Sunday, September 25, 2011

कोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)

तिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते!

त्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.

आज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. पंधरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी तसंच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की!

No comments:

Post a Comment