Friday, July 15, 2011

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट

बुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल? आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ज्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे?

या बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय! त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार? अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार? नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार?

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना? पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल? मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल? दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?

पण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.

1 comment:

  1. ek sangu ka? sarva murkhancha bajar ahe ! pakisthan, talibani, naksali, underwolrd,alkayda ettydi lok swata banduka , hatyyare banvat nahit hattyaranche pramukh jagtik vyavsayik amerika ahe amerika & chine sarvanna hatyare purvitat apla shatru aplyala mahit asun apli sheput madhye ghalun nirarthak charcha karto !

    ReplyDelete