Sunday, January 9, 2011

ह्या सगळ्या सुंदर मुली गेल्या कुठे?

परवा माझ्या आवडत्या महिमा चौधरीला चक्क एका केशतेलाच्या 'टेलिब्रांड' जाहिरातीत बघितले नि आश्चर्याचा मोठा धक्का बसला. एखाद्या प्रसिद्ध नटाला त्याच्या पडत्या काळात रस्त्याच्या कोप-यावर नट (नि बोल्ट) विकताना पाहिल्यावर जेवढा मोठा धक्का बसेल तेवढा! म्हणजे काय हे? ठीक आहे, नसतील मिळत कामे पण म्हणून जाहिरात? आणि तीही 'टेलिब्रांड'ची?

मनात हा विचार आला आणि मला आवडणा-या आधीच्या सगळ्या नायिकांची नावे झर्रकन डोळ्यासमोरून गेली. त्या आत्ता काय करत असतील असा विचार मनात आला आणि मन हळहळले. चित्र फारसे उत्साहवर्धक नव्हते. म्हणजे पूजा भट्ट फरशी पुसून घेते आहे आणि शमिता शेट्टी कपडे वाळत घालते आहे हे चित्र डोळ्यासमोर आलेले कोणाला आवडेल?

हिंदी चित्रपटसृष्टी रोज उगवत्या सुर्याला सलाम करते असे म्हटले जाते. इथे दर आठवड्याला एक 'सुपरस्टार' जन्म घेतो आणि पुढच्या आठवड्यात कुणीतरी त्याची जागा घेण्यास तयार असतो. अर्थात नवे 'सुपरस्टार' जन्माला येत असताना जुने विस्मरणात जावे हे ओघाने आलेच. पण का कोण जाणे, आपल्या आवडत्या अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र मन हे मानायला तयार होत नाही. पूजा भट्ट कुणाला आवडो न आवडो, आपण मात्र एके काळी तिचे पंखे होतो. तिचे तो थोडेसे बोबडे बोलणे आणि बिनधास्त वागणे आपल्याला फार आवडे. 'जख्म' चित्रपटातले तिचे ते साडीतले रूप आणि ते दर्दभरे 'तुम आए तो आया मुझे याद, गलीमें आज चॉंद निकला...' गाणे आठवले की आजही ह्दयाला खड्डा पडतो. तीच गोष्ट राणी मुखर्जीची. आठवा ते गुलाम मधले 'ए... क्या बोलती तू' हे गाणे. अभिनय आणि सौंदर्य यांचा दुर्मिळ मिलाफ असलेली राणी अचानक कुठे गायब झाली? (असो, दोन वर्षांनी का होईना, ती आता परत आलीये, 'नो वन किल्ड जेसिका' मधे. {ते असो, पण हिंदी चित्रपटांना इंग्रजी नावे देण्याची ही घाणेरडी चाल कधी बंद होणार आहे?}) सौंदर्यावरून आठवले, ही नौहीद सायरसी कुठे गायब झाली? 'सुपारी'तल्या त्या गाण्यात फक्त हिच्यासाठी आम्ही उदय चोप्राला सहने केले होते हो... उदय चोप्रावरून आठवले, ती शमिता शेट्टी कुठे गेली? आणि ती किम शर्मा? (तिचे कमी कपडे पाहून माझा एक मित्र तिला कमी कपड्यातली शर्मा म्हणत असे!) तो 'मोहब्बतें' (इथे पुन्हा उदय चोप्रा आहेच) आम्ही फक्त या दोघींसाठीच (चित्रपटात शाहरूख खान असूनही) पाहिला होता! रिमी आणि रिया सेन या सेनभगिनींचे तेच. ही फटाकडी रिया गेली कुठे? आणि ती रिमी 'जॉनी गद्दार'नंतर कुठेच का दिसली नाही?

ही झाली चित्रपट अभिनेत्रींची कथा, पण यांच्याबरोबरच एका दूरदर्शन अभिनेत्रीचेही आम्ही पंखे होतो. ती म्हणजे 'मौली गांगुली'. 'कहीं किसी रोज' या मालिकेतून लोकांसमोर आलेली ही अतिशय देखणी अभिनेत्री अचानक दिसेनाशी का झाली बरे?

या नायिका कशाही असल्या तरी सुंदर होत्या, टवटवीत होत्या, रसरशीत होत्या. आजची ती कुठल्यातरी रोगाने ग्रस्त असल्यासारखी दिसणारी पांढरीफटक करिना किंवा अभिनय तर दूरच पण साधे हिंदी बोलताही न येणारी कत्रीना किंवा सगळ्या गाण्यांमधे एकाच पद्धतीने हसणारी दिपीका पाहिली की ह्या नायिका प्रकर्षाने आठवतात. पण याला काय इलाज? 'बदल हीच या जगातली एकमेव कायम गोष्ट आहे!' आणि हा नियम इथेही लागू होतो! जुने जाणार नि नविन येणार हा सृष्टीचा नियमच आहे आणि तो इथे लागू होत असलेला पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

'गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी!' असे म्हणत सुस्कारे टाकणे सोडून!

4 comments:

  1. लेख आवडला. खरंच दिपिका किंवा कतरीन पेक्षा राणी मुखर्जी खूपच समर्थ अभिनेत्री आहे. पण चित्रपट सृष्टितील "कॅम्प" बाजी मुळे ती वाळीत टाकल्या सारखी झाली.

    ReplyDelete
  2. Sagla lekhach bottomline asalya sarakha vatato.THANKS!

    ReplyDelete
  3. 'मौली गांगुली'. she was a beauty..

    ReplyDelete
  4. amrita rao ani swades chi gayatri joshi suddha....

    ReplyDelete