Thursday, July 7, 2011

हे सारे अद्भुत आहे!

'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे!' असे वाटून मी आजही अचंबित होतो.

उदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तविक ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही? हे सगळे कसे होत असेल? आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल? इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल? दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल? मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल?

पण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.

सध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चालायलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे!

2 comments:

  1. Absolutely. There is a famous statement by Fymen,

    http://dialogic.blogspot.com/2004/11/richard-feynman-i-wonder-why-i-wonder.html

    तर मित्र जग फार भारी आहे, आणि आपण फार चिल्लर. अरभात फार कमी लोक आहेत,:).

    ReplyDelete
  2. लेख मस्तच ...
    पण हि कमेंट म्हणजे सुभानल्लाह
    "तर मित्र जग फार भारी आहे, आणि आपण फार चिल्लर. अरभात फार कमी लोक आहेत"

    ReplyDelete