Saturday, June 18, 2011

का? ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात?

कधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.

ही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी! कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र(?) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल? ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय?

लग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय?

ही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील? हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे?

10 comments:

  1. बरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते...सरकारने तरी हे नियम बंद करायला हवेत आणि समाजानेही...

    ReplyDelete
  2. Bang on!

    मी पण बर्‍याच वेळा अशी स्वच्छ लिहिलेली "तळटीप" पाहिलेली आहे, आणि असा विचार करणारी माणसं आणि त्यांचे ते सो कॉल्ड "उच्च" दर्जाचे प्रोफाइल्स कधीच कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यावेसे वाटलेले.

    सुरेख लिहिलंय. आपला स्पष्टवक्तेपणा आवडला.

    ReplyDelete
  3. यामागे सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये असा विचार असणे शक्य आहे.

    ReplyDelete
  4. बरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते... >>> मग त्या वेळेस कुठे जाते याची "माणुसकी"?? आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का?? त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का???? स्वत:ला हे लोक उच्च जातीचे समजतात तर हे आरक्षण घेणे बंद करा.. तेव्हा यांनाच स्वत:ला मागास म्हणवून घेण्यात काय अभिमान वाटतो.... नोकरी मिळवतांना... शाळा कॉलेजात प्रवेश मिळवतांना... फी मध्ये परवडत असतांनाही केवळ जातीची आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना ह्यांना लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून यांची मान खाली जाते किंवा यांच्या भावना दुखावल्या जातात यावर माझा तरी विश्वास नाही...

    ReplyDelete
  5. पण आधी हा प्रकार किती घाणेरडा असयाचा पियू.. आनि अजूनही काही गावात हा प्रकार चालतो .. कमी जतीतिल मानस एका श्रेष्ट(माहित नाही श्रीमंतीने असतील) जतितल्या घरी गेली की त्यांच्या वर थुंकणे का प्रकार कमी नाहीय.. आणि या आरक्षणा पेक्षा हा प्रकार महा भयंकर आहे.. यात प्रकारात कोण मागासलेले आहे ते दिसून येते..कुठे जाते माणुसकी??
    *आता यांना आरक्षण मिळाल्यावर यांना माणुसकी आठवायला लागली..जेव्हा स्वतः वर आले तेव्हा जाणवली माणुसकी..*

    ReplyDelete
  6. ज्याची कुणाची ऐपत असून देखील ते केवळ कागदी घोडे नाचउन सवलती लाटतात. आणि ज्यांची परस्थिती नसून देखील ते केवळ वरिष्ठ जातीतील आहेत ह्या कारणास्तव त्याला त्या सवलती पासून वंचित राहावे लागते. एखाद्याची त्याला हवे असलेले शिक्षण घेण्याची प्रबळ ईच्छ्या असून देखील त्याला त्याचा मार्ग बदलावा लागतो केवळ या आरक्षणं मुळे...

    ReplyDelete
  7. टिप्पण्या वाचल्या. खरे सांगायचे झाले तर त्या धक्कादायक वाटल्या. लेखात म्हटल्याप्रमाणे "जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी 'मंजिल अभी बहोत दूर है' असा झटका मला अचानक मिळतो." हेच खरे. आरक्षणाचा आवडता मुद्दा इथे ओढून आणण्याचा नि ते तसे आहे म्हणून हे असे असले तर काय बिघडले असा एक युक्तिवाद इथे होताना दिसला, तो हास्यास्पद आहे.

    असो, आता प्रत्येकाच्या प्रतिक्रियेवर प्रतिप्रतिक्रिया (आयला, भारी शब्द आहे नै?) देतो.

    Sagar Kokne said...
    बरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते...सरकारने तरी हे नियम बंद करायला हवेत आणि समाजानेही...

    सागर, आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची इथे गल्लत नको. जे चुकीचे आहे त्याला चुकीचे म्हणा. अमकी एक गोष्ट अशी आहे म्हणून तमकी गोष्ट अशीच असणार, असे म्हणण्यात काय अर्थ आहे?

    sharayu said...
    यामागे सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये असा विचार असणे शक्य आहे.

    शरयू, आपला हा युक्तिवाद वाचून मी हतबुद्ध झालो. भांडारकर संस्थेवर हल्ला केल्यावर संभाजी ब्रिगेडने आपल्या कृत्यांचे असेच कुठलेतरी शौर्य गाजवल्यासारखे समर्थन केले होते त्याची आठवण झाली. उच्चवर्णीय लोक ही तळटीप टाकताना 'सवलतीच्या आधारावर आपल्या मुलानी उभे राहू नये' असा विचार करत असावेत हा शोध लावल्याबद्दल आपल्याला नोबेल पारितोषिक मिळण्याची शिफारस का करू नये? पण आपल्या युक्तिवादात काही ढोबळ चुका आहेत. माझा प्रश्न आहे ही तळटीप टाकण्यावर. जर ह्या उच्चवर्णीयांना 'एस. सी./एस.टी.' लोकांशी 'आपल्या मुलांनी सवलतीच्या कुबड्या घेऊ नयेत' ह्या विचारामुळे लग्न करायचे नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण ह्याची जाहिरात करण्याची गरज काय? आणि शरयू ताई, 'एस. सी./एस.टी.' लोकांशी लग्न करूनही ह्या उच्चवर्णीयांची मुले खुल्या प्रवर्गात शिकू शकतातच की. उच्चवर्णीयांनी 'एस. सी./एस.टी.' लोकांशी लग्न करून नंतर आपल्या अपत्यांना खुल्या प्रवर्गात ढकलावे (आणि सवलतीच्या आधारावर आपली मुले उभी नाहीत याचे सुख मिळवावे.) तुम्ही 'एस. सी./एस.टी.' असलात की सवलती वापरायलाच हव्यात असा सरकारचा नियम थोडाच आहे?


    पियू परी :) said...
    बरोबर...कॉलेजला किंवा नोकरीमध्ये सुद्धा जातीला प्राधान्य दिले जाते हे फार खटकते... >>> मग त्या वेळेस कुठे जाते याची "माणुसकी"?? आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील अश्या लोकांसाठी जातींची आरक्षणे ठेवतात तेव्हा सर्वसामान्य जातीतील मुलांवर किती अन्याय होतो तेव्हा हा प्रश्न मनात येत नाही का.. कि इतर जातीचे विद्यार्थी काय विद्यार्थी नाहीत का?? त्यांनी मार्क मिळवायला कमी मेहनत केली आहे का???? स्वत:ला हे लोक उच्च जातीचे समजतात तर हे आरक्षण घेणे बंद करा.. तेव्हा यांनाच स्वत:ला मागास म्हणवून घेण्यात काय अभिमान वाटतो.... नोकरी मिळवतांना... शाळा कॉलेजात प्रवेश मिळवतांना... फी मध्ये परवडत असतांनाही केवळ जातीची आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना ह्यांना लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून यांची मान खाली जाते किंवा यांच्या भावना दुखावल्या जातात यावर माझा तरी विश्वास नाही...

    पियू परी, रागावू नका, पण आपले नाव जरी परी असले तरी आपले बोलणे मात्र चेटकीणीसारखे आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्या प्रतिक्रिया विनोदी आहेत पण तरीही मी त्यांना उत्तर देतो आहे.
    'आरक्षण तुम्हाला आवडते तर हेही आवडून घ्या' असे तुम्ही म्हणता, तुमचा हा युक्तिवाद संभाजी ब्रिगेडसारखाच आहे. 'ब्राह्मणांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार केले, म्हणून आम्ही त्यांना धडा शिकवणारच' असे ते म्हणतात, तर 'जातीच्या आधारावर सवलतीसाठी अर्ज करतांना तुम्हाला लाज वाटत नाही... मग केवळ वधू-वर च्या जाहिराती वाचून तुमच्या भावना का दुखावल्या जाव्यात' असे तुम्ही म्हणता. मग तुमच्यात नि संभाजी ब्रिगेडमधे फरक काय? त्याने गाय मारली तर मी वासरू मारतो असे तुम्ही दोघेही म्हणता, मग तुम्ही दोघेही समाजकंटक आहात असे मी म्हटले तर त्यात काय चुकीचे असेल? जे चूक आहे त्याला चूक म्हणावे असे मी म्हणतो. हे जे घडते आहे ते चूक आहे हे तुम्ही मान्य करता का? आणि जर करत असाल तर तसे म्हणण्याचे धारिष्ट्य का दाखवत नाही? आरक्षणाचा मुद्दा आहेच, त्यावर जरूर चर्चा करूया, पण सध्या ज्या मुद्यावर आपण बोलतो आहेत, त्यावरच बोला, मुद्दा भरकटवता कशाला?

    ReplyDelete
  8. पीयू परी ह्या कोणत्या मानसिकतेच्या आहेत?? ह्याला मुद्दा भरकटवणे म्हणतात.

    ReplyDelete
  9. काही लोकांना नसेल आवडत त्या जातीशी संबंध जोड्णे, तो त्यांचा वॅयक्तिक प्रश्न आहे..

    ReplyDelete