Tuesday, March 8, 2011

महाराष्ट्रातल्या राजकीय कोलांट्याउड्या

नेहमी एकमेकांना लोळवणा-या नि एकमेकांना धोबीपछाड देणा-या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा आवडता खेळ कुस्ती असला पाहिजे असा माझा कालपर्यंत समज होता; पण राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, मनसे यांनी पुण्यात आणि शिवसेनेने ठाण्यात नुकत्याच मारलेल्या कोलांट्याउड्या पाहून मात्र माझा हा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे!

पुणे महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक नुकतीच झाली. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सगळीकडे हिंडणा-या काँग्रेस नि राष्ट्रवादी काँग्रेस या जोडीत का कोण जाणे, यावेळी मात्र काहीतरी बिनसले आणि भाजपाने राष्ट्रवादीला डोळा मारून मनसेशी चुम्माचाटी करत अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. जे झाले ते तर मजेदार होतेच, पण नंतर यावर राजकीय पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अधिक मनोरंजक होत्या. काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली आणि शिवसेनेने भाजपावर. 'लोकनेते' गोपीनाथ मुंडे यांनी 'ही युती फक्त पुण्यापुरती आहे' असे म्हणून तिचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे ते विधान एखाद्या लफडेबाज नव-याने 'ति'चे नि माझे लफडे फक्त तिच्या घरापुरतेच मर्यादित आहे असे म्हणून स्वतःचे समर्थन करण्याइतकेच हास्यास्पद होते. राष्ट्रवादीचे काय सांगावे? सत्तेसाठी कुणाबरोबरही जाण्यात आम्हाला ना नाही हे त्यांनी पुन्हापुन्हा सिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांच्याबरोबर शरद पवार यांचे झळकलेले फोटो हे याचे एक उत्तम उदाहरण. सत्तेसाठी हा पक्ष उद्या ओसामा बिन लादेन किंवा दाऊद इब्राहीमच्या पक्षाशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही हे नक्की.

मनसेचे वागणे त्यांच्या खंद्या पाठीराख्यांना अस्वस्थ करून गेले हे मात्र खरे. शेवटी काय, बोलायच्या गोष्टी वेगळ्या नि करायच्या वेगळ्या हे कसलेल्या राज्यकर्त्यांचे धोरण राज ठाकरेंनीही अवलंबलेच. आजकाल त्यांचा प्रवास पाहता ते हळूहळू एक मुरब्बी राजकारणी बनत चालले आहेत म्हणावे लागते आहे, पण ते खेदाने. सगळ्यात मोठे हसे झाले ते काँग्रेसचे आणि यात काहीच नवे नाही. आपण एक प्रचंड मोठा इतिहास असलेला एक अतिशय नितिमान पक्ष आहोत असा दिखावा करत हा पक्ष वागतो खरे, पण शेवटी त्याला नेहमीच तोंडावर पडायची वेळ येते; ही वेळही त्याला अपवाद नव्हती.

दुसरी घटना ठाण्याची. तिथे नुकतीच शिवसेनेने मुस्लिम महासंघ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा अबू आझमींकडून मराठी महासंघाची किंवा कलमाडींकडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाची घोषणा होण्याइतकीच धक्कादायक होती. पण बारकाईने पाहिले तर शिवसेनेचा इतिहासच अशा घटनांनी भरलेला दिसतो. शिवसेनेने सुरुवात केली मराठीच्या मुद्दयावर. 'लुंगी हटाव, पुंगी बजाव' असे म्हणत त्यांनी दक्षिण भारतीयांविरुद्द शस्त्रे परजली. नंतर त्यांचा रोख वळला तो उत्तर भारतीयांकडे. त्यापश्चात्, का कोण जाणे त्यांनी मराठीचा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आणि दक्षिणच काय उत्तर भारतीयांनाही आपल्या पक्षात सामील करून घेतले. (आठवा ते संजय निरुपम यांच्या कार्यालयाचे स्वतः बाळासाहेबांनी केलेले उद्घाटन.) पाकिस्तान नि भारतीय मुस्लिमांवर टीका करणे हा त्यावेळी त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. आता हिंदुत्वाचाही मुद्दा त्यांनी सोडला असावा, त्याशिवाय त्यांनी मुस्लिम महासंघाची स्थापना केली नसती. काही दिवसांनी त्यांनी परवेझ मुशर्रफांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली तरी आश्चर्य वाटायला नको.

म्हणजे मुस्लिमांसाठी महासंघ बनवण्यात काही गैर आहे असे नव्हे; भारतीय मुस्लिम आजही सामाजिक/आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि एका पक्षाने (राजकीय स्वार्थ मनात ठेवूनही) त्यांच्यासाठी काही चांगले काम केले तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. माझा आक्षेप आहे शिवसेनेच्या वागण्यावर. परदेशी संस्कृतीला नावे ठेवत असताना मायकल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करणे आणि फक्त वॅलेंटाईन डेची शुभेच्छापत्रे विक्रीस ठेवली म्हणून मराठी दुकानदारांची दुकाने फोडणे ही कामे केली शिवसेनेनेच. काहीही कारण नसताना एखाद्या समूहाला वर्षानुवर्षे शिव्या द्यायच्या नि एके दिवशी अचानक आपली भूमिका गुंडाळून त्यांच्याविषयी काळजीचा आव आणायचा यामुळे आपण हास्यास्पद दिसतो नि विनोदाचा विषय होतो हे शिवसेनेला कधी कळणार? शिवाय आपण असेच वागत राहिलो तर आपल्याला शिवीगाळ करण्यासाठी 'शत्रू'च उरणार नाहीत हे शिवसेनेने समजून घ्यायला हवे. म्हणजे आता शिव्या देणार कोणाला, फक्त मनसेला? त्या ऐकून आम्हाला आधीच कंटाळा आलाय हो!

असो, पण राजकीय पक्ष या कोलांट्याउड्या मारत असताना महाराष्ट्रातली जनता काय करते आहे? ती धुंद झाली आहे क्रिकेट पहाण्यात. देवा, या महाराष्ट्राचे कसे होणार? मला त्याची मोठीच काळजी लागून राहिली आहे रे!

1 comment:

  1. मुस्लिम महासंघ हा बहुधा मुस्लिमाना आपल्या जमातीपलीकडे पाहण्यास लावण्याचा प्रयत्न असावा. कॉंग्रेसच्या मापाने तो मोजला जाऊ नये.

    ReplyDelete