Thursday, October 14, 2010

या ’बडे खॉं’ना कुणीतरी आवरा...

आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट नि विविध वाहिन्यांवर दिसणा-या जाहिराती पाहून या देशात १९६५ नंतर कुणी नविन बाळ जन्मालाच आले नाही असे एखाद्याला वाटले तर मी त्याला दोष देणार नाही. मला तरी असेच वाटते बुवा! आपली मुलगी शोभेल अशा वयाच्या तरूणीला चिठ्ठ्या पाठवणारा शाहरूख, आपल्या मित्राची धाकटी मुलगी शोभेल अशा दिपिकासोबत गाणी गाणारा सैफ आणि आपल्या तरूण मेव्हणीसारख्या दिसणा-या असीनबरोबर इष्कबाजी करणारा अमीर पाहून आणखी काय वाटावे?

म्हणजे मी या खानांच्या विरोधात नाही, एक शाहरूख खान सोडला तर बाकीच्या दोन खानांविषयी माझे मत चांगलेच आहे. अमीर खान एक चांगला, चोखंदळ अभिनेता आहे आणि सैफ अली खानचा तर मी काही वर्षांपुर्वी चक्क एक चाहता होतो. (आठवा ते 'नीला दुपट्टा पीला सूट...' गाणे) पण मला वाटते आता खरेच 'बास!' असे म्हणायची वेळ आली आहे. ह्यांना अजून किती सहन करायचे? आणि का? म्हणजे ह्या खानांचे वय वाढले याबाबत माझी तक्रार नाही. तुम्ही जन्माला आलात त्याअर्थी तुमचे वय हे वाढणारच. माझा आक्षेप आहे ह्या खानांनी तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यावर. शाहरूख खानची 'फौजी'ही मालिका आल्याला आता जवळजवळ दोन दशके होऊन गेली. तेव्हाचा नि आजचा शाहरूख यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्याचे चाहतेही मान्य करतील. कुठे तो रसरशीत चेहे-याचा शाहरूख आणि कुठे आजचा थकलेला नि डोळ्यातली चमक हरवलेला शाहरूख. त्या जाहिरातीत झोपलेल्या टिनाच्या खोलीत कागदाचे बोळे फेकताना पाहून त्याला विचारावेसे वाटते, 'काय लिहिलेयेस त्यात? टिना, उद्या माझी मुलगी तुझ्याबरोबर येणार आहे, तिला न घेता कॉलेजला जाउ नकोस हो!' हेच ना? आमीरचीही तीच गत. आठवा तो 'अंदाज अपना अपना' मधला 'आयला...' म्हणणारा कोवळा आमीर नि त्या तुलनेत आजचा 'थ्री इडियटस्'मधला निबर आमीर. आणि सैफबाबत काय म्हणावे? 'मै खिलाडी तू अनाडी'मधल्या सैफला कोवळी काकडी म्हटले तर आजच्या सैफला दुधी भोपळा म्हणावे लागेल! एका नविन जाहिरातीत दाढी वाढवलेला सैफ करिनाच्या मागे पळताना पाहून मला तर असे वाटते की एखादा गुंडच तिच्या मागे लागला आहे!

या अभिनेत्यांनी सिनेमासृष्टीत रहावे, वेगवेगळ्या भूमिकाही कराव्यात, पण आपले वाढते वय लक्षात घेता त्यांमधे बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला नको का? जीवननदी पुढेपुढे जात असताना हे अभिनेते मात्र आजही नदीकाठच्या झाडाची मुळे पकडून एकाच जागी उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, हे हास्यास्पदच नाही का? अर्थात् आपण आता तरूण राहिलो नाही हे मान्य करायला नि आपल्या भुमिकांमधे बदल करायला विलक्षण धैर्य लागते, या अभिनेत्यांकडे ते आहे का?

हे झाले या अभिनेत्यांचे वागणे, पण मी म्हणतो ह्या जाहिराती नि हे चित्रपट बनवण-यांनी तरी डोके वापरावे की नाही! हे नट काय, पैसे मिळवायलाच बसले आहेत, पण या लोकांनी त्यांना का घ्यावे? यांच्याकडे पर्याय कमी आहेत का? इम्रान हाश्मी आहे, रणबीर कपूर आहे, शाहिद कपूर आहे आणि यांपैकी कुणी तयार नसेल तर सगळ्यांचा आवडता हिमेश रेशमिया आहे, त्याला घ्या नि करा की हव्या तेवढ्या जाहिराती नि सिनेमे! पण जनतेला म्हातारचाळे आवडतात असा गैरसमज करून घेतलेल्या या लोकांना कोण समजवणार?

अरे कुणी आहे का तिकडे? जमल्यास या 'बडे खॉं'ना आवर घाला रे!

2 comments:

  1. aamir, saifu aaNi shaaharukh paravaDale paN to salloo jaam Dokyaat jaato. var tyaachaa baap mhaNato kee tyaalaa GF nako Mummy havey, .......MY FOOT

    ReplyDelete
  2. aaplya lokanna mhatare actorch khup aawadtat tyala kay aaj pasun agddi dilipkumar,rajendrekum te amithabh paryant.Ghoda kadhich Mhatara Hot Nasto baba.

    ReplyDelete