Monday, June 13, 2011

अखेर उपोषण संपले!

गेले अनेक दिवस गाजत असलेले बाबा रामदेव यांचे उपोषण अखेर संपले. चित्रपट नि उपोषणे लांबली की ती कंटाळवाणी होतात, त्यामुळे हे उपोषण संपल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या उपोषणातून काय कमावले नि काय गमावले याचा हिशोब बाबा रामदेव यांनी केल्यास (बाकी तो करण्याचा सूज्ञपणा ते दाखवतील का हा प्रश्नच आहे!) तो वजाच येणार यात काय शंका? किंबहुना गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी पाहता बाबा रामदेव दिसले की ‘कोण होतास तू, कोण झालास तू‘ हे गाणे आठवावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.

बाबांच्या गाडीची वाटचाल चुकली ती सुरुवातीलाच. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण नुकतेच ताजे असताना बाबा रामदेव यांनी काहीशा तशाच मागण्यांसाठी पुन्हा वेगळे उपोषण करावे ही गोष्ट लोकांना काही फारशी पचनी पडली नाही. त्यातच बाबा रामदेव यांनी आपल्या उपोषणासाठी उभारलेल्या पंचतारांकित शामियान्याचा मुद्दाही गाजला. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनासाठी भरमसाठ पैसे खर्च करून हा जामानिमा करण्याची गरज काय? लोकांना रामदेव बाबांचे हे वागणे दुटप्पीपणाचे वाटले. स्वत: वातानुकूलित मंडपात राजेशाही उपोषण करणारे बाबा रामदेव मंत्र्यांना जाब कसे विचारू शकतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मुलाला साखर खाऊ नये एवढे सांगण्यासाठी स्वत: साखर सोडणा-या त्या महात्म्याची आठवण झाली.

नंतर मुद्दा गाजला तो बाबा रामदेवांच्या सहका-यांचा. आपण ताडाच्या झाडाखाली ताक जरी प्यायलो तरी लोकांना ताडी पिल्यासारखेच वाटणार हे रामदेवबाबा कसे विसरले? आपण कुणासोबत राहतो, दिसतो याचे भान समाजसेवकांनी सतत ठेवायला हवे. किंबहुना समाजसेवकांचे चारित्र्य धुतलेल्या तांदळाइतके स्वच्छ हवे, त्यावर एकही डाग असता कामा नये. साध्वी वितंबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे लोक अशा लोकांना बाबांसोबत पाहून हे बाबांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे की विरोधी पक्षांचे सरकारविरोधी आंदोलन हा प्रश्न लोकांना पडला. बाबांचे आंदोलन जनतेच्या मनातून उतरायला सुरूवात झाली ती इथेच.

नंतर उपोषण सुरू झाले आणि बाबांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. मात्र त्या मांडतानाही वास्तवाचा विसर त्यांना पडला. त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अवास्तव नि राजकीय स्वरूपाच्या होत्या; देशहिताशी त्यांचा दुरूनदुरून संबंध नव्हता. काळ्या पैशाची मागणी ही त्यांची महत्वाची मागणी खरी, पण (सरकारलाही) ते काम तितके सोपे नाही या महत्वाच्या वस्तुस्थितीचे विस्मरण त्यांना झाले. स्विस सरकारचे कायदे पहाता ही माहिती मिळवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. ‘५००/१००० च्या नोटा रद्द व्हाव्यात‘ ही मागणी योग्य खरी, पण तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम अवघड होते. बाकी ‘भ्रष्टाचा-यांना फाशीची शिक्षा व्हावी, प्रधानमंत्री थेट निवडण्याचा अधिकार लोकांना मिळावा, इंग्रजीच्या जागी हिंदी वापरली जावी‘ या त्यांच्या मागण्या तर थक्क करणा-या होत्या. त्या मान्य झाल्यास जनतेचे आयुष्य कसे सुधारणार हे सांगण्यास ते का बरे विसरले असावेत?

नंतर घडला तो चार जूनचा प्रकार. हजारो पोलिसांनी रामलीला मैदानावर अचानक धाड टाकली आणि तिथल्या जवळपास लाखभर समर्थकांना पळवून लावत रामदेव बाबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत स्वत:ला अटक करून न घेता बाबांनी स्त्रीवेश परिधान करून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गमतीची गोष्ट अशी की एवढे करूनही पळून जाण्यात ते यशस्वी झाले नाहीतच. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना हरिद्वारला नेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले. असा प्रकार घडल्यावर वर ‘आपण स्त्रीवेश घातला यात काहीच गैर केले नाही; किंबहुना आपण शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला‘ असे लंगडे स्पष्टीकरण बाबांनी दिले. खरेतर स्वत:ला सन्मानाने अटक करून घेऊन स्वत:चे महत्व वाढवण्याची मोठी संधी बाबांकडे होती; तिचा फायदा त्यांनी का करून घेतला नाही या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करूनही मला आजपर्यंत सापडलेले नाही. या प्रकारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी सरकारवर केलेले आरोप अक्षरश: थक्क करणारे होते. ‘मला मारण्याचा सरकारचा डाव होता आणि माझे ५००० कार्यकर्ते बेपत्त्ता झाले आहेत‘ अशी सनसनाटी वक्तव्ये करून त्यांनी स्वत:च स्वत:च्या पायांवर धोंडा मारून घेतला. त्यातच १८०० कोटी हा आपल्या संपत्तीचा भरभक्कम आकडा जाहीर करून बाबांनी उपोषणापासून सामान्य जनतेला आणखीनच दूर लोटले.

मला वाटते, प्रत्येक समाजसेवकाची जी शोकांतिका होते तीच बाबांची झाली. ‘आपले म्हणणे लोक ऐकत आहेत, ते त्यांना पटते आहे, लोक आपल्याला मानू लागले आहेत‘ हे एकदा जाणवले की मग आपण काय करतो आहोत याचे भान लोकांना रहात नाही, बाबांचे काहीसे असेच झाले. याखेरीज समाजसेवकाने प्रचंड धूर्त असायला हवे हे बाबांना समजले नाही. आपल्या मंत्र्यांना आपण बरीच नावे ठेवत असलो तरी त्यांचा हा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. प्रत्येक चाल जिंकण्यासाठीच चालायची आणि नशिबाने ती उलटी पडली तरी तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे कसब त्यांना पक्के जमलेले आहे. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चाणाक्षपणा हे गुण का कोण जाणे आपण नकारात्मक माणतो, प्रत्यक्षात मात्र ते अतिशय उपयोगी आहेत. कुठे थांबायचे, कुठे विरोधकांना कोंडीत पकडायचे, कुठे थोडे नमते घ्यायचे नि कुठे आक्रमकपणा दाखवायचा हे जाणत्या समाजसुधारकाला नेमके कळायला हवे, रामदेव बाबा इथेच कमी पडले. याबाबत समाजसेवकांनी श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ह्या गोष्टीचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गांधींना आपण खूप साधे समजत असलो तरी ते तसे नव्हते, ते अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होते. जनआंदोलन कसे सूरू करायचे, ते कसे चालवायचे नि ते थांबवायची कधी याची खूणगाठ त्यांच्या मनात पक्की होती, त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठीचा सर्वव्यापी लढा उभारण्यात नि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी ठरले. समाजसुधारकांना आणि चळवळ करणा-यांना त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

असो, झाले ते झाले. जे घडले त्याला बहुतांशी रामदेव बाबा स्वत:च जबाबदार असले तरी मन त्यामुळे उदास झाले हे खरे. बाबांचे जनमानसांमधले स्थान डळमळले, आपल्या पहिल्याच चळवळीत ते संपूर्णपणे अपयशी झाले आणि त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या भारतवर्षाचा त्यांनी भ्रमनिरास केला याची बोचणी मनात आहे नि पुढेही राहीलच!

1 comment:

  1. बाबांनी शिवाजी महाराजांचा दाखला दिला तो तर काहीच्या काही आहे. शत्रूंनी आक्रमण केले म्हणून महाराज असे वेश बदलून कधीच पळून गेले नव्हते. बाबाचा डाव पूर्णत: फसला...

    ReplyDelete