Sunday, May 16, 2010

गडकरी, कुत्रे नि वाकडे शेपूट!

’मुलायमसिंग नि लालूप्रसाद हे सोनिया गांधी यांचे तळवे चाटणारे कुत्रे आहेत’ असे उदगार नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले, ते ऐकून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. दुस-याला कुत्रा म्हणणे हा शुद्ध गाढवपणा आहे अशी कोटी इथे करता येईल, पण तसे करण्याचा मोह टाळून हेच म्हणतो की गडकरींसारख्या मोठ्या पदावरच्या माणसाकडून माझी ही अपेक्षा नव्हती. गडकरी हे भाजपसारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा असे उदगार काढणे योग्य नव्हे हे ज्ञान त्यांना असणार हे नक्की, पण समोर मोठा जनसमुदाय पाहिला की मोठमोठ्या धुरिणांचा पाय घसरतो, तिथे गडकरींची काय कथा?

अर्थात भाजप या पक्षाच्या नेत्यांच्या तोंडातून त्या पक्षाला त्रासदायक ठरणारी नि अडचणीत आणणारी वक्तव्ये बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. आठवा वरूण गांधीचे ते मुस्लिमांविषयीचे उदगार किंवा अडवाणींनी केलेली महंमद अली जीनांची प्रशंसा. पण एवढे होऊनही भाजप नेते यातून काहीही शिकले नाहीत, त्यांचे वागणे अजूनही कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखेच आहे! यादव बंधू आक्रमक झालेले दिसताच गडकरी यांनी ’आपण असे म्हटलोच नाही, आपण फक्त एका म्हणीचा संदर्भ दिला होता, पण आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला.’ अशी नेहेमीची टेप वाजविली, पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. यादवद्वयींविषयी गडकरींना प्रेम नसणे मी समजू शकतो पण ते दोघेही दोन मोठ्या नि महत्वाच्या पक्षांचे सर्वेसर्वा आहेत हे विसरून कसे चालेल? गडकरींनी वापरलेली भाषा ही घरात खाजगीत बोलायची भाषा झाली, एका पक्षाध्यक्षाने हजारो लोकांसमोर व्यासपीठावर बोलायची ती भाषा नव्हे! गडकरींचे हे वक्तव्य त्यांच्या पक्षाचे मोठे नुकसान करणार यात कसलीच शंका नाही, त्याचे परिणाम आत्ता लगेच दिसणार नसले तरी ते होणार हे नक्की. या एका वक्तव्याने भाजप कुठली निवडणुका हरणार नसला तरी क्रिकेटमधे जशी एक एक धाव जास्त दिल्याने कधीकधी सामना गमवायची पाळी येते तशीच राजकारणात अशा एकेक चुका गोळा होत गेल्याने निवडणुका हरण्याची पाळी येऊ शकते हे भाजपने ध्यानात ठेवायला हवे. ज्या पक्षाचे अध्यक्ष अशी बेजबाबदार वक्त्यव्ये करतात त्या पक्षाकडून आमचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची नि सरकार जबाबदारीने चालवण्याची अपेक्षा आम्ही कशी करणार हा प्रश्न जनतेने विचारल्यास भाजपकडे त्याचे काय उत्तर असणार आहे?

आपल्या या वाक्याने नितीन गडकरी आज प्रकाशझोतात आले असले तरी अशी धक्कादायक विधाने करून खळबळ उडवून देणे ही त्यांची जुनी खोड आहे. महाराष्ट्रात असतानाही सत्ताधीशांवर बेछूट आरोप करून मोठा धुरळा उडवून देणे हा त्यांचा एक आवडता कार्यक्रम होता, पण हे आरोप विधानसभेत होत असल्याने त्यावेळी त्यांना कायद्याचे संरक्षण होते, जे आत्ता त्यांच्याकडे नाही. एक मराठी माणूस भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे मराठी जनता आनंदली असली तरी हा आनंद फारकाळ टिकणार नाही ही काळजी गडकरी यांनी घेतल्याचे दिसते. अशी वक्तव्ये करून आपण शूर असल्याचा आव आणता येत असला आणि समाजातल्या एका विशिष्ठ वर्गाला खूश करता येत असले तरी त्याचा परिणाम उलटा होतो हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केले आहे. सध्या भाजपची स्थिती नाजूक आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पूर्ण पानिपत झाले, पक्षाला केमोथेरेपी नि शस्त्रक्रियेची गरज आहे हे सरसंघचालक दस्तुरखुद्द मोहन भागवत यांनी मान्य केलेले आहे. पक्षाला पुन्हा उभे करायचे असेल तर दूरदृष्टीने आखलेल्या धोरणांची, कडक शिस्तीची, प्रचंड कष्टांची नि सा-यांना बरोबर घेऊन जाणा-या नेतृत्वाची गरज आहे. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने पक्षाचे आरोग्य सुधारणे हे पक्षाइतकेच भारतीय लोकशाहीसाठीही आवश्यक आहे हे गडकरी यांना कुणी सांगेल काय?

वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार, दिवसेंदिवस जास्त भेसूर होत असलेला दहशतवाद, माओवाद्यांचे वाढते बळ, शेतक-यांची ढासळत चाललेली स्थिती असे अनेक प्रश्न आज देशासमोर असताना राजकारणी मात्र बेताल वक्तव्ये करून नवनविन वाद उत्पन्न करत आहेत यापेक्षा लज्जास्पद बाब दुसरी कुठली असू शकते?

No comments:

Post a Comment