबांचे जनमानसांमधले स्थान डळमळले, आपल्या पहिल्याच चळवळीत ते संपूर्णपणे अपयशी झाले आणि त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या भारतवर्षाचा त्यांनी भ्रमनिरास केला याची बोचणी मनात आहे नि पुढेही राहीलच!

Thursday, June 2, 2011

सचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर!

नमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर लेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी?' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार! बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण?' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.

असो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला! हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)

तर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न? अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का? अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय? प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत?

पुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय?' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का? इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)

आता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून? नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही?' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात? अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.

पुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात? अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय? जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना? मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय? पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.

नंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना? उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल? सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय?

आणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला "पद्मश्री" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो?' कारेकर साहेब हे काय आहे? अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय? आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

मिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान? मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा? छे, आम्हाला नाही पटत!

बाकी कारेकर साहेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला!

असो (हा शेवटचा),
पत्रोत्तर द्याच.
आपला विश्वासू,
टिकोजीराव तिरशिंगराव पुणेकर.

ता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय?

आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.

Tuesday, May 31, 2011

चितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट

या शनिवारी 'चितचोर' पाहिला. या चित्रपटाविषयी बरेच ऐकून होतो, शेवटी परवा तो पहायचा योग आला. बहुत काय लिहिणे, एवढेच म्हणतो की या चित्रपटाची जेवढी स्तुती करण्यात आली होती ती कमीच ठरावी असा हा चित्रपट आहे!

'चितचोर' ही कथा आहे गीता ह्या एका लहानशा गावात राहणा-या तरूणीची. गीता 'अल्लड' या शब्दाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. नुकत्याच मॅट्रिकची परीक्षा दिलेल्या गीताचा बहुतांश वेळ शेजारचा राजू नि त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात जातो. गीताचे वडील गावात हेडमास्टर आहेत आणि तिची आई वरून थोडी कटकटी दिसत असली तरी आतून खूपच प्रेमळ आहे. गीता हे या दाम्पत्याचे शेंडेफळ, तेव्हा तिला अगदी श्रीमंत मुलगा मिळावा आणि तिचे जन्माचे भले व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अचानक त्यांची ही इच्छा फळाला येण्याची चिन्हे दिसतात, गीताच्या मोठ्या बहिणीचे - मीराचे एक पत्र घरी येते. त्यात तिने तिच्याच नात्यातल्या 'सुनील'विषयी लिहिलेले असते. सुनील नुकताच परदेशातून परतलेला आणि लठ्ठ पगार घेणारा एक इंजिनियर असतो. मजेची गोष्ट म्हणजे एका कामावर देखरेख करण्यासाठी तो काही दिवसात हेडमास्तरांच्याच गावी येणार असतो. पुढे काय होते? नाही, ते मी सांगणार नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे!

चितचोर मला आवडण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यातली अहिंसा. चितचोर मला ख-या अर्थाने एक अहिंसात्मक चित्रपट वाटला. शारिरीक तर सोडा, भावनिक किंवा मानसिक हिंसेपासूनही तो संपूर्णपणे अलिप्त आहे. एक उदाहरण - सुनील हे पात्र नकारात्मक दाखवून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याची नामी संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याने तो मोह टाळला आहे. विनोद चांगला आहे, पण सुनील वाईट नाही; तोही तितकाच चांगला आहे. मी तर म्हणेन, विनोद नव्हे तर सुनीलच या चित्रपटाचा खरा नायक आहे. साध्या मनाच्या साध्या लोकांचे चित्रण असे चितचोरचे स्वरूप आहे. चित्रपटात काहीही अवास्तव नाही, त्यातल्या संवादांना चुरचुरीत फोडणी नाही की त्यात विनाकारण घुसडलेले विनोदी प्रसंग किंवा गाणी नाहीत. मोठे कलाकार आपल्या भुमिकांमधे अगदी आतपर्यंत शिरले की चित्रपटाचे कसे सोने होते याचे चितचोर उत्तम उदाहरण आहे. दीना पाठक नि ए के हंगल तर अभिनयाचे वटवृक्ष, त्यांच्याबाबत काय बोलावे? अमोल पालेकर आणि विजयेंद्र घाटगे दोघेही उत्तम. पण खरी कमाल केली आहे झरीना वहाबने. गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते. चिंचा पाडणारी गीता आणि ‘मी फक्त सुनीलशीच लग्न करणार‘ असे आईला बाणेदारपणे सांगणारी गीता ह्या दोन्ही एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण असा अभिनय झरिनाने इथे केला आहे.

कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत ह्या सगळ्या आघाड्यांवर चितचोर उत्कृष्ट असला तरी मला तो भावला त्याच्या अस्सल भारतीयपणामुळे. एक भारतीय चित्रपट कसा असावा याचा चितचोर आदर्श वस्तुपाठ आहे. मोठ्या शहरांत राहणा-या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बनवले जाणारे आजचे चित्रपट पाहिल्यावर तर चितचोर विशेष आवडावा यात नवल ते काय? चितचोर पाहिल्यावरही तो एका ठराविक चित्रपटासारखा वाटत नाही हे चितचोरचे मोठे यश आहे. गीता नि विनोद ही पात्रे नव्हेत तर ते आजही कुठेतरी एकत्र असावेत असे वाटण्याइतका चितचोर खराखुरा, या मातीतला बनला झाला आहे.

इथे चित्रपटाच्या संगीताचा विशेष उल्लेख इथे केला नाही तर त्यासारखे पाप दुसरे असणार नाही. चित्रपटातली गीते नि संगीत रविंद्र जैन यांचे आहे. डोळ्यांनी अंध असलेला हा कलाकार एवढी सुंदर गीते लिहितो काय नि त्यांना त्याहून सुंदर चाली देतो काय, सारेच अद्भुत आहे. अर्थात या गीतांना सुमधुर बनवण्याचे श्रेय येसुदास नि हेमलता या गायकांकडे जाते, ते त्यांना द्यायलाच हवे.

चितचोर पहायचा आहे असे फारसे कुणी असेल असे मला वाटत नाही, पण तरीही हा सुंदर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर तो पहा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे!

Sunday, May 29, 2011

कॉलेजकाळातली ती घटना

मी आकुर्डीतल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजात शिकत असताना घडलेली ही घटना आहे. डी वाय पाटील कॉलेजातला तो काळ आठवला की मला आजही मोठा अचंबा वाटतो, त्या दिवसांत अभ्यास सोडून मी बाकी सगळे काही केले. आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या त्या काळात आपण असे का वागलो असू ह्या प्रश्नाचे उत्तर मला बराच विचार करूनही आजपर्यंत सापडलेले नाही. कॉलेजच्या त्या दिवसांवर लेख लिहायचा झाला तर तो 'अलिफ लैला' मालिकेच्या कुठल्याही भागापेक्षा जास्त रोमांचक होईल यात काय शंका? तूर्तास, अभियांत्रिकीची पहिल्या वर्षाची पहिली सहामाही सोडली तर नंतरच्या कुठल्याही सहामाहीत मी सगळ्या विषयांत पास झालो नाही आणि चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मी साडेपाच वर्षे घेतली एवढीच रंजक माहिती वाचकांना देऊन मूळ विषयाकडे वळतो.

ही घटना आहे शिवाजीनगर ते आकुर्डी लोकल प्रवासातली. पुर्वी पिंपरीला असलेले आमचे अभियांत्रिकी कॉलेज नंतर आकुर्डीला हलवले गेले आणि आम्हाला बस सोडून लोकलचा सहारा घ्यावा लागला. नेमके आठवत नाही, पण मी कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षाला असेन. नेहमीप्रमाणेच कॉलेजला उशिरा येऊन मी दुपारीच घरी परत चाललो होतो. लोकल्सना तेव्हा बरीच गर्दी असे. त्यातच पुण्याला जाणारी ही दुपारची लोकल दोन तासांनी असल्याने ब-यापैकी भरलेली असे. बसायला जागा नव्हतीच, तेव्हा आसनांशेजारी दाटीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून मी उजव्या बाजूच्या दारात उभा राहिलो. असे उभे राहिल्यामुळे हवा लागे आणि बाहेरची दृश्येही पाहता येत. मी दारातल्या लोखंडी दांड्याला टेकलो आणि टंगळमंगळ करीत बाहेर पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गाडीने चिंचवड स्टेशन मागे टेकले आणि ती पिंपरी स्टेशनात शिरली. काही लोक उतरले, बरेच लोक चढले. गाडी आता कुठल्याही क्षणी निघेल अशी स्थिती असताना अचानक मला समोरून एक माणूस येताना दिसला. तो जोरात पळत होता आणि त्याचे कारण सोपे होते, त्याला ही गाडी पकडायची होती. अशा वेळी पादचारी पुलाचा वापर कोण कशाला करेल? त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे?' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते? त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना! त्याचा हात सोडावा तर तो गाडीच्या चाकांखाली सापडणार आणि धरून ठेवावा तर तो गाडीसोबत फरफटणार हे नक्की. पण का कोण जाणे, मी त्याचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. मी तसे करताच आपले हिरोसाहेब खाली आदळले आणि धडपडत, ठेचकाळत रुळांशेजारच्या खडीवर पडले. चित्त जरासे स्थिर होताच मी लगेच मागे वळून पाहिले आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडला; आपले हिरोसाहेब अगदी धडधाकट होते, दुरूनतरी त्यांचे सगळे अवयव जागच्याजागी व्यवस्थित दिसत होते. मी आजूबाजूला पाहिले, एवढे रामायण घडले तरी कुणाला त्याचे विशेष वाटले नसावे. एकदोघांनी माझ्याकडे पाहून आपली भुवई उंचावली इतकेच. मी मात्र जाम हादरलो होतो, इतका की आपण शिवाजीनगरला कधी पोचलो आणि तिथे उतरून आपल्या बसथांब्यापर्यंत कसे गेलो हे मला कळलेच नाही!

आजही ती घटना आठवली की ह्दयाची धडधड थोडी वाढते आणि एक थंड शिरशिरी शरीरातून जाते. आपण केलेली ती हिरोगिरी त्या माणसाला आणि आपल्यालाही बरीच महागात पडली असती हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत रहातो. आपण (अजाणतेपणे का होईना) कुणाच्या तरी मृत्युला कारणीभूत ठरलो असतो हा विचार कितीही म्हटले तरी भयंकरच, नाही का?

Friday, May 13, 2011

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!

एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दाखवायला ह्या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे
पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर
रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू *पैसे देऊन* विकत घेणारे लोक ह्या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन
पिळगावकर साहेबांना कधी कळणार?

इतरांना सतत उपदेश करणारे बालाजी तांबे स्वतःच स्वत:चे आयुर्वेदिक उपचार
वापरून बारीक का होत नाहीत?

आपण हिरो म्हणून कधीच यशस्वी होणार नाही हे अभिषेक बच्चनला कधी समजणार?

स्कार्फ लावण्यात एवढा वेळ घालवणा-या दुचाकीस्वार मुली थेट हेल्मेटच का
वापरत नाहीत?

दरसाली 'यावर्षी पाऊस सरासरीइतकाच होण्याचा अंदाज' आणि 'उत्पादनात घट
झाल्याने हापूस आंब्याचे भाव चढे राहण्याची शक्यता' या बातम्या छापल्या
नाहीत तर वृत्तपत्रांचा परवाना रद्द करतात का?

आपले आर आर आबा नेहमी 'वाळूतस्करांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही','दहशतवादाचा धैर्याने सामना केला जाईल', 'काळाबाजारवाल्यांची गय केली
जाणार नाही' अशी भविष्यकाळातली वाक्येच का टाकतात? शाळेत  भूतकाळ
शिकवताना ते गैरहजर होते का?

लग्न जमवायच्या संकेतस्थळांवर मराठी मुली आपल्या जोडीदाराकडून 'फ्ल्युएंट
इंग्लिश' बोलता येण्याची अपेक्षा ठेवतात हे एकवेळ समजू शकतो, पण ती
अपेक्षा तरी अचूक इंग्लिशमधे व्यक्त करायला नको का?

अण्णा हजारे आपल्या 'मराठी' हिंदीत रोज वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत,
त्या रोज ऐकत असल्यामुळेच केंद्राने झटपट त्यांच्या सगळ्या अटी मान्य
केल्या ही अफवा खरी का?

पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही
वर्षांनी 'आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू' असं
एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?

आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा
करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?

Wednesday, May 11, 2011

उघडी खिडकी

"मिस्टर नटेल, आत्या खाली येतेच आहे, तोपर्यंत मात्र तुम्हाला मलाच झेलावं लागणार आहे." पंधरा वर्षांची ती चुणचुणीत पोरगी बोलली. समोर असलेल्या पुतणीचं कौतुक करतानाच येणा-या आत्याचाही मान राखला जाईल असं काहीतरी बोलण्याचा फ्रॅम्टन नटेल यांनी प्रयत्न केला. खरंतर या खेड्यात येऊन अनोळखी लोकांना दिलेल्या औपचारिक भेटींमुळे आपल्या नसांच्या दुखण्याला आराम पडेल या गृहीतकाबाबत त्यांना अजूनही शंका वाटत होती.
"मला ओळखीच्या प्रत्येकाच्या नावाने एक पत्र मी तुला देते." त्यांची बहीण म्हटली होती. "नाहीतर तू तिथे स्वतःला एकटं कोंडून घेशील आणि कुणाशी बोलणार नाहीस. आणि तुझ्या नसा आत्ता आहेत त्यापेक्षा आणखी बिघडतील."
"तुम्हाला इथले खूप लोक माहितीयेत?" शांततेत बराच मोठा अवधी गेला आहे असं वाटल्यावर शेवटी मुलीनं विचारलं.
"क्वचित कुणीतरी." फ्रॅम्टन म्हणाले. "माझी बहीण चार वर्षांपुर्वी इथे रहायला होती, त्यामुळे तिने ओळखीसाठी मला काही पत्रे दिली आहेत."
"म्हणजे माझ्या आत्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर!" मुलगी बोलली.
"त्यांचं नाव आणि पत्ता सोडून."
"तिच्या आयुष्यातली ती भयानक घटना तीन वर्षांपुर्वी घडली. तुमची बहीण तेव्हा इथे नसणार." मुलगी म्हणाली.
"भयानक घटना?" फ्रॅम्टनांनी तिला विचारलं. का कोण जाणे त्यांच्या सपक आयुष्यात भयानक घटनांना फारसं स्थान नव्हतं.
"तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्षातल्या या वेळीही आम्ही ती खिडकी उघडी का ठेवतो." हिरवळीवर उघडणा-या एका फ्रेंच पद्धतीच्या खिडकीकडे बोट दाखवत ती म्हणाली. "आज बरोबर तीन वर्षांपुर्वी ह्याच खिडकीतून माझ्या आत्याचे यजमान आणि तिचे दोन लहान भाऊ शिकारीसाठी गेले. मूर पार करत असताना त्यांना एका दलदलीनं गिळलं. त्यांची शरीरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत."
इथे तिचा आवाज किंचीत कंपन पावला. "बिचा-या आत्याला अजूनही वाटतं की कधीतरी ते - आणि त्यांच्याबरोबर असणारा आमचा तपकिरी स्पॅनियल - याच खिडकीतून परत येतील. त्यामुळेच ती खिडकी संध्याकाळपासून अगदी दिवेलागणीपर्यंत उघडी असते. ती मला नेहमी सांगते ते कसे या खिडकीतून गेले ते - म्हणजे तिच्या यजमानांनी आपल्या हाताभोवती मेणकापडाचा कोट कसा गुंडाळला होता वगेरे वगेरे. तुम्हाला माहितीये, आजच्यासारख्या एखाद्या उदास संध्याकाळी मला खरंच असं वाटतं की ते लोक परत येतील - त्या खिडकीतूनच." असं म्हणताना तिनं खांदे उडवले. अर्थातच, तिच्या आत्याचं खोलीत आगमन होताच मिस्टर फ्रॅम्टनांचा अगदी हायसं वाटावं यात नवल ते काय! आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. "ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना? माझे यजमान नि माझे भाऊ शिकारीवरून इतक्यात येतीलच आणि ते नेहमी असेच आत येतात."
"हिवाळ्यात बदकांची शिकार" या विषयावर त्या पुढे मग बोलतच राहिल्या. मिस्टर फ्रॅम्टन यांनी थोड्या कमी भितीदायक विषयाकडे संभाषण वळवण्याचा एक प्रयत्न केला. पण त्यांना स्पष्ट दिसत होतं की यजमान बाईंचं लक्ष त्यांच्याकडे जवळपास नव्हतंच, त्या वारंवार त्यांच्यामागे असलेल्या त्या उघड्या खिडकीकडे पहात होत्या.
"डॉक्टरांनी मला मानसिक उत्तेजना आणि शारिरीक कसरतींपासून कटाक्षाने दूर रहायला सांगितलं आहे" अनोळखी माणसांनाही तुमच्या बारीकसारीक गोष्टींमधे रस असतो असा गैरसमज झाल्यासारखे फ्रॅम्टन म्हणाले.
"हो?" मिसेस सॅपलटन म्हटल्या. त्यानंतर त्या अचानक उत्तेजित झाल्या पण मिस्टर फ्रॅम्टनांचं वाक्य ऐकून नव्हे! "हां. आले शेवटी. बरोबर चहाच्या वेळेला." त्या म्हटल्या.
फ्रॅम्टन किंचित थरथरले आणि पुतणीकडे सहानुभुतीच्या दृष्टीने पाहू लागले. ती उघड्या खिडकीकडे डोळ्यात प्रचंड भितीचे भाव आणून पहात होती. फ्रॅम्टनांनी आपली मान वळवली आणि त्याच दिशेनं पाहिलं.
संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात तीन आकृत्या एका थकलेल्या स्पॅनियलसोबत किंचितही आवाज न करता हिरवळीवर चालत येत होत्या. त्या सगळ्यांकडे बंदुका होत्या आणि एकाच्या खांद्यावर एक पांढरा कोट.
मिस्टर फ्रॅम्टनांनी आपली चालायची काठी उचलली, दिवाणखान्याचे दार आणि खडीचा रस्ता हा बाहेर जायचा मार्ग आहे ह्याची अंधुकशी नोंद त्यांच्या मनाने केली होतीच.
"हा, पोचलो शेवटी!" पांढ-या कोटाचा मालक असलेला तो गृहस्थ खिडकीतून आत येत म्ह्टला. "आम्ही येताना घाईघाईने बाहेर पडले ते गृहस्थ कोण होते?"
"तुम्ही आल्यावर काहीच कारण न देता जे बाहेर पडले ते मिस्टर नटेल होते," मिसेस सॅपलटन म्हटल्या. "त्यांना बघून एखाद्याला वाटावं त्यांना भूत दिसलं."
"मला वाटतं त्यामागचं कारण आहे आपला स्पॅनियल," पुतणी म्हटली. "कुत्र्यांविषयी आपल्याला वाटणा-या भितीविषयी त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा गंगेच्या किना-यावर कुत्र्यांनी त्यांचा स्मशानापर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ती रात्र एका नुकत्याच खणलेल्या खड्ड्यात काढावी लागली. ते तिथे होते आणि वर ती कुत्री तोंडात फेस आणून रात्रभर त्यांच्या खड्ड्याभोवती घुटमळत होती. असं घडलं तर कुणालाही भिती वाटणारच."

धडाकेबाजपणा ही तिची खासियत होती.

एच. एच. मुन्रो (साकी) [http://en.wikipedia.org/wiki/Saki] यांच्या "द ओपन विन्डो" [http://www.eastoftheweb.com/short-stories/UBooks/OpeWin.shtml] या कथेचा स्वैर (आणि संक्षिप्त) अनुवाद.

Sunday, May 1, 2011

मॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट!

काल संध्याकाळी मॅक्डोनाल्डस् ला भेट देऊन आलो. www.FreeCharge.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही तुमच्या भ्रमणध्वनी खात्यात पैसे ओतलेत की तुम्हाला (आणणावळ १० रू जास्त घेऊन) तेवढ्याच किमतीची कूपन्स घरपोच केली जातात. या संकेतस्थळावरून आलेली मॅक्डोनाल्डस् ची काही कूपन्स घरात पडून होती, ती वापरायचा आज शेवटचा दिवस आहे हे काल समजल्यावर मॅक्डोनाल्डस् मधे जावेच लागले. तिकडून परत आल्यानंतर फक्त एवढेच म्हणतो, 'आय एम नॉट लविन इट!'

मॅक्डोनाल्डस् मधल्या खाण्यावर माझा एकच आक्षेप आहे - ते खाणे खाण्यासारखे लागत नाही. तिथले चिकन नगेटस्, फिश-ओ-फिलेट आणि पनीर पफ हे पदार्थ खाल्ल्यावर ते अनुक्रमे धर्माकोल, वास न येणारे रबरी तुकडे आणि कागदाचा लगदा या घटक वस्तुंपासून बनलेले असतात असे माझे तरी पक्के मत झाले आहे. नाही म्हणजे, सगळ्यांच्या चवी सारख्याच; हा प्रकार तरी काय आहे? हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे? ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत? इतकेच काय, ट्रे मधे असलेले वेज पनीर पफ खाताना आपण ट्रेमधले दोन पेपर नॅपकिन्सही फस्त केल्याचे त्यांची शोधाशोध सुरू झाल्यावरच मला समजले. मूळ अमेरिकन असलेल्या ह्या कंपनीने हे पदार्थ अमेरिकेन लोकांना समोर ठेवून बनवल्याने ते असे सपक आणि बेचव लागत असावेत असा माझा तरी अंदाज आहे. हो, पण, आम्ही घेतलेल्यांपैकी फ्रेंच फ्राईज नि कोकाकोला हे पदार्थ मात्र मला आवडले. मॅक्डोनाल्डस् वाले हे पदार्थ कुणा दुस-याकडून बनवून घेतात काय?

परिस्थिती अशी असली तरी हॉटेलातली सगळी मंडळी मात्र हे पदार्थ चवीने खाताना दिसली. बहुतेक सगळी मंडळी तरूण होती. मला त्यांचे वाईट वाटले. मैत्रिणीवर किंवा मित्रावर छाप मारण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते नाही? हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे?) ए़कूणच तुमचे पोट तृप्त झाले नाही तरी तुमचे डोळे मात्र तृप्त होतील याची बरोबर काळजी मॅक्डोनाल्डस् वाल्यांनी घेतलेली दिसते. कॉलेजकुमारांचे सोडा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले माझे काही सहकारीही मॅक्डोनाल्डस् मधले हे खाणे नियमितपणे खातात असे मी ऐकतो. हे बेचव आणि सपक खाणे जे लोक पैसे देऊन मिटक्या मारत खातात, त्यांना मी सलाम करतो!

तात्पर्य : हे बर्गर, नगेटस् वगेरे एक दिवस खायला ठीक आहे, पण शेवटी, 'गड्या आपला (वडा)पाव बरा!'

Thursday, April 28, 2011

लोकशाही आणि भारत

"लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं." या अर्थाचं जोसेफ हेलर या अमेरिकन कादंबरीकाराचं एक वाक्य आहे. आपल्या भारतातली सध्याची परिस्थिती पाहिली की मला हे वाक्य अगदी तंतोतंत पटतं.

आता हेच पहा - परवा सत्यसाईबाबांचं निधन झालं. ह्या घटनेचं वार्तांकन करताना भारतातल्या जवळपास प्रत्येक वृत्तपत्रानं त्यांचा उल्लेख 'थोर संत/प्रत्यक्ष देव' असा केला आणि वेळोवेळी त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांमधला एक चकार शब्दही आपल्या लेखात येणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या आश्रमात घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकार/त्यांनी उभं केलेलं प्रचंड बेहिशोबी आर्थिक साम्राज्य यांविषयी कुणी 'ब्र'ही काढला नाही. बीबीसीनेही बाबांच्या मृत्युची बातमी छापली पण बातमीच्या शेवटी But his critics say that many of (his) activities were publicity stunts. They say that he was a persuasive fraudster who used his huge popularity to avoid being investigated over allegations of murky financial practices and sexual abuse. ही पुष्टी जोडायला ते विसरले नाहीत. हा भारतीय माध्यमांचा खोटारडेपणा म्हणता येईल की आपले वाचक/प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून नाईलाजाने केलेली तडजोड?

सत्यसाईबाबांच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या अतिमहत्वाच्या लोकांची यादी थक्क करणारी होती. आपल्या 'आदरणीय' राष्ट्रपतीजी किंवा आडवाणीजी राहूद्या पण सचिन तेंडुलकर, मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम हेही सत्यसाईंचे भक्त होते हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर थोडा कमी झालाच. बाकी सगळे ठीक, पण कलाम साहेब तुम्ही पण? आता बाबांवरचे आरोप सिद्ध झाले नव्हते असे त्यांचे भक्त म्हणू शकतातही पण लुंगासुंगा राजकारणीही सगळ्या यंत्रणेला कसा खिशात घालू शकतो हे आपल्याला दिसत असताना बाबांवर कारवाई होईल नि त्यांवरचे आरोप सिद्ध होतील ही अपेक्षा आम्ही कशी ठेवावी? अर्थात राजकारण्यांचे नि सत्यसाईंचे संबंध होते यात नवल काय? प्रचंड मोठ्या जनशक्तीला काबूत ठेवण्याचं आध्यात्मिक बाबांजवळ असणारं सामर्थ्य आणि काळा पैसा सहज पांढरा करण्याची त्यांची शक्ती या दोन गोष्टींमुळे ते राजकारण्यांना जवळचे वाटतात तर आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणी त्यांना. पण हे सामान्य जनतेला समजवणार कोण? सत्यसाईबाबांवर कितीही गंभीर आरोप होवोत, आसाराम बापूंच्या आश्रमात नरबळींचे प्रकार होवोत किंवा स्वामी नित्यानंद प्रणयचाळे करोत, जनतेचा बाबांवरचा विश्वास मात्र अबाधितच! शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, मुंबईचे अनिरुद्ध बापू, कोकणातले नरेंद्र महाराज या सगळ्या महाराजांना मोठे करणारे कोण? आपण सामान्य लोकच. महाराष्ट्र जरी आपल्या पुरोगामित्वाची घमेंड मारत असला तरी समाजाला सदुपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वरी सांगणा-या ज्ञानेश्वरांपेक्षा किंवा समाजातल्या बुवाबाजी, ढोंग, अंधश्रद्धा यांवर आपल्या अभंगातून प्रहार करणा-या तुकोबांपेक्षा सध्या लोकांना शिर्डीचे साईबाबा किंवा नरेंद्र महाराज जवळचे वाटतात हे वास्तव नाकारून कसे चालेल?

'आम्ही वाटेल तसे वागू, तुम्ही आम्हाला शिकवू नका.' हा न्याय मग पुढे इतर ठिकाणीही लागू होतो. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याबाबत मंत्र्यांना दूषणे देत असतानाच 'आपल्या' आमदाराला आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयी केले जाते, सलमान खानवर, संजय दत्तवर कितीही गंभीर आरोप असोत, त्यांचे चित्रपट आवडीने बघितले जातात आणि इतरांना नावे ठेवता ठेवता कित्येक नियम आपल्या सोयीने मोडले जातात. आपण असे वागत असताना देशात मात्र उत्कृष्ट लोकशाहीची अपेक्षा धरतो, हे चुकीचे नाही का?

हे सगळं बदलायचं असेल तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पण आपण असं करू शकू? आपल्याला हे जमलं तरच आपला देश महान बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असं आपण म्हणू शकू, नाहीतर, नुसता म्हणायलाच 'मेरा भारत महान'! हो की नाही?

Saturday, April 16, 2011

हचिको - एक इमानी कुत्रा

विकीपिडीयावरचा एखादा लेख वाचून डोळ्यांच्या कडा पाणावल्या असं तुमचं कधी झालं आहे का? माझं असं नुकतंच झालं, हचिको या इमानी कुत्र्यावरचा लेख वाचून.

१९२४ साली, टोक्यो विद्यापीठात शेतकी खात्यात काम करणा-या एका प्रोफेसर साहेबांनी अकिता जातीचं एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आपल्या घरी आणलं, त्याचं नाव होतं 'हचिको'. छोटा हचिको थोड्याच दिवसात आपल्या धन्याच्या घरी रूळला, एवढंच काय, दर संध्याकाळी आपल्या धन्याचं स्वागत करण्यासाठी तो 'शिबुया' रेल्वेस्टेशनवरही जाऊ लागला. हा दिनक्रम चालू राहिला साधारण एक वर्षे. मे १९२५ सालच्या एका दिवशी मात्र अघटित घडलं, प्रोफेसर साहेब त्या दिवशी घरी परतलेच नाहीत. ते आता कधीच घरी परतणार नव्हते; मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला होता! छोट्या हचिकोच्या लक्षात मात्र ही गोष्ट आलीच नाही, तो रोजच्या नेमानुसार आपल्या धन्याला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोचला. आपला धनी आता कधीच परत येणार नाही हे त्या इमानी जीवाला कसे कळणार?

काही दिवस उलटले, हचिकोसाठी एक नविन घर शोधून त्याला नविन मालकाच्या ताब्यातही दिले गेले. हचिको मात्र तिथून निसटला, पुन्हापुन्हा. आपल्या जुन्या घरी अनेकदा धडकल्यावर आपले मालक इथे राहत नाहीत हे शेवटी त्या मुक्या जीवाला समजले असावे, पण ते सध्या आहेत कुठे हे त्याला कसे समजावे? आपले मालक इथे रहात नसले तरी ते शिबुया स्टेशनवर आपल्याला नक्की भेटतील असे हचिकोला वाटले आणि त्याने आपल्या नेहमीच्या वेळी स्टेशनवर आपल्या धन्याची वाट पाहण्याचे ठरवले. हचिको आपल्या धन्याची वाट पहातच राहिला, एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षे!

रेल्वे स्थानकात येण्याच्या ठराविक वेळी नेमाने तिथे उभी असणारी हचिकोची मुर्ती काही दिवसांत लोकांच्या ओळखीची झाली, यापैकी काही लोकांनी त्याला त्याच्या धन्याबरोबर पाहिले होते. या लोकांनी त्याला खाणे-पिणे द्यायला सुरूवात केली. प्राध्यापकसाहेबांचा एका विद्यार्थी हचिकोचा हा प्रवास जवळून पहात होता, त्याने हचिकोवर अनेक लेख लिहिले. टोक्योच्या 'असाही शिंबून' दैनिकात हे लेख प्रसिद्ध झाल्यावर सा-या जपानचे (नि जगाचेही?) लक्ष हचिकोकडे वेधले गेले.

आपल्या इमानी वृत्तीमुळे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालेल्या या श्वानोत्तमाचा अखेर ८ मार्च १९३५ रोजी मृत्यु झाला. आपल्या कुत्र्यावरील प्रेमामुळे प्रत्यक्ष स्वर्गालाही नकार देणा-या अर्जुनाची कथा आपण अनेकवेळा ऐकली आहे, स्वर्गात पोचल्यावर आपले धनी जर स्वर्गात नसतील तर आपणही तिथे जाणार नाही असेच हचिको म्हटला नसेल कशावरून?

बुद्धीची देणगी असल्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत असं आपण कितीही म्हटलो तरी प्रत्यक्षात परिस्थिती याहून अगदी उलटी आहे असं माझं मत आहे. हचिकोची ही कहाणी वाचल्यावर काहीसं असंच वाटतं, नाही?

हचिकोवरील विकीपिडिया लेखाचा पत्ता : http://en.wikipedia.org/wiki/Hachik%C5%8D

Wednesday, April 6, 2011

विश्वकरंडक जिंकण्यासाठी भारतीय संघाला धमक्या?

जर भारत विश्वकरंडक जिंकला तर मी माझे सगळे कपडे उतरवेन असे 'पूनम पांडे'ने जाहीर करताच सगळ्यांनीच डोळे वटारले. (तिला पहाण्यासाठी?) अर्थात तिने तिचे विधान (अजूनपर्यंत तरी) खरे केले नाही हा तिच्याकडे डोळे लावून बसलेल्या तमाम चाहत्यांचा अपमानच नव्हे काय? पण हे झाले आपल्या संघाला जिंकण्यासाठी अमिष दाखवण्याबाबत. समजा कुणी आपल्या संघाला 'तुम्ही विश्वकरंडक जिंकला नाहीत तर...' अशा धमक्या दिल्या असत्या तर?

कशा असत्या या धमक्या?

राखी सावंत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी माझे सगळे कपडे उतरवेन.

अशोक चव्हाण : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला आदर्श सोसायटीतला एकेक फ्लॅट बक्षीस देईन.

हिमेश रेशमिया : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पंधरा खेळाडूंसाठी पंधरा नवी गाणी रेकॉर्ड करेन आणि ती सगळी आळीपाळीने प्रत्येक खेळाडूच्या घराबाहेर वाजवेन.

तुषार कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी एकताला प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यावर चित्रपट काढायला लावेन आणि प्रत्येक चित्रपटात खेळाडूची भूमिका मीच करेन.

अभिषेक बच्चन : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी रावण-२ काढेन.

मल्लिका शेरावत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी हिस्स-२ काढणार नाही.

राम गोपाल वर्मा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी तुषार कपूर आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन रक्तचरित्र-३ काढेन.

शाहरूख खान : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी 'चक दे इंडिया-२' काढेन आणि यात खेळ हॉकी नव्हे तर क्रिकेट असेल.

करिना कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आणखी वजन उतरवून 'साईज -१' होईन.

सुरेश कलमाडी : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी सरकारला दर वर्षी विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायला लावेन आणि तिचा आयोजक मीच असेन.

ए राजा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आयपीएलचे लिलाव टू जी स्पेक्ट्रम लिलावाच्या धर्तीवर करेन.

आणि सगळ्यात शेवटी...

रजनीकांत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पुढची विश्वकरंडक स्पर्धाच आयोजित होऊ देणार नाही.

Monday, April 4, 2011

भारत विश्वविजेता!

शनिवारी झालेल्या प्रचंड उत्कंठावर्धक सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले आणि २०११चा क्रिकेट विश्वचषक दिमाखात आपल्या खिशात घातला. तब्बल २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो भारतीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. विश्वचषक जिंकणे ही मोठी गोष्ट खरीच, पण ज्या चिकाटीने नि जिगरबाज वृत्तीने खेळ करून महेंद्रसिंग धोनीच्या संघाने तो जिंकला तिला खरोखरच तोड नाही!

यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचा, जिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होते, यावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकता, विजय खेचून आणण्याची वृत्ती, लढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगले, नाही का?

अंतिम सामन्यापर्यंतचा भारताचा प्रवास सोपा नव्हता. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तान असे दोन महाभयंकर संघ त्यांच्या वाटेत उभे होते. पण धोनीच्या संघाने त्यांना हरवले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यावर क्रिकेटप्रेमींमधे निराशा पसरली पण श्रीलंकेचा पहिल्या काही षटकांचा खेळ पाहिल्यावर ती आनंदात परिवर्तित झाली. अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याचा प्रत्यय लगेच आला; शेवटच्या काही षटकांमधे श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची व्यवस्थित धुलाई केली नि भारतीय क्रिकेटरसिकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला. डावाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग बाद झाला नि टांगणीला लागलेला हा जीव थोडा आणखी वर गेला. सचिनने दोन सुरेख चौकार मारून चांगली सुरुवात केली खरी, पण एका सुंदर चेंडूवर तो बाद झाल्यावर, खरे बोलायचे तर, भारतीय क्रिकेटरसिकांनी सामना वजा खात्यात टाकला होता. नंतर जे झाले ते अभूतपूर्व होते. त्यावेळी जे घडले ते भारतीय नव्हते, ते अस्सल अभारतीय होते. तिसरा, चौथा, पाचवा अशी बळींची रांग पहाण्याची क्रिकेटरसिक अपेक्षा करत असताना गंभीर नि कोहलीने मात्र त्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटचे दर्शन घडवले. कोहली बाद झाल्यावर धोनी मैदानात आला. इकडे गंभीर दुस-या बाजूला टिकून होता. उत्तम फलंदाजी काय असते हे त्याने त्या दिवशी सा-या जगाला दाखवून दिले. शंभराला तीन धावा बाकी असताना तो बाद झाल्यावर वाटले, त्याचे शतक हुकल्याचे दु:ख त्याच्यापेक्षा क्रिकेटरसिकांना जास्त झाले असेल. गंभीर गेला तरी कप्तान धोनी बिचकला नाही, तो चिवटपणे तिथेच टिकून राहिला. नायक शब्दाची व्याख्या स्पष्ट करेल असा त्याचा त्या दिवशीचा खेळ होता. द्रौपदीने धावा केल्यावर जसा कृष्ण धावत आला नि त्याने तिचे लज्जारक्षण केले, धोनीचे वागणे त्या दिवशी काहीसे तसेच होते.

नंतर? नंतर शंभर, नव्वद, पन्नास अशी विजयासाठी आवश्यक धावांची संख्या कमीकमी होत गेली नि स्टेडीयममधल्या भारतीयांचा आवाज वाढतवाढत गेला. शेवटच्या चेंडूवर धोनीने षटकार मारून चषकाला आपल्याकडे ओढले, मला वाटते हा चुरशीचा सामना संपविण्याचा याहून देखणा दुसरा प्रकार कुठला असूच शकत नव्हता! संघातल्या नवोदित खेळाडूंनी हा विजय सचिनला अर्पण केला. या महान खेळाडूने केलेल्या विक्रमांच्या पुष्पगुच्छात फक्त एकाच गुलाबाची जागा रिकामी होती, झाले तीही भरली गेली.

आणखी काय लिहावे! धोनी, या विजयासाठी तुला नि तुझ्या संघाला खूप खूप धन्यवाद देऊन हा लेख संपवतो. भारतातल्या आजकालच्या घटना पाहून भारतीय असल्याची लाज वाटावी अशी परिस्थिती आली असताना तू मात्र भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असा पराक्रम घडवलास, याबद्दल तुझे आभार किती मानावेत?

ता.क. भारतीय संघाने प्रचंड पराक्रम दाखवून हा विजय मिळवला असला तरी आपल्या ओंगळवाण्या वागण्याने त्यावर बोळा फिरवण्याचे काम राजकारण्यांनी केलेच. याला सुरुवात केली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी. संघातील फक्त दिल्लीच्या खेळाडूंना त्यांनी बक्षिसे जाहीर केली. शीला दिक्षीत बाई, ही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काय? याचीच री पुढे उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब नि गुजरात सरकारने 'आपापल्या' खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली. अरे क्रिकेट हा एक सांघिक खेळ, निदान त्याचा विश्वचषक जिंकल्यावर तरी असा कद्रूपणा दाखवू नका!

Wednesday, March 30, 2011

प्रिय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब!

मोहाली येथे ३० मार्च रोजी होणारा भारत-पाक क्रिकेट सामना पाहण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ गिलानी यांना आमंत्रित करण्याचा आपल्या सरकारचा निर्णय खरोखरच धक्कादायक नि प्रचंड संताप आणणारा आहे. भारत हा सामना हारला तर जेवढा संताप होईल त्यापेक्षा दहा पट संताप आपल्या या निर्णयामुळे आत्ता आम्हाला होत आहे असे म्हटले तर त्यात काडीचीही अतिशयोक्ती होणार नाही!

मनमोहन सिंग, आम्ही कोणी मोठे राजकारणतज्ञ नाही, पण या दरिद्री प्रस्तावामागचे कारण आपण आम्हाला सांगू शकाल काय? पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट आहे, ते वाकडे ते वाकडेच राहणार हे आम्ही का आपल्याला सांगायला हवे? हे शेपूट कापणे हाच त्याचा त्रास संपवण्याचा एकमेव उपाय आहे, ते सरळ करण्यात वेळ घालवणे शुद्ध वेडेपणा होय. पाकिस्तानतल्या नद्यांमधे आणि तेथील प्रत्येक माणसाच्या रक्तामधे भारतद्वेष वाहतो आहे, हे आपल्याला माहीत नाही का? या देशाच्या अतिरेक्यांनी भारतात येऊन शेकडो निरपराध भारतीयांची (नि काही परदेशी पाहुण्यांची) कत्तल केलेल्यास अजून पुरती तीन वर्षेही झाली नाहीत हे आपण विसरलात काय? छत्रपती शिवाजी टर्निमस येथील रक्ताचे डाग अजूनही ओले आहेत, लिओपोल्ड कॅफेमधील काचांना बंदुकीच्या गोळ्यांनी गेलेले तडे अजून तसेच आहेत आणि गोळीबारात अडकलेल्या अनेकांच्या कानांना बंदुकींच्या दणदणाटाने गेलेले दडे अजूनही मोकळे झालेले नाहीत; हे सगळे असे असताना आपण हा लाजिरवाणा निर्णय कसा घेऊ शकता?

आणि आम्ही म्हणतो, एवढेच जर करायचे आहे तर मग त्या अजमल कसाबने काय घोडे मारले आहे? त्यालाही सामना पाहण्यास बोलवा आणि तुमच्या नि गिलानी साहेबांच्यामधे बसवा. त्याहून उत्तम गोष्ट म्हणजे सामन्यानंतर त्याला गिलानी साहेबांबरोबर (सुटाबुटाचा आहेर करूनच) घरी पाठवून द्या. असे झाल्यावर तर काय, पाकिस्तान २६/११ घडलेच नाही असेही कमी करणार नाही!

मनमोहनसिंग साहेब, आम्ही आपल्याला एक सज्जन गृहस्थ समजत होतो, पण आपले सहकारी करत असलेले घोटाळ्यांचे नवनवे विक्रम (नि आपली त्यांना मूकसंमती) पहाता आमचे ते म्हणणे चुकीचे होते असेच आता म्हणावे लागते आहे. कौरवांची सगळी दु:साहसे निमूटपणे पाहणा-या नि आतून त्यांना प्रोत्साहन देणा-या धृतराष्ट्रासारखे आपले हे वागणे आहे. नुकताच आपण घेतलेला हा निर्णय तर या सगळ्यावर कडी करणारा आहे. सामना सुरू होण्यास अजूनही एक तास आहे, आपण करोडो भारतीयांना क्लेश देणारा हा निर्णय बदलावा आणि पाकिस्तानाच्या अतिरेकी कारवायांमधे वेळोवेळी बळी पडलेल्या हजारो भारतीयांची विटंबना थांबवावी अशी मी आपल्याला विनंती करतो.

ईश्वर आपल्यास सुबुद्धी देवो!

आपला नम्र,
तिरशिंगराव टिकोजीराव पुणेकर