Sunday, February 27, 2011

जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते?

सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी "मराठी" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल? पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून!

सर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही? आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात? त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही?

इंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल? लहान मुलाला झोपताना "निंबोणीच्या झाडामागे" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची "कणा" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची "श्रावणमासी, हर्ष मानसी" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही?

पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.

१) मराठीचा वापर करा. पण कुठे? शक्य असेल तिथे तिथे! दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.

२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.

३) मराठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणा-या नि वर त्याचे समर्थन करणा-यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता? इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का?

४) अमराठी सहका-यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.

चला तर मग! भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया!

Saturday, February 19, 2011

कवडी गावाला भेट

मागच्या महिन्यात तेवीस तारखेला कवडीला जाऊन आलो, पण वेळ न मिळाल्याने त्यावर लिहिणे किंवा फोटो टाकणे जमले नव्हते. आता किंचीत सवड मिळाल्यावर हे काम करतो आहे.

कवडी अर्थात् कवडीपाट हे पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण १५ किमी दूर असे एक लहानसे गाव आहे. सोलापूर रस्त्यावर पहिला टोलनाका पार केला की अगदी लगेच डावीकडे एक रस्ता जातो तो पकडावा, साधारण ३/४ किमी पुढे जावे (इथे एक रेल्वे फाटकही लागते) की कवडी गाव आलेच. गावातून वाहणारी नदी नि त्यावरचा बंधारा ही अनेक प्रकारच्या पक्षांची आवडती जागा दिसते. स्थानिक आणि स्थलांतरित अशा सुमारे १५ जातींचे पक्षी आम्हाला इथे पहाता आले.

अनेक पक्षांचा वावर असला तरी कवडीची स्थिती अतिशय वेदनादायक आहे हे नक्की. पाण्यातून वाहत येणारी प्रचंड घाण (पुणेकरांनो, आपण कधी सुधारणार?), पाण्यावर तरंगणारी जलपर्णी, त्यावर पसरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हे दृश्य मन अक्षरश: सुन्न करते. त्यातच अस्वच्छता फैलावण्याच्या कामात आम्ही मुळीच मागे नाही असे म्हणत कवडीवासीही थर्माकोलची ताटे, कचरा टाकून या कामात आपला हातभार लावताना दिसतात. पण असे असूनही या अस्वच्छतेतच जलक्रीडा करणा-या पक्षांना पाहिल्यावर एक प्रजाती म्हणून आपली लाज वाटल्याशिवाय रहात नाही!

असो, तर कवडीला दिसलेल्या पक्ष्यांचे हे फोटो. हे सारे कॅनॉन १०००डी आणि कॅनॉन ४०० एम एम ५.६ लेन्स या जोडीने काढले आहेत.

Tuesday, February 15, 2011

डीएसेलार कॅमेरे - काही गैरसमज

डिजीटल कॅमे-यांचे कमी झालेले भाव, त्यांमधे आलेला सुटसुटीतपणा आणि त्यांच्याभोवती असलेले वलय यामुळे आजकाल अनेक जण त्याची खरेदी करताना दिसतात. हे कॅमेरे - जी काही वर्षांपुर्वीपर्यंत फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांची ओळख होती - आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने हौशी छायाचित्रकारांनाही आपले कौशल्य दाखवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ह्याच कॅमे-यांची एक ओळख करून देण्यासाठी आणि त्यांबाबतचे काही गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख!

डीएसेलार कॅमे-यांबाबत लोकांमधे असलेल्या समजुती थक्क करणा-या आहेत. फक्त व्यावसायिक लोकांनी वापरायचा हा एक भयंकर अवघड प्रकार आहे, हा वापरला की कुठलाही फोटो हमखास 'भारी' येतो ते हा उशाखाली घेऊन झोपला की अमावस्येच्या रात्री गुप्तधन पुरलेली जागा दिसते अशा अनेक समजुती लोकांच्या मनात आहेत. दुर्दैवाने (की सुदैवाने) त्या सा-या चुकीच्या आहेत.

पाहूया काही प्रमुख गैरसमजुतींकडे.

१) डीएसेलार कॅमेरा जेवढा महाग, त्यातून येणारी छायाचित्रे तेवढी भारी!

चूक. डीएसेलार कॅमेरा ही काही जादूची कांडी नव्हे की जी फिरवली की तुम्ही अंशुल अडुमसेचे अॅन्सल अॅडम्स [http://en.wikipedia.org/wiki/Ansel_Adams] व्हाल. कॅनन ५ डी मार्क दोन + कॅनन १६-३५ एम एम ही जोडी वापरून तुम्ही खराब फोटो काढू शकता आणि कॅननचाच ए ४९५ हा चिमुकला कॅमेरा वापरून अप्रतिम फोटो! फोटो कसा निघणार हे कॅमे-यापेक्षा त्यामागे कोण आहे यावर जास्त अवलंबून असतं. यावरून मी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी ओळी आठवतात, त्यांचा साधारण तजुर्मा असा.

उत्तम निबंध, कुठला टाईपरायटर वापरलात तुम्ही?
उत्तम पदार्थ, कुठला तवा वापरलात तुम्ही?
उत्तम फोटो, कुठला कॅमेरा वापरलात तुम्ही?

२) डीएसेलार कॅमेरे वापरायला अवघड आहेत.

चूक. डीएसेलार कॅमेरे वापरणे दिवसेंदिवस सोपे होत आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे एखादी वस्तू खपण्यासाठी ती वस्तू वापरण्यास सोपी असावी या मुद्द्याला आलेले महत्व आणि सर्वसामान्य जनताही डीएसेलार कॅमेरे वापरू लागली आहे ही निर्मात्या कंपन्यांना झालेली जाणीव. आजचे डीएसेलार कॅमेरे पुर्वीच्या डीएसेलार कॅमे-यांपेक्षा खूप सोपे आहेत. किंबहुना ते वापरणे, बाजारात आलेला एखादा नविन भ्रमणध्वनी वापरण्याइतकेच सोपे आहे.

३) डीएसेलार कॅमेरा छायाचित्रण स्वस्त होत आहे.

चूक. डीएसेलार कॅमेरे आज जरी स्वस्त झाले असले तरी त्यांबरोबर वापरायच्या लेन्सेसचे भाव मात्र कमी झालेले नाहीत. विशेषतः चांगल्या दर्जाच्या लेन्सेसचे. डीएसेलार कॅमेरा वापरून होणा-या छायाचित्रणात कॅमेरा ही एक प्राथमिक गुंतवणूक असते, मोठा खर्च होतो तो लेन्सेसवर. आणि लेन्सेसचे व्यसन वाईट, एकवेळ गर्दचे व्यसन सुटेल पण लेन्सेसचे व्यसन सुटणे महाकठीण. माझेच उदाहरण सांगतो, मी आज सहज हिशोब केला तेव्हा असे दिसले की माझ्या एकूण छायाचित्रण संचाची किंमत चक्क दीड लाख आहे आणि यातला कॅमेरा आहे फक्त १४ हजारांचा.

४) डीएसेलार कॅमेरा माझ्यासाठी आहे.

चूक. स्पष्ट सांगायचे झाले तर, आपल्या 'बंटी'चे 'फॅन्सी ड्रेस स्पर्धे'तले फोटो काढण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे सारसबागेत फोटो काढण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमात (कार्यक्रमाकडे लक्ष न देता) कचाकचा फ्लॅश मारून लोकांना वैताग देण्यासाठी जर तुम्ही तुमच्या कॅमे-याचा वापर करत असाल तर डीएसेलार कॅमेरा तुमच्यासाठी नव्हे. पण जर तुम्हाला छायाचित्रण कलेची आवड असेल, ती शिकण्याची इच्छा असेल, चांगला फोटो कशाला म्हणावे हे जर तुम्हाला कळत असेल तर मात्र छायाचित्रणासाठी डीएसेलार कॅमे-यासारखा दुसरा पर्याय नाही!

तुमची छायाचित्रण कलेची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Monday, February 14, 2011

रामगणेशगडकरी.कॉम - एक नवे सुंदर मराठी संकेतस्थळ

राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य महाजालावर उपलब्ध करून देणा-या रामगणेशगडकरी.कॉम या संकेतस्थळाविषयी नुकतेच मनोगतावर [http://www.manogat.com/node/21505] वाचले आणि एखाद्या तहानलेल्या माणसाला अचानक शीतल, नितळ पाण्याचा झरा समोर दिसावा तसे वाटले. गडक-यांची नाटके आणि (त्याहून अधिक) त्यांचे विनोदी लेखन मी गेले कित्येक दिवस शोधत होतो; ते असे अचानक पुढे आल्यावर झालेला आनंद कसा सांगावा! मराठी संकेतस्थळांमधील उत्कृष्ट संकेतस्थळांमधे या संकेतस्थळाची गणना करता येईल यात काय शंका?

ऐरोळी, नवी मुंबई येथील संगणक प्रकाशनाने तयार केलेल्या या संकेतस्थळावर गडकरींचे सारे साहित्य आहे. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन यांसारखी गडक-यांची गाजलेली नाटके, त्यांच्या कविता, रिकामपणाची कामगिरी, लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी, स्वयंपाक घरातील गोष्टी असे त्यांचे गाजलेले विनोदी लेख असे सगळे लेखन इथे आहे. महत्वाचे म्हणजे हे लेखन युनिकोडमधे आहे, त्यामुळे ते इतरत्र डकवणे किंवा त्यामधील नेमकी माहिती शोधणे अतिशय सोपे झाले आहे.

इंग्रजी भाषेत Project Gutenberg (www.gutenberg.org) या नावाचा एक उपक्रम गेले कित्येक वर्षे सुरु आहे. इंग्रजी भाषेतील स्वामित्वहक्क संपलेली सगळी पुस्तके या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे इंग्रजी भाषेतले हे ज्ञानभांडार आज इंटरनेट जोडणी असलेल्या प्रत्येकासाठी खुले झाले आहे. मराठीत असे संकेतस्थळ नसले तरी हा त्या दिशेने झालेला एक उत्तम प्रयत्न आहे हे नक्की. इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा हा पर्याय छापील पुस्तकांपेक्षा स्वस्त आहे आणि पर्यावरणाला अधिक अनूकुलही.

महाजालावर असणा-या प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी या अनमोल खजिन्याला भेट द्यायलाच हवी!

संकेतस्थळाचा पत्ता : http://ramganeshgadkari.com/egadlari/

Wednesday, February 9, 2011

काही(च्या काही) कविता

पाकिस्तानातून आलेला कांदा पाहून
एक मुळा गाजराला म्हटला,
'च्यायला ह्या पाकिस्तान्यांना
मानलं पाहिजे बुवा.
आपल्याला रडवायची एकही संधी
सोडत नाहीत साले.'

'माझा मित्र बनशील का?'
असं एका सुंदर मुलीनं
मला विचारल्यावर
सूट अन टाय घालून,
सिनेमाची महागडी तिकीटे घेऊन,
लाल गुलाबांच्या बुकेसहित
मी तिचा दरवाजा ठोठावला.
दार उघडल्यावर ती
मला म्हणते कशी,
'अरे फेसबुकवर...'

ए राजानं केलेल्या घोटाळ्याचा
भलामोठा आकडा पाहून
आश्चर्यचकित झालेला बंडू
बाबांना म्हटला,
'बाबा, हे सगळे पैसे जर
सगळ्या भारतीयांमधे वाटले
तर प्रत्येकाला किती येतील?'
बाबा म्हणाले,
'उद्या ऑफिसात कॉम्प्युटरवर
पाहून सांगतो हं बाळ!
आपल्या घरच्या गणकयंत्रात
फक्त आठच आकडे आहेत रे!'

नव-याच्या मागे
लागून लागून लागून
पमीनं त्याला शेवटी
नोकरी बदलायला लावलीच.
आता तो आयटीत मरतो,
आणि ती ऐटीत जगते.

हाडं गोठवणार्‍या त्या थंडीत
त्याचा नि तिचा
असे दोन स्वेटर
नकळत एकमेकांच्या जवळ आले.
स्वेटर असले म्हणून काय,
त्यांना उबेची गरज नसते?
काही महिन्यांनी त्यांना
एक स्वेटर झाला.
त्यांनी त्याचं नाव बंडी ठेवलं,
'थंडी'वरून!

या वर्षीचा
आदर्श खासदार पुरस्कार
१०० कोटी लाटणा-या
एका मंत्रीमहोदयांना
'सन्मानपूर्वक' जाहीर झालाय.
त्यांच्या भ्रष्टाचाराचा आकडा
सगळ्यात कमी होता.

परवा सवाईमधे
'कानडाऊ विठ्ठलू' गाणं
एका गायकाने चक्क
'कॅनडाऊ विठ्ठलू' असं गायलं.
गाणं सुरू असताना
माझ्या शेजारची मुलगी
माझ्या कानात म्हटली,
'विट्ठल...
कॅनडाचा होता का?'
मला आताशा पुण्याची
काळजी वाटू लागलीये.

Monday, January 31, 2011

सिंहासन - एक विशेष प्रभाव न पाडू शकणारा चित्रपट

मराठी सिनेमाचा इतिहास लिहिताना ज्याला टाळून पुढे जाता येणार नाही आणि आपला एक विशिष्ठ ठसा उमटवणा-या चित्रपटांच्या यादीत ज्याचा समावेश निश्चितपणे करावा लागेल असा 'सिहासन' नुकताच पाहिला आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर फारसा आवडला नाही.

ही कथा आहे दिगू टिपणीसची. दिगू एका वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार आहे. सडाफटिंग असलेला दिगू एका लहानशा फ्लॅटमधे एकटाच राहतो. सकाळी उशीरा उठावे, आवरून बाहेर पडावे आणि दिवसभर इकडेतिकडे फिरून बातम्या मिळवून रात्री उशीरा घरी परतावे असा त्याचा दिनक्रम. 'सिंहासन'ची कथा केंद्रित आहे दिगूवर, पण त्याला या कथेचा नायक म्हणता येणार नाही, रुढार्थाने सिंहासनला कुणीच नायक नाही. या कथेत अनेक पात्रे आहेत, किंबहुना पात्रांची इथे अगदी जत्रा झाली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. असे असले तरीही या पात्रांना सांभाळणे, त्यांना खेळवणे हे दिग्दर्शकाने (जब्बार पटेल) सहज जमवले आहे आणि त्यासाठी त्याचे कौतुक करायला हवे.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे आनंदराव, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (आणि त्यांची तरूण देखणी सून), विदर्भातून आलेले मुख्यमंत्र्यांचे पक्षांतर्गत विरोधक - शेतकीमंत्री माणिकराव पाटील, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार रावसाहेब टोपले, कामगार पुढारी डिकास्टा, सोन्याची चोरटी आयात करणारा स्मगलर, त्याचा हस्तक, तिथेच काम करणारा एक मध्यमवर्गीय संसारी पुरुष, जगूकडे काम करणारी मोलकरीण आणि तो प्रेम करत असलेली एक मरणासन्न वेश्या अशा सगळ्या पात्रांभोवती सिंहासनची कथा फिरते.

सिंहासनची बलस्थान आहेत त्यातल्या कलाकारांचा अभिनय आणि अर्थातच् त्यातले संवाद. निळू फुले, अरूण सरनाईक, श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, डॉ. मोहन आगाशे, लालन सारंग, नाना पाटेकर असे नंतर आपल्या अभिनयाने गाजलेले अनेक मोठे अभिनेते सिंहासनमधे आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख वठवली आहे, पण सगळ्यात भाव खाऊन जातात ते श्रीराम लागू. बोलताना जीभेवर साखर ठेवून बोलणारे पण बेरकी, कावेबाज दाभाडे लागूंनी उत्तम उभे केले आहेत. अगदी छोट्या भूमिकेमधूनही एक अभिनेता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवू शकतो या गोष्टीची प्रचिती सिंहासनमधे येते; जगूचा न्हावी आणि शेवटी त्याला भेटणारा भिकारी ही याची दोन चांगली उदाहरणे.

सिंहासनमधले संवाद लिहिले आहेत विजय तेंडुलकर यांनी. चित्रपटातला प्रत्येक संवाद नेमकी हवी ती गोष्ट अचूकपणे सांगणारा आहे; संवादांची उदाहरणे देऊन मी उगीच इथे जागा वाया घालवणार नाही. संवाद हे चित्रपटाचे एक महत्वाचे अंग आहे हे गाजलेल्या प्रत्येक चित्रपटाने दाखवून दिले असूनही ही गोष्ट आजकालचे दिग्दर्शक का बरे विसरले असावेत?

पण - आणि हा पण खूप महत्वाचा आहे - एवढे सगळे असूनही सिंहासनचा प्रभाव पडत नाही. एखाद्या उमेदवाराने हरेक मतदारसंघात आघाडी मिळवावी पण शेवटी निवडणूक मात्र हरावी असे काहीसे सिंहासनमधे घडते. चित्रपटात दिगू शेवटी वेडा होतो, पण (चित्रपटात त्याच्याबरोबर फारसे वाईट असे काहीच न घडूनही) असे का व्हावे याचे कारण स्पष्ट होत नाही. धूर्त नि मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी एका निनावी दूरध्वनीने एवढे अस्वस्थ का व्हावे, आपल्या बुडणा-या पत्नीला न वाचवणा-या पक्षाध्यक्षांनी या कारणाने मुख्यमंत्र्यांना का घाबरावे, मुख्यमंत्र्यांनी डिकास्टाला भेटताना, त्याने अर्थमंत्र्यांना भेटताना कुणीच कसे पाहू नये, रावसाहेब टोपलेंनी सोन्या महार नि त्याच्या मुलीला एवढे दिवसाढवळ्या मारूनही त्याचा अजिबात ब्रभा का होऊ नये या प्रश्नांची उत्तर चित्रपटात मिळत नाहीत.

सत्तासंघर्षाचे चित्रण करणारा चित्रपट मधेच गरीबांच्या जगण्यावर (उषःकाल होता होता...) भाष्य करतो आणि आपला सगळा प्रभाव गमावून बसतो. प्रसंगांमधून जमला असला तरी एक कथा म्हणून चित्रपटाचा जो अंतिम परिणाम व्हायला हवा तसा तो सिंहासनमधे होत नाही आणि इथेच तो मार खातो. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिलेला हा परिणाम खूप महत्वाचा असतो; किंबहुना तोच एखादा चित्रपट सामान्य की असामान्य हे ठरवत असतो. अनेकदा एखाद्या चित्रपटात काही संवाद चुकतात, काही प्रसंग हवा तसा परिणाम साधत नाहीत, पण त्याचा अंतिम परिणाम अनुकूल असतो आणि त्यामुळेच तो यशस्वी ठरतो; सिंहासनमधे नेमके उलटे घडते, त्यातले संवाद, प्रसंग परिणामकारक असले तरी तो एक चित्रपट म्हणून आपला प्रभाव टाकू शकत नाही.

'यू डोन्ट हॅव टू विन इच बॅटल, यू हॅव टू विन द वॉर' या वाक्याच्या नेमके विरुद्ध सिंहासनबाबत घडते. हरेक लढाई जिंकलेला हा चित्रपट शेवटी युद्ध हरतो. असे सगळे असले तरी दिग्गज कलाकारांच्या अभिनयासाठी आणि उत्कृष्ट संवादांसाठी तो एकदा पहायला हवाच!

Monday, January 24, 2011

हिंदी चित्रपटांमधली 'डायलॉगबाजी' गेली कुठे?

परवा टीव्हीवर दीवार पहात होतो; जे चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी अजिबात शिळे वाटत नाहीत अशा चित्रपटांमधे दीवारचा समावेश होतो. अभिनय, कथा या पातळीवर उत्कृष्ट असला तरी दीवार गाजला तो त्यातल्या संवादांमुळे. 'मेरे पास माँ है|', 'भाई, तुम साईन करोगे या नहीं?', 'आज खुश तो बहोत होगे तुम...', 'मैं आजभी फेके हुए पैसे नहीं उठाता...' अशा ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे हा चित्रपट आजही आपल्याला जवळचा वाटतो. पण आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर मात्र त्यातले संवाद लोकांच्या ओठांवर अजिबात दिसत नाहीत. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर आलेल्या कुठल्याही चित्रपटातला एखादा गाजलेला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा, येतो चटकन ओठांवर? नाही ना? का बरं झालं असावं असं?

मला वाटतं याला बरीच कारणे आहेत. एक कारण म्हणजे आज आपल्या भाषांचं दूषित झालेलं स्वरूप. इंग्रजीचं आक्रमण आज इतकं जोरात आहे की एक वाक्य तिचा आधार न घेता बोलणं अशक्य झालेलं आहे. चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो की समाजाचा चित्रपटांवर हा वाद खूप जुना असला तरी हे दोन्ही एकमेकांवर हळूहळू परिणाम करत असतात हे नक्की. त्यामुळेच आजचे हिंदी चित्रपटांमधले संवाद बरेचसे इंग्रजी नि थोडेसे हिंदी असतात; असले हे धेडगुजरे संवाद काय परिणाम करणार? म्हणजे कल्पना करा, कालिया म्हणतो आहे 'गोली सिक्स और आदमी थ्री. ये तो बहुत इनजस्टिस है|' किंवा राजकुमार साहेब म्हणत आहेत 'ये नाईफ है, लगजाये तो ब्लीडिंग हो सक्ती है|' किंवा डॉन म्हणतो आहे, 'डॉनको पकडना डिफिकल्ट ही नहीं, इम्पॉसिबल हैं' तर त्याचा परिणाम होईल का? चित्रपटाचे नाव इंग्रजीत, नामावली इंग्रजीत, नटनट्यांच्या मुलाखती इंग्रजीत, चित्रपटातले बहुतांश संवाद इंग्रजीत, पुरस्कारसोहळे इंग्रजीत पण चित्रपटाची भाषा मात्र हिंदी असला विनोदी प्रकार फक्त भारतातच होऊ शकतो!

दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत असलेली चांगल्या लेखकांची वानवा. पुर्वीचे हिंदी कथालेखक आणि संवादलेखक फार शिकलेले नसले तरी त्यांनी खूप वाचलेले असे. चांगले साहित्य कशाला म्हणावे, त्याची वैशिष्ट्ये काय ही माहिती त्यांना असे. खूप वाचलेले असल्याने नैसर्गिक तरीही परिणामकारक संवाद कसे लिहावेत हे ज्ञान त्यांना आपसूक मिळे. आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. हिंदी चित्रपटसुष्टीत काम करत असूनही हिंदीचे ज्ञान नाही अशी परिस्थिती आज अनेकांची आहे, लेखकही याला अपवाद नाहीत. किंबहुना आजचे हिंदी चित्रपटसृष्टीतले बहुतांश लोक चित्रपटांच्या प्रेमापेक्षा आपला बाप तिथे असल्याने किंवा पैसा कमावण्यासाठी (क्वचित दोन्हीं कारणांमुळे) तिथे आहेत. इंग्रजी भाषेत शिकलेले आणि इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचत मोठे झालेले हे लेखक पल्लेदार हिंदी संवाद लिहिणार तरी कसे?

तिसरी गोष्ट म्हणजे एकूणच चित्रपटांच्या दर्जाबाबत आग्रही राहण्याची आज विस्मरणात गेलेली चाल. आजचा काळ अनेकपडदा चित्रपटांचा आहे. एक चांगला चित्रपट काढण्यापेक्षा पैसा कमवण्यावर लोकांचा आज भर आहे. भारी नट/नट्या घ्याव्यात, सिनेमाची भरपूर जाहिरात करावी, तो ढीगभर चित्रपटगृहांत प्रदर्शित करावा आणि पहिल्या आठवड्यातच पैसे वसूल करून भरपूर नफाही कमवावा अशी सध्याची रीत आहे. कथेकडे लक्ष देणे, प्रसंगांना साजेसे संवाद लिहिणे, अभिनय करणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला आज वेळ आहे कोणाला? यात प्रेक्षकही थोडेसे दोषी आहेत. त्यांनी जर दर्जाचा आग्रह धरला तरच या फसवणूकीला लगाम घालणे शक्य आहे.

असो, आशा करूयात की एखादा चुरचुरीत, रांगडे संवाद असलेला चित्रपट २०११ मधे प्रदर्शित होईल आणि २०५० साली त्यातले संवाद 'फेकताना' आपण 'हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहांमधे पाहिला होता' अशी बढाई मारू शकू!