Friday, November 26, 2010

पुलंचे एक रटाळ पुस्तक

'पुलंचे एक रटाळ पुस्तक' हे शीर्षक वाचून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल (कदाचित चिडलाही असाल) यात काही शंका नाही. पुलं आणि रटाळ या दोन गोष्टी एका वाक्यात एकत्र येणे कदापि शक्य नाही असे त्यांच्या चाहत्यांचे मत आहे, आणि ते योग्यच आहे. पुलंचे जवळपास सगळेच लिखाण सकस आणि दर्जेदार आहे. पाट्या टाकणे हे काम पुलंनी आपल्या आयुष्यात कधीही केले नाही आणि त्यांची पुस्तके वाचतानाच काय, त्यांची भाषणे ऐकताना आणि त्यांचे एकपात्री प्रयोग पाहतानाही याची खात्री पटते. त्यामुळेच मी पुलंचा मोठा पंखा आहे आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची मी पारायणे केली आहेत.

असे असले तरी पुलंचे अगदी झाडून सगळे लिखाण उत्तम आहे असे म्हणणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करण्यासारखे ठरेल. कुठल्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच केले जायला हवे. ते करताना त्या साहित्यकृतीचा जनक कोण, त्याचे साहित्यातील योगदान काय या बाबी विचारात घेतल्या जाता कामा नयेत. पुलंचे सुरुवातीचे लेखन पाहिले की माझ्या विधानाची खात्री पटावी. पुलंच्या नंतरच्या लिखाणात दिसणारा सफाईदारपणा, सहजता, सराईतपणा त्यात नाही. अर्थात, हे साहजिकच आहे. लेखक हा शेवटी एक माणूसच, तोही प्रत्येक दिवसागणिक घडत, शिकत असतो. पण असे असले तरी त्यांच्या चाहत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. एखादी साहित्यकृती सामान्य दर्जाची म्हटली म्हणून तिचा लेखक सामान्य ठरला असे नाही. (आणि लेखक महान असला म्हणजे त्याची प्रत्येक साहित्यकृती महान असलीच पाहिजे असेही नाही!)

आता पुन्हा एकदा वळूयात या लेखाच्या विषयाकडे - तो म्हणजे पुलंचे 'खोगीरभरती' हे पुस्तक. 'खोगीरभरती' हे पुलंचे दुसरे पुस्तक. 'तुका म्हणे आता' या नाटकानंतर आलेले हे पुस्तक त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अगदी सुरुवातीला लिहिलेले आहे. पुस्तकात एकूण १७ लेख आहेत, त्यातली ४ भाषणे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे पुलंचे हे लिखाण त्यांचे सुरुवातीचे लिखाण आहे. एका नव्या लेखकाचा अननुभवीपणा त्यात अगदी स्पष्ट दिसतो. पुलं ज्या विनोदासाठी ओळखले जातात तो सहज नि स्वाभाविक विनोद या पुस्तकात जवळपास नाहीच असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. या पुस्तकातले सगळेच विनोद हे अगदी ओढूनताणून केल्यासारखे वाटतात. एका होतकरू लेखकाची छाप या पुस्तकातल्या प्रत्येक लेखावर अगदी स्पष्ट दिसते. 'नाटक कसे बसवतात' आणि 'पानवाला' हे लेख सोडले तर बाकीचे सगळे लेख हे काही सांगण्यासारखे किंवा लिहिण्यासारखे आहे या कारणापेक्षा एक विनोदी लेख लिहायचा म्हणूनच लिहिल्यासारखे वाटतात.

तसे असेल तर असो! पण या लेखाचा उद्देश काय हा प्रश्न उरतोच – 'पुलंच्या एका पुस्तकातले दोष दाखवणे' हा? नाही, उद्देश आहे 'अपयशाने खचून न जाता नेटाने पुढे जात रहावे' हा संदेश वाचकांना देणे. मला वाटते हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. काम कुठलेही असो, दर वेळी त्यात यश मिळेलच असे नाही, आपण प्रयत्न करीत राहणे महत्वाचे. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तरीही निराश न होता 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करीत रहायला हवे. आपल्या भाईकाकांनी हेच केले. आपले पहिले नाटक पडले आणि दुसरे पुस्तकही लोकांना फारसे आवडले नाही हे दिसूत असूनही त्यांनी नेटाने आपले काम सुरुच ठेवले. 'कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा मात्र लोकांना हसवण्याचा धंदा' हे पुलंच्या जगण्याचे सूत्र होते नि त्यांनी ते आयुष्यभर कसोशीने पाळले. अर्थात विनोदी लेखक एवढीच पुलंची ओळख नाही, जीवन म्हणजे काय आणि ते त्याची गोडी चाखत कसे जगावे हे त्यांनीच आपल्याला सांगितले. आपल्याला खाण्यावर, गाण्यावर, सुंदर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं ते त्यांनीच. एकूणच आयुष्य रसिकतेने कसं जगावं हे आपल्याला दाखवून दिलं ते त्यांनीच.

'खोगीरभरती'सारखे पुस्तक लिहिणा-या या पुलंनीच पुढे 'बटाट्याची चाळ', 'खिल्ली', 'उरलंसुरलं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अजरामर पुस्तके आणि 'तुझे आहे तुजपाशी','ती फुलराणी' यांसारखी नाटके लिहून मराठीजनांना वेडे केले हे लक्षात घेतले तर आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे!

3 comments:

  1. हया लेखाचा उद्देश कळल्यावर लेख आवडला...

    ReplyDelete
  2. मित्रा ,तुझे लिखाण आवडले .

    मला तुझा ब्लॉग ब्लॉग इट मध्ये घ्यायला आवडेल .

    मात्र ,तुझा इमेल आयडी मला सापडला नाही .

    मला माझ्या या आय डी वर संपर्क साधणार का ? तुझ्याशी बोलायची खुप इच्छा आहे ..
    vinayak@rangakarmi.com
    vinayakpachalag@gmail.com

    ReplyDelete
  3. Kharr ahe tuz...
    Khogirbharati vachlyavar mala he lakshat aalel pan man manayla tayar navat.

    ReplyDelete