Friday, December 17, 2010

कलावंतीण किल्ल्यावर कब्जा

हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी एकही गडसहल न झाल्याने मी बेचैन झालो होतो. हे सगळे वर्षच तसे सुनेसुने गेले होते. आमच्या मित्रमंडळींची कहाणी काय सांगावी? आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशी त्यांची स्थिती. यावेळी हा यायला तयार तर दुस-याला काहीतरी काम, पुढच्या आठवड्यात तो यायला तयार तर पहिल्याचा नकार! माझ्या सात आकडी पगार मिळवणा-या एका मित्राचे बहाणे ऐकून तर मनमोहनसिंग साहेबांसोबत एखाद्यावेळी किल्ल्यावर जाणे होईल पण याच्याबरोबर नाही असे मला पक्के वाटू लागले होते. तेव्हा मित्रांचा नाद सोडला आणि मामेभावाला पकडले. १२ डिसेंबरची तारीख नक्की केली आणि किल्लाही - पनवेलजवळचा देखणा 'कलावंतीण'.

पहाटे सहा वाजता घराबाहेर पडायचे असे आम्ही ठरवले होते खरे, पण एवढी कडाक्याची थंडी असल्यावर ते जमणार कसे? पाण्याची बाटली, कॅमेरा, जॅम आणि ब्रेड मोठ्या सॅकमधे टाकून आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा घड्याळात बरोबर ०६:४० होत होते. डोक्याला हेल्मेट, अंगात स्वेटर, जाड जीन्स, हातमोजे आणि पायात बूट असा जामानिमा असूनही थंडी सुयांसारखी शरीराला अगदी टोचत होती. त्यातच सकाळी रस्ता मोकळा असल्यामुळे आम्ही गाडी भरधाव सोडलेली. तळेगाव, लोणावळा, खोपोली गावं पटापटा मागे पडली. गाडी शंभरने मारल्यामुळे पनवेल टोलनाक्यापुढच्या शेदुंग फाट्याला (अंतर ११५ कि.मी.) आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला घरातून निघून फक्त एक तास पंचेचाळीस मिनिटं झाली होती. बहुतेक वाहने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करत असल्याने जुन्या पुणे मुंबई रस्त्याला आता फारशी गर्दी नसते. त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंद अगदी वारेमाप घेता येतो. अर्थात रस्त्याची स्थिती फारशी चांगली नाही हे मात्र खरे.

शेदुंग फाट्यावरून आम्ही आत शिरलो आणि एका छोट्या डांबरी रस्त्याने आत जात ठाकूरवाडीला पोचलो. सदरचा रस्ता खाजगी आहे अशी माहिती एक फलक देत असला तरी आत जाताना आम्हाला कुणीच अडवले नाही. साधारण ५ कि.मी आत गेल्यावर आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली गाडी लावली. आता प्रश्न आला हेल्मेटचा! हे एवढे जड शिरस्त्राण आख्ख्या गडचढाईत हातात बाळगायला काहीच अर्थ नव्हता; तेव्हा आजूबाजूला कोणी नाही हे पाहून आम्ही ते शेजारील गवतात दडवले आणि गडाच्या दिशेने कूच केले. [पहा, आयटीत काम केले की अशा कल्पना सुचतात - उगाच नाही लोक आम्हाला हुशार समजत!] गड सोपा दिसत असला तरी तो तसा नाही हे चढायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आम्हाला कळले. किंबहुना हे सोपे दिसणारे गडच प्रत्यक्षात जास्त त्रास देतात!

नऊला आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि साधारण दीड तासात वरच्या ठाकूरवाडीला पोचलो. २०/२५ घरांचे हे एक लहानसे गाव आहे. इथल्याच एका घरात जेवणाची सोय आहे. जाताना इथे जेवण बनवायला सांगून जावे आणि किल्ला पाहून खाली आलो की त्याचा आस्वाद घ्यावा अशी चांगली सोय गडप्रेमींसाठी आहे. पण आमचे जेवण बरोबर असल्याने आम्ही काही इथे जेवणार नव्हतो. ठाकूरवाडीतील काही लोकांना कलावंतीणचा रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो आणि साधारण अर्ध्या तासात गडाच्या पाय-या जिथे सुरू होतात तिथे येऊन पोचलो.

कलावंतीण किल्ल्याच्या या पाय-यांचे फोटो मी आंतरजालावर आधीच पाहिले होते, प्रत्यक्षात मात्र त्या अधिकच भितीदायक दिसत होत्या. काही तर चक्क दोन फुट उंचीच्या होत्या. पण ज्या कुणी या पाय-या बनवल्या त्यांचे धन्यवाद द्यायला हवेत; त्यांच्याशिवाय या सरळसोट गडावर चढणे अशक्य बनले असते. थांबत चालत आम्ही या पाय-या पार केल्या नि एकदाचे वर पोचलो. एवढा अवघड किल्ला चढून वर आलो तेव्हा काहीतरी सुंदर पहायला मिळेल असे आम्हाला वाटत होते खास, पण इथे आल्यावर आमची निराशा झाली. किल्यावर पहायला काहीच नाही, अगदी पडके टाके किंवा मोडकळीस आलेली तटबंदीदेखील. किल्ल्याचा विस्तार तसा फार छोटा आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक भलामोठा दगडी सुळका आहे. थोडी कसरत करून आम्ही इथे चढलो, तेव्हा मात्र एवढ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

कडेचा प्रबळगड सोडला तर आजूबाजूची सगळी शिखरे आमच्यापेक्षा उंचीने कमी होती; त्यामुळे अगदी लांबलांबपर्यंतचा परिसर वरून स्पष्ट दिसत होता. गडावर फारसे बांधकाम का नाही या प्रश्नाचे उत्तर आत्ता आम्हाला मिळाले; फक्त टेहेळणीच्या कामासाठीच या किल्ल्याचा वापर होत असावा. वर असाच थोडा वेळ घालवल्यावर आम्ही काही फोटो काढले. (माउंट एवरेस्टवर गेलेले गिर्यारोहक जसे आपल्या दाव्याच्या पुष्टतेसाठी काढतात तसे. काय करणार? आमच्या मित्रमंडळींमधे काही खवट लोक आहेत हो...) वर पहायला काही नव्हते आणि जेवणासाठी सावलीही. तेव्हा आम्ही ठाकूरवाडीतच जेवण करायचा निर्णय घेतला आणि खाली उतरायला सुरूवात केली. ठाकूरवाडीत एका घराच्या पडवीत आम्ही ब्रेड-जॅम फस्त केला आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुन्हा रपेट सुरू केली. उतरणे एकदम सोपे होते, पाऊण तासात आम्ही खाली पोचलोही. नशिबाने आमचे शिरस्त्राण आम्ही सोडले तिथेच होते. घरी परतताना गाड्यांची प्रचंड गर्दी हा आमचा नेहमीचा अनुभव, पण यावेळी आम्ही अडीचलाच परतीचा रस्ता धरल्याने ती अडचण नव्हती. थकून भागून आम्ही घरी पोचलो तेव्हा घड्याळात फक्त सव्वाचार होत होते!

गड सर करून घरी पोचल्यावर सोफ्यावर बसून आल्याचा गरमागरम चहा घेण्याचा आनंद काय वर्णावा? चहाचे घुटके घेताना यावेळी तर दुहेरी समाधान आमच्या मनात होते; खूप दिवस हुलकावण्या देणारा कलावंतीण पाहिल्याचे एक आणि हा रविवार वांझ गेला नाही हे दुसरे!

3 comments:

  1. चांगले लिहिले आहेस.. पण कलावंतीण हा गड नव्हे तर फक्त सुळका आहे. कलावंतीण नावाचा गड ज्याला 'पदरगड' देखील म्हणतात तो भीमाशंकरच्या बाजूला आहे...

    मी गेलो होतो तेंव्हाचा वृतांत इथे आहे... बघ जमले तर ... http://mazisahyabhramanti.blogspot.com/2009/02/blog-post_19.html

    ReplyDelete
  2. chaan lihile ahes,asech lihit ja Best luck

    ReplyDelete